IndVsBangladesh:बांगलादेशसमोर भारतीय संघ चीतपट

Published

महिनाभरापूर्वी ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दारुण पराभवासह गाशा गुंडाळावा लागलेल्या भारतीय क्रिकेट संघाला बांगलादेशात मालिका पराभवाला सामोरे जावे लागले.

बांगलादेशने दुसऱ्या वनडेत पाच धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. पहिल्या वनडेप्रमाणे दुसऱ्या वनडेतही मेहदी हसन मिराझ बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

पहिल्यांदा बॅटिंग करताना बांगलादेशची अवस्था 69/6 अशी होती पण महमदुल्ला आणि मेहंदी यांनी सातव्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी रचली आणि बांगलादेशने 271 धावांची मजल मारली.

आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मेहदीने कारकीर्दीतील पहिलं शतक झळकावलं. त्याने 83 चेंडूत नाबाद 100 धावांची खेळी केली. महमदुल्लाने 77 धावा करत त्याला चांगली साथ दिली.

क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने रोहित शर्मा सलामीला आला नाही. भारतीय संघाची अवस्था 65/4 अशी झाली. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरला. हे दोघे विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच हे दोघे बाद झाले. श्रेयसने 82 तर अक्षरने 56 धावांची खेळी केली.

परिस्थिती ओळखून रोहित शर्मा फलंदाजीला आला. दुखापत झालेली असतानाही रोहितने 28 चेंडूत 51 धावांची खेळी केली पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारताला 266 धावाच करता आल्या. बांगलादेशतर्फे इबादत हुसेनने 3 विकेट्स घेतल्या. मेहदी हसन मिराझला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

2015 दौऱ्यातही भारताला बांगलादेशात वनडे मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)