You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्ल्ड कप 2019: भारत विरुद्ध पाकिस्तान नाही, ऊन विरुद्ध पाऊस हा सामना अधिक महत्त्वाचा
- Author, शिवकुमार उलगनाथन
- Role, बीबीसी तामिळ प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
पावसामुळे आत्तापर्यंत चार सामने रद्द होणं, हे वर्ल्डकपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी चांगलं नाही.
ब्रिस्टलमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तानचा सामना रद्द झाला, त्यानंतर साउथहँप्टनचा श्रीलंका-वेस्टइंडिजमधला सामना रद्द झाला. मग ब्रिस्टलमध्ये श्रीलंका आणि बांगलादेशचा सामना. आणि आता तर नॉटिंगहममध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यातला सामनाही पावसामुळे रद्द झाला.
वर्ल्डकपमध्ये रद्द होणारा हा चौथा सामना आहे.
1992 आणि 2003च्या वर्ल्डकपमध्ये याआधी सर्वाधिक सामने रद्द झाले होते.
पावसामुळे नॉटिंगहँम येथे भारताच्या सरावसत्रावरही परिणाम झाला आहे. या आठवड्याच्या शेवटी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आधीच वाहून गेलेल्या 13 तारखेच्या भारत-न्यूझीलंड लढतीनंतर आता सर्व लक्ष आहे 16 तारखेला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावर.
"वर्ल्डकप येथे असला की यावेळी पाऊस येतो. काही वेळ पाऊस येतो आणि मग सूर्यप्रकाश पडतो. मात्र तीन सामने रद्द होणं, हे चांगलं लक्षण नाही. मात्र हा आयोजकांचाही फारसा दोष नाही." असं गेल्या आठवड्यात सेंथिलकुमार यांनी मला सांगितलं होतं. ते बाथहून लंडनला खास ओव्हलवरचा सामना बघायला आले होते.
ते पुढे सांगतात, "भारतीय संघाच्या फॉर्मकडे बघा. भारत उपांत्यफेरीत जाणार की नाही, हे येत्या एक दोन सामन्यात कळेलच. फक्त इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे संघच भारताला पराभूत करण्याची शक्यता आहे."
मात्र ब्रिस्टल आणि नॉटिंगहममध्ये जेव्हा पाऊस होता, तेव्हा लंडनमध्ये कुंद वातावरण होतं. लंडनमध्ये सोमवारी दिवसभर पाऊस पडला.
सतत पडणारा पाऊस आणि तीन रद्द झालेले सामने, यामुळे वर्ल्डकपच्या उत्साहावरही परिणाम झाला आहे. आशियाई लोक सोडलं तर या स्पर्धेबद्दल फारसं कुणी बोलत नाहीये.
इथले लोक भारतीय लोकांसारखे टीव्हीला चिकटून बसत नाहीत. इंग्लंडची वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी आहे. त्यांची जिंकण्याची शक्यताही जास्त आहे. तरीही इथल्या लोकांमध्ये फारसा उत्साह बघायला मिळालेला नाही.
"गेल्या दोन दशकांपासून फुटबॉल हा इथल्या लोकांचा लोकप्रिय खेळ आहे. इंग्लंड जर वर्ल्डकप जिंकला तर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. यामुळे खेळाची संपूर्ण दिशा बदलू शकते," असं टेरी नावाचे एक फुटबॉल चाहते सांगतात.
धवन चर्चेत
शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे आता लोकेश राहुल सलामीला येईल. त्यामुळे बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकावर येण्यासाठी विजय शंकर किंवा दिनेश कार्तिक यांची वर्णी लागू शकते.
भारतीय चाहत्यांमध्ये सध्या टीम इंडियाच्या बाबतीत चांगला उत्साह पाहायला मिळाला. पण धवनच्या दुखापतीमुळे काय परिणाम होईल, याचा चर्चाही कमी होईना.
"शिखर-रोहित ही अतिशय चांगली जोडी आहे. त्यामुळे हे भारताचं मोठं नुकसान होऊ शकतं," असं पार्थिब नावाच्या एका चाहत्याचं मत आहे. त्याने भारताचे पहिले दोन्ही सामने पाहिले आहेत.
"धवनला अत्यंत चुकीच्या वेळेला बाहेर जावं लागलं. त्याच्याजागी बदली खेळाडू शोधणं सोपं नाही. के. एल. राहुलने मागे चांगली कामगिरी केली तरी तो फारसा चांगला पर्याय नाही. त्यामुळे रोहित शर्मा आणि भारतासाठी पुढचे काही महिने कठीण असणार आहेत," असं केशव नावाच्या चाहत्याचं मत आहे.
पाकिस्तानशी खेळण्याशी सज्ज
मात्र चाहते धवनच्या दुखापतीमुळे काळजीत नाही. चिंता आहे ती 16 जूनला होणाऱ्या पारंपरिक लढतीची.
"आम्हाला मँचेस्टरच्या सामन्याची उत्सुकता आहे. भारत सध्या चांगल्या फॉर्मात आहे. बुमराह आणि इतर गोलंदाज पाकिस्तानच्या बॅटिंगला नक्कीच ब्रेक लावतील," असं नवीन नावाचा एक फॅन भारताच्या कामगिरीबद्दल बोलतो.
लंडनला भारताचा सामना बघण्यासाठी जी लोकं आली होती, त्यांनी इथे शॉपिंगचा आनंद लुटला. तसंच मँचेस्टरच्या सामन्याबद्दलही ते आशावादी आहेत.
यशवंत आणि त्याचे काही मित्र भारताचे काही सामने बघायला इथे आले होते. ते म्हणाले, "ओव्हलचा सामना जिंकल्यानंतर आम्ही दोन दिवस तिथे निसर्गसौंदर्य पाहिलं. पाकिस्तानचा पराभव पाहिल्यानंतरच आम्हाला परत जायचंय."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)