IndvsPak: पाकिस्तानचा भारतावर 5 विकेट्सनी विजय, मोहम्मद नवाज सामनावीर

Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

आशिया चषक टी-20 स्पर्धेत सुपर 4 गटातील सामन्यात पाकिस्तानने भारताविरुद्ध विजय मिळवला आहे.

भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 182 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ते पाकिस्तानने 19.5 षटकांत 5 विकेटच्या मोबदल्यात गाठून विजय प्राप्त केला.

पाकिस्तानचा सलामीवर यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान आणि अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाज हे पाकिस्तानच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

रिझवानने 51 चेंडूंमध्ये 71 धावांची खेळी केली. तर मोहम्मद नवाजने 20 चेंडूंत आक्रमक 42 धावा केल्या.

मोहम्मद नवाजने गोलंदाजीतही चमक दाखवत 4 षटकांत 25 धावांत 1 गडी बाद केला. नवाजच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

182 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यालढतीतही मोठी खेळी करू शकला नाही. पण मोहम्मद रिझवान एक बाजू सांभाळून खेळत होता. चौथ्या क्रमांकावर आलेल्या नवाजची त्याला चांगली साथ मिळाली.

दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी करत पाकिस्तानचा विजय दृष्टिपथात आणला. पण मोक्याच्या क्षणी दोघेही माघारी परतल्याने सामन्यात रंगत आली होती.

दरम्यान, नवोदित खेळाडू अर्शदीप सिंहने पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अलीचा सोडलेला झेल भारताला महागडा ठरला. अखेरीस आसिफ अलीने खुशदिल शाहच्या सोबतीने पाकिस्तानचा विजय साकार केला.

तत्पूर्वी, भारतीय संघाने विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर 181 धावांची मजल मारली. रोहित शर्मा आणि के.एल. राहुल यांनी 54 धावांची खणखणीत सलामी दिली. पण मोठा फटका खेळण्याचा रोहितचा प्रयत्न खुशदील शाहच्या हातात जाऊन विसावला. त्याने 28 धावांची खेळी केली.

रोहित बाद झाल्यानंतर राहुलने आक्रमक पवित्रा स्वीकारला. पण शदाब खानने त्याची खेळी संपुष्टात आणली. त्यानेही 28 धावा केल्या.

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या लढतीत शानदार अर्धशतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमारला या लढतीत 13 धावाच करता आल्या. दिनेश कार्तिक नसल्याने ऋषभ पंतवर जबाबदारी वाढली होती पण पण त्याला मोठी खेळी करता आली नाही.

भरवशाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला मोहम्मद हसनैनने शून्यावर बाद केलं. सहकारी एका बाजूने बाद होत असताना कोहलीने दिमाखदार खेळी साकारली. कोहलीने 44 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकारासह 60 धावांची खेळी केली. दीपक हुड्डाने 16 धावा करत त्याला चांगली साथ दिली.

10 षटकात शंभरी गाठणाऱ्या भारतीय संघाला पाकिस्तानने शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर ब्रेक लावला. पण शेवटच्या षटकांमध्ये पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी सोपे झेल टाकले. पाकिस्तानतर्फे शदाब खानने 2 तर नसीम खान, मोहम्मद हसनैन, हॅरिस रौफ आणि मोहम्मद नवाझ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारतीय संघाने या लढतीसाठी हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा आणि रवी बिश्नोई यांना संघात समाविष्ट केलं. रवींद्र जडेजा आणि अवेश खान हे दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यांच्या जागी दीपक हुड्डा आणि रवी बिश्नोई यांना संधी मिळाली. हार्दिक पंड्याच्या समावेशासाठी दिनेश कार्तिकला संघातून वगळण्यात आलं.

पाकिस्तानने दुखापतग्रस्त दहानीच्या ऐवजी हसनैनला संघात समाविष्ट केलं.

भारताने मागच्या रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यामुळे जर एशिया कपमध्ये आपलं स्थान टिकवायचं असेल तर काहीही करून हाँगकाँगविरुद्धची मॅच काढणं पाकिस्तानला भाग होतं. या मॅचमध्ये पाकिस्तानने धीमी सुरुवात केली. पुढे मोहम्मद रिझवान आणि फखर जमां यांनी काढलेल्या अर्धशतकामुळे पाकिस्तानने 193 धावांपर्यंत मजल मारली.

रिझवानने गर्मी आणि दमट वातावरणाचा सामना करत 78 रन्स काढल्या, तर दुसरीकडे झमानने त्याला चांगली साथ दिली.

