मनदीप पुनिया : कैदेतल्या शेतकऱ्यांसोबतची बातचीत मांडीवर टिपली

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

गेल्या शनिवारी सिंघू सीमेवरून अटक करण्यात आलेले पत्रकार मनदीप पुनिया यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

कैदेत असताना तुरुंगात असलेल्या शेतकरी कैद्यांसोबतची चर्चा पायांवर-मांडीवर टिपून ठेवली असून आता पुढच्या बातमीत तिथल्या परिस्थितीबाबत लिहिणार आहे, असं मनदीप पुनिया बाहेर आल्यानंतर म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

शनिवारी (30 जानेवारी) संध्याकाळी सिंघू सीमेवरून स्वतंत्र पत्रकार मनदीप पुनिया यांना अटक झाल्याची बातमी सर्वप्रथम सोशल मीडियावर येऊ लागली. पण अनेक तास उलटले तरी पोलिसांनी त्यांच्या अटकेच्या बातमीला अधिकृत दुजोरा दिला नाही. .

30 जानेवारीला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास एक व्हीडिओ व्हायरल होऊ लागला ज्यात पोलीस एका माणसाला खेचून घेऊन जात असल्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. रात्री उशिरा पत्रकारांनी मनदीप पुनिया यांच्याबद्दल ट्विट करायला सुरुवात केली. या ट्विट्सनुसार मनदीप यांना पोलिसांनी अटक केली होती. पण त्यांना कुठे नेण्यात आलं होतं हे कुणालाही कळू शकलं नाही.

मनदीप पुनिया 'द कॅरावान'सह अनेक नियतकालिकांसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे रिपोर्टींग करत आहेत.

मनदीपव्यतिरिक्त सिंघू सीमेवरील आणखी एक पत्रकार धर्मेंद्र सिंह यांनाही ताब्यात घेण्यात आले. धर्मेंद्र स्वत:चे यूट्यूब चॅनेल चालवतात. हे दोन्ही पत्रकार हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील आहेत.

सिंघू बॉर्डरवर काय झाले होते?

धर्मेंद्र सिंह यांना पोलिसांनी मनदीप पुनियासह अटक केली, पण रविवारी पहाटे पाच वाजता त्यांची सुटका करण्यात आली. त्यांनी सांगितले, 'यापुढे पोलीस करत असलेल्या कारवाईचे व्हीडिओ शूट करणार नाही तसंच मीडियाशीही बोलणार नाही.' असे अंडरटेकींग (लेखी हमी) दिल्ली पोलिसांनी त्यांच्याकडून लिहून घेतले आहे. या अटीवरच त्यांना पोलिसांनी सोडले असंही ते म्हणाले.

प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, धर्मेंद्र यांना पोलिसांनी सिंघू सीमेवर पकडले तेव्हा मनदीप त्यांच्यासोबत उभे होते. पत्रकाराला का पकडले जात आहे? असा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला आणि पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले.

पंजाबमधील एका न्यूज पोर्टलसाठी काम करणाऱ्या मनदीप सिंह यांनी सांगितले, "किसान मोर्चाच्या पत्रकार परिषदेत व्यासपीठाजवळ आरडाओरडा झाला तेव्हा कळाले की मनदीप पुनिया आणि धर्मेंद्र सिंह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यावेळी ते पोलिसांच्या बॅरिकेडिंगमुळे लोकांना होत असलेल्या अडचणींवर एक व्हीडिओ रेकॉर्ड करत होते."

रात्रभर काहीच माहिती नाही

न्यूजलाँड्रीसाठी काम करणारे पत्रकार वसंत कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी त्यांच्या दोन साथीदारांना सिंघू सीमेवरून अटक केल्याचे पत्रकारांना कळताच ते अलीपूर पोलीस स्टेशनला पोहोचले.

मनदीप पुनिया किंवा धर्मेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीला सिंघू सीमेवरून ताब्यात घेतल्याप्रकरणी पोलिसांना विचारले असता त्यांनी स्पष्ट नकार दिला. अनेक पत्रकार पहाटे तीन वाजेपर्यंत अलीपूर पोलीस स्टेशनच्या बाहेर बसले होते. पण पोलिसांनी त्यांना कोणतीही माहिती दिली नाही. सोशल मीडियावर मनदीप पुनिया यांच्याशी संबंधित दोन-तीन हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले.

आज (31 जानेवारी) दुपारी पोलिसांच्या कारवाईविरोधात पत्रकारांनी दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर निषेध व्यक्त करत निदर्शनं केली.

एफआयआरमध्ये काय म्हटले आहे?

जवळपास 12 तास पोलीस कोठडीत राहिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मनदीप पुनिया यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. भारतीय दंड संहितेच्या कलम 186 (सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे), 353 (सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे), 332 (जाणीवपूर्वक व्यत्यय आणणे) आणि 341 (बेकायदा हस्तक्षेप करणे) या कलमांअतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआरनुसार, "दिल्ली पोलीस शनिवारी सिंघू सीमेवर आपली ड्यूटी करत असताना त्याठिकाणी शेतकरी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करत होते. सायंकाळी साडेसहा वाजता काही शेतकरी बॅरिकेड्स तोडण्यासाठी आले आणि पोलिसांशी हाणामारी करण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान पोलिसांनी मनदीप पुनिया यांना ताब्यात घेतले जे पोलीस कर्मचाऱ्याशी हाणामारी करत होते."

रविवारी (31 जानेवारी) सकाळी दिल्ली पोलिसांनी मनदीप यांना समयपूर बादली पोलीस स्टेशनमधून तिहार तुरुंगात नेले. तेथे त्याला मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले.

पोलिसांच्या या एफआयआरमध्ये धर्मेंद्र सिंह यांना अटक किंवा सुटका केल्याचा कोणताही उल्लेख नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)