राहुल गांधींचा संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सुद्धा (26 जुलै 2021) गदारोळामुळे कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत, तर राज्यसभेचं कामकाज 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

दरम्यान, आज संसदेचं कामकाज सुरू होण्याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी ट्रॅक्टर घेऊन संसदभवन परिसरात आले.

शेती संदर्भात करण्यात आलेल्या 3 कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि दिल्लीच्या सीमांवर गेल्या 8 महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी यांनी हे पाऊल उचलल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

"नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांचा हक्क हिरावून घेत आहे, तसंच सरकारने आणलेले 3 कृषी कायदे मुठभर उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. ते त्यांना मागे घ्यावे लागतील," असं राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, "सरकारच्या मते शेतकरी आनंदात आहेत आणि निदर्शन करणारे दहशतवादी आहेत. पण, खरं हे आहे की शेतकऱ्यांचा हक्क त्यांच्यापासून हिरावला जात आहे."

दुसरीकडे शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी दिल्लीतल्या जतरमंतरमध्ये प्रतिकात्मक संसद भरवली आहे. शेतकरीविरोधी कायदे संपवा, अशी त्यांनी मागणी केली आहे.

तर संसद भवन परिसरात अकाली दलाच्या खासदारांनी त्यांचं आंदोलन सुरूच ठेवलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)