You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा केला काश्मीरचा उल्लेख, भारताचा आक्षेप
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात उपस्थित केला आहे. भारताने याला आक्षेप नोंदवला आहे. पण दुसरीकडे, पाकिस्तानचे याचं कौतुक केलं आहे.
आम्ही संयुक्त राष्ट्र संघटनेत काश्मिरी नागरिकांच्या हक्कांना पुन्हा एकदा पाठिंबा दर्शवल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांचे आभार, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी ट्वीटरवर दिली आहे.
तत्पूर्वी, त्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या 75 व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधून भाषण केलं होतं. यावेळीही त्यांनी काश्मीरचाच मुद्दा उपस्थित केला होता.
"काश्मीर संघर्षाचा मुद्दा आशिया खंडात शांतता आणि स्थैर्य आणण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे, अजूनसुद्धा हा ज्वलंत मुद्दा आहे. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली आहे," असं अर्दोआन आपल्या भाषणात म्हणाले.
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी हे वक्तव्य रेकॉर्डेड व्हीडिओ संदेशाच्या माध्यमातून केलं.
अर्दोआन यांच्या या भूमिकेवर भारताने कठोर आक्षेप घेतला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टी. एस. त्रिमूर्ती म्हणाले, "भारताच्या जम्मू काश्मीर या केंद्र शासित प्रदेशाबाबत राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांचं वक्तव्य आम्ही पाहिलं. हा भारताच्या अंतर्गत विषयांत हस्तक्षेप आहे. भारतासाठी हे स्वीकारार्ह नाही. तुर्कस्तानने दुसऱ्या देशांच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करणं शिकायला हवं."
गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी कलम 370 हटवण्यात आल्यानंतर तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर अशाच प्रकारची टीका केली होती. तेव्हा भारताने ते अनुचित असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्दोआन पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानी संसदेलाही संबोधित केलं. "काश्मीरचा मुद्दा पाकिस्तानसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच तुर्कस्तानच्या लोकांसाठीही तो महत्त्वाचा आहे," असं अर्दोआन त्यावेळी म्हणाले होते.
मंगळवारी संयु्क्त राष्ट्राच्या आमसभेत अर्दोआन म्हणाले, "आपण सर्वजण काश्मीर प्रश्नी समाधान, संवाद, युएन प्रस्ताव आणि काश्मिरी लोकांच्या अपेक्षांचा हिशोब करण्याच्या बाजूने आहोत."
गेल्या वर्षीच्या आमसभेतही अर्दोआन यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता.
वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार इशान थरूर यांनी या भाषणावरून अर्दोआन यांच्यावर टीका आहे. "अर्दोआन पॅलेस्टाईन, काश्मीर आणि नरगोरनो कॅरबेक या मुद्द्यांवर भाषणबाजी करतात. पण त्यांनी झिनजियांग प्रांतातील वीगर मुस्लिमांबाबत चकार शब्दी काढला नाही," असं थरूर म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)