You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : राज ठाकरे यांचे उद्धव ठाकरेंना पत्र, खासगी डॉक्टरांची मांडली व्यथा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून खासगी सेवेतील डॉक्टरांच्या व्यथा मांडल्या आहेत.
खासगी सेवेतील डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा विम्याचं कवच सरकार का नाकारत आहे? असा सवाल राज ठाकरेंनी पत्रातून उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांना खासगी सेवेतील डॉक्टरांचं शिष्टमंडळ भेटलं. त्यांनी कोरोना काळातल्या खासगी वैद्यकीय सेवेतील समस्या राज ठाकरेंसमोर मांडल्या. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या समस्यांची दखल घेऊन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
राज ठाकरे यांनी पत्रात काय म्हटलंय?
कोरोना काळात सरकारी आणि खासगी अशा दोन्ही वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विम्याचं कवच असेल आणि यांपैकी कुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये दिले जातील, असं सरकारनं परिपत्रक काढलं होतं.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात याच परिपत्रकाचा उल्लेख केला आहे आणि म्हटलंय की, "खासगी सेवेतील डॉक्टर कोरोना काळात सेवा देताना मृत्यू झाला तरी त्याच्या कुटुंबीयाला विम्याचा लाभ सरकार नाकारत आहे. खासगी सेवेत असल्याचे कारण लाभ नाकारताना दिले जात आहे."
"केंद्र सरकारच्या योजनेनुसार जर विम्याचं कवच उपलब्ध आहे, तर राज्य सरकार कुठल्या न्यायाने ते नाकारत आहे? याला असंवेदनशीलता नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? सरकार डॉक्टरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार, पण सरकार स्वत:ची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल? हे चूक आहे," असे संतप्त सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी या विषयात तात्काळ लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी विनंतीही राज ठाकरे यांनी केलीय. खासगी सेवेतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती योग्य न्यायाची आशाही त्यांनी व्यक्त केलीय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)