IndvsEng : आर. अश्विनचे पाच बळी, भारताला 249 धावांची आघाडी

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चेन्नई येथे सुरू आहे. या सामन्यात सुरुवातीला रोहित शर्माचं शतक आणि आता रविचंद्रन आश्विनच्या पाच विकेटच्या बळावर भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं इंग्लंडवर 249 धावांची आघाडी घेतली होती. भारतानं दुसऱ्या डावाची सुरुवात केली. खेळ संपताना भारतानं एक विकेट गमावून 54 धावा केल्या आहेत.

दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं संघानं 329 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतानं इंग्लंडला 134 धावांवर ऑल आउट केलं. आर. अश्विननं महत्त्वाची भूमिका बजावत 5 विकेट घेतल्या.

भारतानं दुसऱ्या डावाची सुरूवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीनं 42 धावा केल्या. 12 व्या ओव्हरमध्ये शुभमन गिल 14 धावा करून बाद झाला.

दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रोहित शर्मा 25 धावांवर तर चेतेश्वर पुजारा 7 धावांवर खेळत होते.

त्यानंतर पुन्हा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी सावधपणे खेळ करत भारताचा धावफलक हलता ठेवला आहे. त्यामुळे सध्यातरी भारतीय संघ या सामन्यात मजबूत स्थितीत दिसत आहे.

आज (14 फेब्रुवारी) सकाळी 6 बाद 300 धावसंख्येवरून भारताने आपला डाव पुढे सुरू केला. ऋषभ पंतने किल्ला लढवत धावा वेगाने वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने अर्धशतकी खेळी करून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या बाजूने गडी बाद होण्याचं सत्र सुरूच होतं. त्यामुळे भारताचा डाव 329 धावांवर आटोपला.

त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंड संघाच्या फलंदाजांचा जम भारतीय गोलंदाजांनी बसू दिला नाही. खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असल्याचं दिसून आल्याने कर्णधार विराट कोहलीने एका बाजूने रविचंद्रन आश्विनची गोलंदाजी सुरू ठेवली. या रणनितीला यश आल्याने इंग्लंडला जास्त धावा जमवता आल्या नाहीत. आश्विनने पाच बळी घेतले.

इंग्लंडचा पहिला डाव 134 वर गडगडला. त्यामुळे भारताला 195 धावांची मजबूत आघाडी मिळवता आली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)