शेतकरी आंदोलन : सिंघू, गाझीपूर आणि टिकरी बॉर्डरवर काय परिस्थिती?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

शुक्रवारी (29 जानेवारी) साधारण दीड वाजता सिंघू सीमेपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आंदोलनाच्या ठिकाणी परिस्थिती अचनाक चिघळली.

आम्ही सीमेवर पोहचलो तेव्हा आमच्या डोळ्यांना जळजळ झाली. तलवारी आणि दांड्या घेतलेल्या जमावाकडून होणारी दगडफेक पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

पोलिसांनी हातात काठ्या घेऊन काही लोकांचा पाठलाग करत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. एका पोलीस अधिकाऱ्याच्या हातातून रक्त वाहत होते. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. पोलीस अधिकाऱ्यावर तलवारीने वार केलेली ती तलवारही पोलिसांच्या हातात होती.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपासच्या परिसरातील काही लोक सिंघू सीमेवर पोहचले आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांना हटवण्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांविरोधात घोषणाबाजीही केली आणि यामुळे हिंसा झाली.

आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू असल्यामुळे स्थानिक लोकांच्या उपजीविकेवर याचा परिणाम होत असल्याचे जमावाचे म्हणणे होते. प्रजासत्ताकदिनी शेतकरी आंदोलकांनी राष्ट्रध्वजाचा कथित "अपमान" केल्याप्रकरणीही या लोकांमध्ये राग होता.

26 जानेवारी रोजी झालेल्या घटनांमुळे पोलिसांनीही आपल्या नियोजनात काही बदल केले आहेत. सिंघू सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी आता सीमेपासून दोन किलोमीटर अंतरावर थांबवले आहे. तसंच आंदोलनकर्त्यांना आता एका मंचाकडून दुसऱ्या मंचाकडे जाण्याची परवानगी नाही.

दिल्ली आणि हरियाणाला जोडणाऱ्या सिंघू सीमेवरील रस्ता खोदण्यासाठी येथे जेसीबी मशीनही आणले आहे.

तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू, गाझीपूर आणि टिकरी बॉर्डरवर इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकरी आंदोलनकर्त्यांनी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. या रॅलीमध्ये झालेल्या हिंसेनंतर याप्रकरणी आतापर्यंत 84 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी 38 FIR ही दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या गोंधळानंतर दिल्ली सीमेवरचं वातावरण तणावपूर्णच आहे.

दिल्ली-गाझियाबाद रस्त्यावरील गाझीपूर सीमेवर 27 जानेवारी रोजी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. येथील आंदोलक शेतकऱ्यांची संख्याही कमी झाल्याचं चित्र होतं. याठिकाणचा वीजपुरवठासुद्धा 27 रोजी रात्री खंडीत करण्यात आला होता.

पोलीस कोणत्याही वेळी कारवाई करतील आणि राकेश टिकैत यांना अटक करण्यात येऊ शकते, असं सांगितलं जात होतं. पण त्यादिवशी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

दरम्यान, त्यानंतर टिकैत यांच्या मुलाखतीचा एक व्हीडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये ते शेतकऱ्यांना भावनिक आवाहन करताना दिसून आले. छातीवर गोळी झेलावी लागली तरी आंदोलन सुरूच राहील, असं टिकैत यांनी म्हटलं.

त्यानंतर गाझीपूर सीमेवरची गर्दी वाढण्यास सुरू झाली आहे. ट्रॅक्टर भरून लोक याठिकाणी येत असून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.

गेले दोन दिवस याच घडामोडी घडताना दिसल्या.

आज (रविवार, 31 जानेवारी) अचानक सिंघू बॉर्डरवर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात येत असल्याचं दिसून आलं. याठिकाणची पोलिसांची संख्या प्रजासत्ताक दिनानंतर हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.

तर, काल (शनिवार, 30 जानेवारी) रात्री उशिरा या परिसरातील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. त्यामुळे येथील परिस्थितीबाबत आता लोकांमध्ये चर्चा रंगली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)