दोन विकेट्सवर 193 धावांचा डोंगर रचल्यानंतर पाकिस्तानचे स्पिनर्स शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांनी सात विकेट्स घेत हाँगकाँगला अवघ्या 38 धावांत गुंडाळलं. हाँगकाँगच्या टीमने भारताविरुद्ध चांगला गेम दाखवला होता, मात्र पाकिस्तानसमोर त्यांचं काही चाललं नाही.

आता हाँगकाँगवर 155 धावा राखून विजय मिळवलाय म्हटल्यावर पाकिस्तानचा आत्मविश्वास दुणावलाय. साहजिकच मागच्या रविवारी (28 ऑगस्ट) झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी पाकिस्तान सज्ज झालाय. त्यात भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हटलं की क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला भरत येतं.

2012-13 पासून या दोन्ही संघांनी परस्पर दौरे केलेले नाहीत. मात्र आयसीसीने खेळवलेल्या टूर्नामेंटमध्ये हे दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी एशिया कपची घोषणा झाली होती. त्यामुळे हे दोन्ही संघ किमान तीनवेळा तरी आमने-सामने येतील अशी अपेक्षा होती.

आता या रविवारच्या सामन्यानंतर फायनल मध्ये हे दोन्ही संघ एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानची टीम-ए ग्रुपमधले अव्वल संघ आहेत. तेच बी ग्रुपमधील श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या टीमने सुपर फोरमध्ये आपलं स्थान मजबूत केलं आहे.

बाबर आझम वि. विराट कोहली

भारत आणि पाकिस्तानच्या या सामन्यात मुख्य आकर्षण असेल बाबर आझम वि. विराट कोहली. आतापर्यंत झालेल्या 2 मॅचेसमध्ये बाबर आझमने म्हणावी तितकी खास कामगिरी केलेली नाही.

भारताच्या भुवनेश्वर कुमारने बाऊन्सर टाकून बाबर आझमला आऊट केलं होतं, तेच हाँगकाँगचा स्पिनर इशान खानने आपल्या कॅचने आझमची विकेट पाडली होती. एशिया कपच्या आधी तर बाबर आझमची धुवांधार बॅटिंग सुरू होती.

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने धावांचे डोंगर रचलेत. यावर्षी जुलैमध्ये पाकिस्तान वि. श्रीलंका टेस्ट मॅच झाली होती. यात त्याने 228 धावा काढल्या. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अशा दहा हजार धावांचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला.

याआधी हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या जावेद मियांदादच्या नावावर होता. त्यांनी 248 धावा काढून हा विक्रम रचला होता. पाकिस्तानचा माजी ओपनर सईद अन्वरने 255 आणि मोहम्मद युसूफने 261 धावांमध्ये हा करिष्मा साधला होता. तर इंझमाम-उल-हकला यासाठी 281 धावा काढाव्या लागल्या होत्या.

ही यादी बघता बाबर आझमच्या चांगल्या गेमची कल्पना करता येते.

वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहली बादशाहा होता. ऑगस्ट 2017 पासून एप्रिल 2021 पर्यंत विराट क्रिकेटमधील टॉप प्लेयर होता. आयसीसीच्या वर्ल्ड रँकिंगमध्ये तब्बल 1,258 दिवस टॉपला राहणाऱ्या विराटची लिगसी बाबर आझमने मोडली.

सध्या फॉर्ममध्ये येण्यासाठी विराट कोहली धडपडतोय. तीन वर्ष झाले असतील त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शतक झळकावलेलं नाहीये. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 35 रन्स केल्या होत्या तर हाँगकाँगविरुद्ध 43 बॉल्सवर नॉटआऊट 59 रन्स काढल्या. यामुळे त्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय.

बघायला गेलं तर विराट आणि बाबर आझमची तुलना खूप आधीपासूनच केली जाते आहे. जेव्हा बाबर आझम अंडर 19 मध्ये खेळत होता तेव्हा त्याची कामगिरी बघता, विराटशी त्याची तुलना केली जायची. 2015 पासूनच ही तुलना सुरू आहे.

तसं तर बाबर आझमने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एंट्री करेपर्यंत विराटच्या 150 हुन जास्त वनडे मॅचेस खेळून झाल्या होत्या. त्याच्या नावावर 20 हुन जास्त शतकांचे विक्रम होते. पण नंतर मात्र बाबर आझमने आपला गेम दाखवून दिला.

