You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात लस रवाना
ज्या कोरोनाविरोधी लशीची संपूर्ण देश वाट पाहत होता. ती कोरोनाविरोधी लस अखेर आली आहे.
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटट ऑफ इंडियामधून कोव्हिड-19 लशीची पहिली खेप रवाना करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सिरम इंन्स्टिट्युटमधून कोरोना विरोधी 'कोव्हिशिल्ड' लस देशातील विविध राज्यांसाठी पुणे एअरपोर्टकडे रवाना करण्यात आली.
पण, ही लस कोणत्या राज्यांकडे रवाना करण्यात आली याबाबत सीरम इन्स्टिट्यूटकडून माहिती मिळू शकलेली नाही.
16 जानेवारीपासून देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जगभरातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
पुण्याच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून लशीची पहिली खेप रवाना करण्यात आली. लस देशभरात वितरीत केली जाणार आहे. लस कोणत्या राज्यांना पाठवण्यात आली याबाबत सिरमकडूनच माहिती मिळू शकेल. पोलिसांनी लस घेऊन जाणाऱ्या ट्रकना एअरपोर्टपर्यंत सुरक्षा देण्याचं काम केलं."
भारतात पहिल्या टप्प्यात कोव्हिड वॉरिअर्सना लस दिली जाणार आहे. देशभरातील कोरोनाविरोधी लढ्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना 16 जानेवारीपासून लस देण्याची मोहीम सुरू केली जाईल.
मंगळवारी सकाळपासूनच सीरम इन्स्टिट्युटमध्ये लशीचे बॉक्स ट्रकमध्ये भरण्याचं काम सुरू होतं. मिळालेल्या माहितीनुसार, लस घेऊन जाणाऱ्या ट्रकना आतून सॅनिटाईज करण्यात आलं आहे.
लसीकरण मोहीम योग्य पार पाडली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा आर्थिक भार केंद्र सरकार उचलणार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
सामान्यांना एवढ्यात कोरोनाविरोधी लस मिळणार नाही. आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यास लसीकरण केलं जाणार आहे. त्यात 30 कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लशीकरणासंदर्भात देशभरातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जनलेता संबोधित केलं.
मोदींनी मांडेलेले मुद्दे -
1. भारतात कोरोनाचं संक्रमण इतर देशांपेक्षा कमी आहे. आता लोकांमध्ये भीतीचं वातावरण कमी झालं आहे.
2. 16 जानेवारीपासून आपण जगभरातील सगळ्यात मोठी लशीकरण मोहीम आपण सुरू करत आहोत.
3. ज्या दोन लशींना मंजुरी दिली, त्या दोन्ही 'मेड इन इंडिया' आहेत. अजून 4 लशी मुंजरीच्या टप्प्यात आहेत.
4. या दोन्ही लशी जगभरातल्या इतर लशींपेक्षा कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत. जर आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावं लागलं असतं तर देशाची स्थिती काय झाली असती याची आपण कल्पना करू शकतो. देशातल्या सगळ्या बाबींचा विचार करून त्या तयार करण्यात आल्या आहेत.
5. लशीकरणात आधी कोरोना फ्रंटलाईनर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांना लस दिली जाईल.
6. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाईल. त्याचा पूर्ण खर्च केंद्र सरकार उचलेलं. राज्यांनी पैसे द्यायची गरज नाही.
7. दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लस दिली जाईल.
8. कोरोनाच्या लशीबाबत आपण पूर्णपणे शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार निर्णय़ घेणार आहोत.
9. कोराोना लशीकरणासाठी कोविन नावाचं मोबाईल अॅप तयार करण्यात आलंआहे. लस घेतल्यानंतर लाभार्थ्याला या अॅपच्या माध्यमातून लगेच प्रमाणपत्र दिलं जाईल. तसंच दुसरा डोस कधी द्यायचा, याचं रिमांइमडरही हे अॅप देईल.
10. कोरोनाच्या लशीमुळे कुणाला इजा झाल्यास त्यासाठीही तरतुदी करण्यात आल्या आहेत.
11. कोरोना लशीबाबत अफवा पसरू नये, यासाठी राज्यांनी आणि सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी.
12. देशातल्या 9 राज्यांत बर्ड फ्लू पसरल्याचं स्पष्ट झालं आहे. यासाठी पशुसंवर्धन मंत्रालयानं नियमावली जाहीर केली आहे. तिचं पालन करणं गरजेचं आहे. जिथं बर्ड फ्लू नाही, तिथल्या सरकारांनी सतर्क राहावं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)