You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
WTC Final : न्यूझीलंडचा शानदार विजय, भारत 8 विकेटने पराभूत
इंग्लंडच्या साऊथॅम्पटन मैदानावर खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 8 गडी राखून विजय मिळवला.
भारतानं दिलेलं माफक आव्हान न्यूझीलंड संघाने सहज पार केलं आणि क्रिकेट कारकिर्दीतील टेस्ट चॅम्पियनशीपच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
सामन्यातील सहाव्या आणि राखीव दिवशी भारताचं 139 धावांचं आव्हान मिळालं, त्यावेळी दिवसभरातील 53 षटके शिल्लक होती.
दुसऱ्या डावात भारताला झटपट गुंडाळून न्यूझीलंडने आधीच कसोटीवर मजबूत पकड मिळवली होती. फलंदाजीस उतलल्यानंतरही कोणताही धोका न पत्करता अखेर 8 गडी राखून न्यूझीलंडने विजय मिळवला.
मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन यांनी तिखट मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. मात्र विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी त्यांच्या प्रतिमेस साजेसा खेळ करत संघाला विजय मिळवून दिला.
साऊथम्पटनच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दुसऱ्या डावामध्ये पहिल्या लंचपर्यंत भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. म्हणजेच राखीव असलेल्या सहाव्या दिवसाचं पहिलं सत्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी गाजवलं.
बुधवारी भारताचे दोन फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर सहाव्या राखीव दिवसाच्या पहिल्याच सत्रात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताच्या आणखी तीन विकेट्स घेतल्या.
कर्णधार विराट कोहली(13), चेतेश्वर पुजारा (15) आणि अजिंक्य राहणे (15) हे लवकर आऊट झाले. पहिल्या डावात भारताच्या 5 विकेट्स घेणाऱ्या जेमिसननं गुरुवारीही न्यूझीलंडच्या संघासमोरचे पुजारा आणि कोहली हे दोन मोठे अडथळे दूर केले.
दुसऱ्या सत्रामध्ये ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप होत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र जडेजा 16 रन्सवर असताना वॅगनरच्या जाळ्यात अडकला आणि आऊट झाला.
ऋषभ पंत न्यूझीलंडच्या बॉलिंगचा संयमाने सामना करत होता. त्यामुळं पंत पुन्हा एकदा भारताला संकटातून बाहेर काढणार असं वाटत होतं. त्याचवेळी न्यूझीलंड्च्या ट्रेंट बोल्टनं त्याला शॉट मारण्यास भाग पाडलं आणि पंत 41 धावांवर तोही बाद झाला.
पंत बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 7 बाद 156 होती. म्हणजे न्यूझीलंडवर भारताची 124 धावांची आघाडी होती. पण पंत पाठोपाठ रविचंद्रन अश्विनही त्याच ओव्हरमध्ये बाद झाला.
त्यानंतर आलेल्या शमीनं काही फटके मारले. त्यानं लगावलेल्या तीन चौकारांमुळं भारताच्या खात्यात धावा वाढल्या. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी तळाच्या फलंदाजांना गुंडाळलं. त्यामुळं भारताचा दुसरा डाव 170 धावांवर संपुष्टात आला.
पावसामुळे पहिल्या आणि चौथ्या दिवशी एकही चेंडू न होता खेळ रद्द करण्यात आला होता. वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल असल्याने राखीव दिवस ठेवण्यात आला होता.
न्यूझीलंडनं गुरुवारी लंचपर्यंत भारताच्या आणखी तीन विकेट्स घेतल्या. कर्णधार विराट कोहली(13), चेतेश्वर पुजारा (15) आणि अजिंक्य राहणे (15) हे लवकर आऊट झाले. पहिल्या डावात भारताच्या 5 विकेट्स घेणाऱ्या जेमिसननं गुरुवारीही न्यूझीलंडच्या संघासमोरचे पुजारा आणि कोहली हे दोन मोठे अडथळे दूर केले.
ढगाळ वातावरण आणि चेंडू स्विंग होत असतानाच्या कठीण परिस्थितीत भारतीय संघाने पहिल्या डावात 217 धावांची मजल मारली. अजिंक्य रहाणेने 49 तर विराट कोहलीने 44 धावा केल्या. न्यूझीलंडकडून उंचपुऱ्या कायले जेमिसनने 5 विकेट्स घेतल्या.
पावसामुळे बाधित इनिंग्जमध्ये न्यूझीलंडने 249 धावा करत अल्प आघाडी मिळवली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने 54 तर कर्णधार केन विल्यमसनने संयमी 49 धावांची खेळी केली. टीम साऊदी (30) तर कायले जेमिसन (21) यांनी उपयुक्त खेळी करत न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या डावात भारतीय संघाने 64/2 अशी आगेकूच केली होती. रोहित शर्मा 30 धावा करून साऊदीच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला तर शुभमन गिलही साऊदीच्याच गोलंदाजीवर बाद झाला.