2022 मध्ये बाबर आझमने सर्वात वेगवान 2,000 धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला. हा रेकॉर्ड त्याने अवघ्या 47 मॅचेस मध्ये रचला होता. तर कोहलीला हा विक्रम रचण्यासाठी 56 मॅचेस खेळाव्या लागल्या होत्या.

आता हिशोबाची वेळ

मागच्या रविवारी भारत आणि पाकिस्तान अशी मॅच झाली त्यात भारतीय संघावर प्रेशर होतं. कारण 2021 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने दहा विकेट राखून भारताचा पराभव केला होता. आता तोच पराभव खोडून काढण्याचं आव्हान भारतीय संघासमोर होतं.

भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभव पत्कारावा लागल्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम चारमध्ये जागा मिळाली नाही. आता एशिया कपमध्ये पहिलाच सामना भारताने जिंकल्यामुळे दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या संघावर दडपण आलंय.

रोहित शर्मा आणि टीममधल्या इतरही खेळाडूंचं मनोबल वाढलं आहे. टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या तुलनेत भारताचं पारडं जड आहे. आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यांपैकी भारताने 8 सामने जिंकलेत.

भारतासाठी दिलासादायक गोष्ट काय असेल तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी अनफिट असल्याने टूर्नामेंटच्या बाहेर आहे. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी आपला फिटनेस परत मिळावा या हेतूने त्याने लंडन गाठल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे.

दुसरीकडे भारताचा ऑलराउंडर खेळाडू रवींद्र जडेजाही अनफिट आहे. त्याच्या जागी आता अक्षर पटेलने संघात एंट्री केली आहे. जडेजा टी-20 वर्ल्ड कपपूर्वी संघात परत येण्याची शक्यता कमी आहे. कारण गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो मार्च ते जून असा पूर्णवेळ संघाबाहेर होता.

तसं तर जडेजा नसल्यामुळे एशिया कपमध्ये सुद्धा भारताच्या अडचणीत वाढ झालीय. जडेजाने बॅट आणि बॉल अशा दोन्हीवर आपली पकड कायम असल्याचं वेळोवेळी सिद्ध केलंय. तो संघात असला की एकप्रकारचं संतुलन निर्माण होतं, सोबतच विरोधी संघांवरही दबाव असतो.

एशिया कपमध्ये सहभागी होताना भारताच्या टीममध्ये जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल नव्हते. मात्र आता जडेजा नसल्याने रोहित शर्माला आपल्या खेळाडूंचा काळजीपूर्वक वापर करावा लागणार आहे.

मात्र, पाकिस्तानच्या विरोधात हार्दिक पांड्याने ज्याप्रकारे आपला गेम दाखवला ते पाहता भारतीय टीम कोणतंही आव्हान पेलायला तयार असल्याचं दिसतं.

आता प्रश्न उरतो तो म्हणजे या सामन्यात ऋषभ पंतला खेळवलं जाणार का? हे अवलंबून आहे रोहित शर्मा आणि प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडवर. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पंतच्या जागी दिनेश कार्तिकला घेण्यात आलं होतं. मात्र हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात पंतला संधी मिळाली होती.

ऋषभ पंतची ओळख आता मॅच विनर प्लेयर अशी व्हायला लागली आहे. मागच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याचा समावेश नसल्यामुळे बरीच टीका झाली होती.

शिवाय भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादववरही लोकांच्या नजरा आहेत. त्याने त्याने हाँगकाँगविरुद्ध 26 चेंडूत नॉटआऊट 68 धावांची खेळी केली.

त्याने आतापर्यंत टी-20 च्या 25 मॅचेस खेळल्या असतील. मात्र त्याने यात एक शतक आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्या बॅटिंगचा स्ट्राइक रेट 177 पेक्षा जास्त आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी बेस्ट खेळाडू अशी त्याची ओळख तयार झाली आहे.

काही विश्लेषकांना वाटतं की विराट ऐवजी त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळवलं पाहिजे. कारण पेस आणि स्पिन बॉलिंगवर सेम फॉर्ममध्ये खेळून रन्स जमा करणारा दुसरा बॅट्समन संघात नाहीये.

2018 च्या एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दोनवेळा आमने सामने आले होते. या दोन्ही वेळेस भारतानेच विजय मिळवला आहे. त्यामुळे चालीरीतीप्रमाणे यंदा भारताने पहिला सामना खिशात घातला आहे तर दुसरा सामना जिंकण्यासाठी भारत सज्ज झालाय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)