कॅनडामधील सीबीसी वृत्तवाहिनीच्या पत्रकार नताशा फतेह यांनी युक्रेनमध्ये अंडरग्राऊंड बंकरमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी बातचित केली. हे विद्यार्थी वाईट स्थितीत असून, त्यांच्या अडचणी सांगत होते.त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की, "अन्न-पाण्याविना हे विद्यार्थी अंडरग्राऊंड बंकरमध्ये लपलेले आहेत. जीव वाचवण्यासाठी काय करावं, हेच समजत नाही."
महताब रजा या विद्यार्थ्यांपैकी एक आहे. रजाने सीबीसीच्या नताशा यांच्याशी बोलताना सांगितलं की, "मॅम, आम्ही खूप वाईट अवस्थेत आहोत. दहा दिवसांपासून आम्ही सर्वजण अंडरग्राऊंड बंकरमध्ये लपलो आहे. दिवसागणिक स्थिती बिकट होत जातेय. आम्ही हतबल आहोत. काहीच करण्याच्या स्थितीत नाही आहोत. कसंतरी करून भारतात परत जायचं, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला माहीत नाही की, परत कधी जाऊ. युक्रेन आणि भारत सरकारकडून आम्हाला एखादी माहिती मिळेल आणि वाट पाहत आहोत."
नताशा म्हणाल्या की, असं वाटतंय तुम्ही एखाद्या गुहेत आहात. तुम्ही नक्की कुठे आहात? यावर महताब रजाने सांगितलं की, "आम्ही युक्रेनच्या सुमी शहरात आहोत. इथं 800 ते 900 भारतीय विद्यार्थी अडकलो आहोत. आम्ही सीमेपर्यंतही जाऊ शकत नाही, कारण तिथवर जाण्यासाठी रस्ता नाहीय. रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त करण्यात आलंय. कुणीही टॅक्सी ड्रायव्हर तयार नाहीय. बस नाहीत. खारकीव्हमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागलीय. इथं ना वीज आहे, ना पाणी. दोन दिवसांपूर्वीच इथं मोठा स्फोट झाला होता आणि तेव्हापासून पाणी संकट सुरू झालं. पाणी नसल्यानं ब्रशही करू शकत नाही आणि शौचालयातही जाऊ शकत नाहीय."
"आम्ही अधून-मधून रशियात जातो आणि तिथून कसंतरी आमच्या कुटुंबीयांशी बोलतो. आम्ही कुटुंबीयांना सुद्धा खरं सांगू शकत नाही, कारण ते काळजी करतील. आम्ही ज्या वेदना सहन करतोय, त्यांचा विचारही करू शकत नाही. हे मानवतेसाठी योग्य नाही. आम्हाला लढायचं नाहीय. आम्हाला शांतता हवीय. युद्ध थांबावं, असं आम्हा भारतीयांना वाटतं," हे सांगत असताना महताब रडू लागला.
भारत सरकारनं रशिया आणि युक्रेनच्या सरकारनं शुक्रवारी सुमीमध्ये युद्धविरामासाठी आग्रह केला होता, जेणेकरून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं जाऊ शकतं. 24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला होता, तेव्हा सुमी शहरात 800 विद्यार्थी तिथं फसले होते.