सामना अनिर्णित झाल्यास संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल. मॅच गमावण्यापेक्षा अनिर्णित हा निकाल सन्मानजनक असल्याने या निकालाची शक्यताही जास्त आहे. विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्या नेतृत्वगुणांचीही परीक्षा असणार आहे.
न्यूझीलंडने चार वेगवान गोलंदाजांसह एका अष्टपैलू खेळाडूला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूसंह खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघ- भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, काईल जेमिसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग.
सततच्या पावसामुळे पहिल्या दिवशी एकही चेंडू न टाकता खेळ रद्द करण्यात आला होता.
कसोटी क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा स्वरुपाची स्पर्धा होत आहे. फायनल ड्रॉ किंवा टाय झाली तर कोणत्या संघाला विजेतेपद मिळणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. फायनल ड्रॉ म्हणजे अनिर्णित किंवा टाय म्हणजे बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघांना स्पर्धेचे संयुक्त विजेते म्हणून घोषित केलं जाईल असं आयसीसीने जाहीर केलं.
या फायनलसाठी 23 जून हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. पाच दिवसांच्या खेळात पावसामुळे किंवा कोणत्या अन्य कारणांमुळे अडथळा आला तर उर्वरित ओव्हर्स 23 जून रोजी खेळवण्यात येतील, असे आयसीसीने स्पष्ट केलं. मात्र पाच दिवस पूर्ण सामना झाल्यानंतरही निकाल न लागल्यास सहाव्या दिवशी खेळ होणार नाही.
हा सामना ग्रेड 1 ड्यूक बॉलने खेळवला जात आहे. याव्यतिरिक्त मैदानावरील अंपायरनी शॉर्ट रनच्या दिलेल्या निर्णयाचा रिव्ह्यू थर्ड अंपायर करणार आहे.
LBW चा निकाल दिल्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमचा कॅप्टन किंवा आऊट झालेल्या बॅट्समन बॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता का? हे मैदानातील अंपायरला विचारणा करुन प्लेयर रिव्ह्यू घेऊ शकतो.
LBW च्या निर्णयाची समीक्षा करण्यासाठी स्टम्पवर आदळणाऱ्या बॉलची उंची आणि लांबी यावरुन अम्पायर्स कॉलचा निर्णय घेण्यात येईल.
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आतापर्यंत एकूण 59 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारताने 21 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने 12 सामने जिंकले आहेत. अनिर्णीत सामन्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच 26 इतकी आहे.
भारताचा फायनलपर्यंतचा प्रवास
भारतीय संघाने वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीवर 2-0 असा विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली. भारताने पहिली कसोटी 318 तर दुसरी 257 धावांनी जिंकली होती.
इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक गोलंदाजी करत विजयात निर्णायक भूमिका बजावली होती.
हनुमा विहारीने कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं होतं. विहारीला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 3-0 असं नमवलं. रोहित शर्माने या मालिकेदरम्यान कसोटीत सलामीवीर म्हणून पदार्पण केलं.
मयांक अगरवालने सलग दोन शतकं झळकावली. रोहित शर्मानेही दोन शतकांची लयलूट केली. कर्णधार विराट कोहलीने द्विशतकी खेळी साकारली.
यानंतर भारतीय संघाने बांगलादेशचा 2-0 असा धुव्वा उडवला. इशांत शर्माला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
न्यूझीलंडविरुद्ध मात्र भारतीय संघाला सपशेल पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडने 2-0 असं हरवत दणदणीत विजय मिळवला. पहिल्या कसोटीत टीम साऊदीने तर दुसऱ्या कसोटीत कायले जेमिसनने भारतीय संघाची दाणादाण उडवली.
ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला चीतपट करणं अतिशय अवघड समजलं जातं. सलामीच्या कसोटीत भारतीय संघाचा 36 धावात खुर्दा उडाला. पॅटर्निटी लिव्हसाठी विराट कोहली मायदेशी परतला.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला दुखापतींनी बेजार केलं. अनुनभवी भारतीय संघाने सगळ्या अडथळ्यांना पार करत थरारक विजय साकारला.
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला. अजिंक्य रहाणेच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने दुसरी कसोटी जिंकली. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयाची संधी होती. मात्र ऋषभ पंतने दमदार खेळी करत भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. ऋषभ बाद झाल्यानंतर हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन यांनी चिवटपणे खेळ करत सामना अनिर्णित राखली.
चौथ्या कसोटीत ऋषभच्या आणखी एक दिमाखदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने संस्मरणीय विजय साकारला. वॉशिंग्टन सुंदर, टी.नटराजन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शुभमन गिल या युवा खेळाडूंनी विजयात उल्लेखनीय योगदान दिलं.
यानंतर भारताने घरच्या मैदानावर इंग्लंडला 3-1 नमवलं. रवीचंद्रन अश्विनने 32विकेट्स पटकावत मालिकावीर पुरस्कार पटकावला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)