नितीश कुमार यांचा राजीनामा, जदयूने सोडली भाजपची साथ

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे भाजपसोबत सरकार होते. आता ते राष्ट्रीय जनता दलासोबत जातील अशी शक्यता आहे.

एएनआय वृत्तसंस्थेनी त्यांच्या राजीनाम्याच्या बातमीबाबत दुजोरा दिला आहे.

नितीश कुमार गेल्या काही काळापासून नाराज

मुख्यमंत्री नितीश कुमार गेल्या काही काळापासून भाजपवर नाराज आहेत. रमजान महिन्यात ते लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टीला गेले होते. त्यानंतर जदयू ने बोलावलेल्या इफ्तार पार्टीत नितीश कुमार तेजस्वी यादव यांचा पाहुणचार करताना आढळले होते.

हा प्रसंग पाहून जदयूच्या अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला होता. काका आणि पुतण्या एकत्र आले तर प्रदेशाच्या दृष्टीने चांगलं लक्षण आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

जदयूचे माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांच्यावर प्रमाणाबाहेर संपत्ती असल्याचा आरोप झाला आणि त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

पक्ष सोडताना जदयू हे बुडतं जहाज असल्याची टिप्पणी त्यांनी केली होती.

नितीश कुमार सातत्याने भाजपापासून दुरावत आहेत. ते केंद्र सरकारने बोलावेल्या सगळ्या बैठकांना गैरहजर होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीलाही ते उपस्थित नव्हते.

त्याचवेळी तेजस्वी यादव यांचीही नितीश कुमार यांच्यावरची टीकेची धार बोथट झाली आहे. आता ते त्यांचं नावही घेत नाही आणि केंद्र सरकाकवर मात्र सातत्याने टीका करत असतात.

सध्या सर्व पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. आता नितीशकुमार राज्यपालांना भेटून काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)