You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लागला तर सोडणार नाही, किरीट सोमय्यांचा नवाब मलिकांना इशारा #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लागला तर सोडणार नाही, किरीट सोमय्यांचा नवाब मलिकांना इशारा
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात विविध प्रकारचे आरोप-प्रत्यारोप होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
या वादात आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही उडी घेतली आहे.
समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही, असा इशारा किरीट सोमय्यांनी नवाब मलिकांना दिला.
तसंच ठाकरे सरकारमधील नेते ड्रग्ज माफियांचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलत आहेत. समीर वानखेडे यांच्याविरोधात मलिक यांनी आकसापोटी मोहीम उघडली आहे. त्याचा मी निषेध करतो, असं सोमय्या म्हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली.
2. लशींबाबत 100 कोटींचा आकडा फक्त सांगण्यासाठी, 29 कोटी लोकांचच लसीकरण - काँग्रेस
भारतात लशीचे 100 कोटी डोस पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (शुक्रवार, 22 ऑक्टोबर) देशाला संबोधून भाषण केलं. पण त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मोदींवर टीका सुरू केली आहे.
काँग्रेस नेते शशि थरूर यांनी एक कार्टून शेअर करत ट्वीट केलं. त्यांनी सामान्य नागरीक साथीचा रोग, गॅस सिलेंडर दरवाढ, पेट्रोल-डिझेल दरवाढ यांच्याखाली दबलेला असल्याचं थरूर म्हणाले.
तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही ट्विटरवर मोदींवर टीका केली.
100 कोटी हा आकडा फक्त ऐकायला भारी वाटतो. पण त्याची खरी मेख त्याच्या तपशीलात आहे. 139 नागरिकांपैकी केवळ 29 कोटी नागरिकांचंच पूर्ण लसीकरण झालं आहे. म्हणजेच फक्त 21 टक्के लोकांचं लसीकरण झालं. मग भाजप नेमका कशाचा आनंद साजरा करत आहे, असा सवाल त्यांनी विचारला. ही बातमी लोकसत्ताने दिली.
3. जावेद अख्तर यांच्याविरोधात आणखी एक तक्रार दाखल
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना कथितरित्या तालिबानशी केल्याच्या मुद्द्यावरून अख्तर यांच्याविरोधात एका वकिलाने मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी फिर्याद दाखल केली.
अॅड. संतोष दुबे असं याचिकाकर्त्या वकिलांचं नाव आहे. अख्तर यांनी राजकीय हेतूने आरएसएसच्या नावाचा अनावश्यकपणे वापर केला असल्याचं दुबे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.
4. योगी सरकारचं शेतकऱ्यांसाठी 78 कोटींचं पॅकेज
उत्तर प्रदेशात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत करण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 77.88 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.
या पॅकेजचा राज्यातील 2.35 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.
5. नव्या पिढीच्या विचारांशी जुळवून घ्या - जयंत पाटील
आपला पक्ष प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक मतदारसंघात वाढला पाहिजे. नव्या पिढीला आपण आपल्या पंखाखाली घ्यायला हवं. त्यासाठी त्यांच्या विचारांशी जुळवून घेत समन्वय साधला पाहिजे. मगच बदल घडेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
वसई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत पाटील बोलत होते. आपला पक्ष शरद पवार यांचा एक विचार आहे. हा विचार भक्कम व्हायला हवा. त्यासाठीच मी आणि माझे सहकारी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत, असं पाटील म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)