INDvsENG : भारत वि. इंग्लंड पाचवा कसोटी सामना कोरोनामुळे रद्द

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मँचेस्टरमध्ये होणारा भारत विरूद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे.

बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलनं ट्वीट केलंय की, ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर शुक्रवारी (10 सप्टेंबर) नियोजित असणारा पाचवा आणि अंतिम कसोटी सामना रद्द करण्यात आलाय. कारण कॅम्पमध्ये कोरोनाचे केसेस वाढण्याची भीती आहे.

ICC च्या माहितीनुसार, BCCI आणि ECB ने एकमेकांच्या सहमतीनेच हा सामना रद्द केलाय.

ECB ने जारी केलेल्या पत्रकानुसार, "BCCI सोबत चर्चेनंतर ECB या वृत्ताला दुजोरा देतंय की, इंग्लंड आणि भारत यांमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटी सामना रद्द करण्यात येतोय. हा सामना ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवला जाणार होता."

भारत आपला संघ मैदानात उतरवण्यास असमर्थ असल्याचेही यात म्हटलं आहे.

ECB ने क्रिकेटरसिकांची दिलगिरी व्यक्त करत म्हटलंय की, आम्हाला माहित आहे अनेकांची निराशा आणि असुविधा होईल.

रॉयटर्स वृत्तसेवा संस्थेनुसार, भारताचे फिजिओथेरेपिस्ट योगेश परमार यांना कोरोनाची लागण झालीय.

कसोटी मालिकेच्या 5 सामन्यांमध्ये भारत 2-1 ने पुढे होता.

टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींसह चौघांना कोरोनाची लागण

5 सप्टेंबर 2021 रोजी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यावेळी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील चार जणांना अलगीकरणात ठेवण्यात आलं होतं.

शास्त्री यांच्यासह बोलिंग प्रशिक्षक बी. अरूण, फिल्डिंग प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजियोथेरपिस्ट नितिन पटेल यांना खबरदारीचा उपाय म्हणून अलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली होती.

4 सप्टेंबरला शास्त्री यांची लॅटरल फ्लो अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्या जवळच्या संपर्कात असल्यानं अन्य तिघांनाही अलगीकरणात ठेवण्यात आलं होतं.

चौघांचीही RT-PCR चाचणी करण्यात आली आहे. सध्या चौघंही टीम इंडियाच्या हॉटेलमध्येच आहेत. वैद्यकीय सल्लागारांनी पुढची माहिती दिल्याशिवाय त्यांना पुढे प्रवास करता येणार नाही.

कृणाल पांड्या कोव्हिड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उडाली होती तारांबळ

दोन महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू कोव्हिड पॉझिटिव्ह आढळल्याने आयोजकांसह सर्वांची तारांबळ उडाल्याचं दिसून आलं होतं.

भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर वनडे आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी गेला होता.

त्यामध्ये अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने 27 जुलै होणारा ट्वेन्टी-20 सामना पुढे ढकलण्यात आला.

त्यावेळी भारताचा मुख्य संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असल्याने पर्यायी संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर पाठवण्यात आला होता.

वनडे मालिका भारताने 2- 1 अशी जिंकली. त्यानंतर भारताने पहिली ट्वेन्टी-20 लढत जिंकली होती.

मात्र दुसरा ट्वेन्टी-20 सामना होणार होता. कृणाल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा सामना आणि पर्यायाने ट्वेन्टी-20 मालिका लांबणीवर गेली.

नंतर अनेक प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताला पुढील दोन सामने खेळावे लागले. परिणामी यामध्ये भारत पराभूत झाल्याचं त्यावेळी दिसून आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)