शेतकरी दिन: नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचं अहित करणार नाहीत - राजनाथ सिंह

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही शेतकऱ्यांनाचं नुकसान होऊ देणार नाही, असं म्हटलं आहे.

भारताचे माजी पंतप्रधान आणि आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी झटलेले चौधरी चरण सिंह यांची आज जयंती आहे. 23 डिसेंबर 1902 रोजी चौधरी चरण सिंह यांचा जन्म झाला होता. "खरा भारत हा खेड्यात वसतो," असं म्हणणारे चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिन हा 'शेतकरी दिन' म्हणूनही साजरा केला जातो.

या दिवसाच्या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चौधरी चरण सिंह यांना अभिवादन करत काही ट्वीट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक पावलं उचलत असल्याचंही त्यांनी लिहिलं आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या 25 दिवसांहूनही अधिका काळापासून शेतकरी केंद्रीय कृषी कायद्याविरोधात ठाण मांडून बसले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी हे ट्वीट केलं आहे.

या ट्वीटमध्ये राजनाथ सिंह लिहितात, "आज शेतकरी दिनाच्या निमित्ताने मी देशाच्या सर्व अन्नादात्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी देशाला खाद्य सुरक्षेचं कवच दिलं आहे.

"कृषी कायद्यांविरोधात काही शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकार त्यांच्याशी संपूर्ण संवेदनशीलतेने चर्चा करत आहे. ते लवकरच आंदोलन मागे घेतील, अशी मी आशा करतो."

ते पुढे लिहितात, "देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांचा मान-सन्मान सुरक्षित रहावा, अशी चौधरी चरण सिंह यांची इच्छा होती.

आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी त्यांच्याच प्रेरणेने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक पावलं उचलत आहेत. ते कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं अहित होऊ देणार नाही."

त्यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना ट्वीटमधून वंदनही केलं.

ते लिहितात, "माजी पंतप्रधान आणि देशातील सर्वात सन्माननीय शेतकरी नेत्यांमध्ये अग्रगण्य चौधरी चरण सिंह यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी स्मरण आणि नमन करतो.

चौधरी साहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आणि त्यांच्या कल्याणासाठी झटले. देश त्यांचं योगदान सदैव स्मरणात ठेवेल."

शेतकरी आंदोलनाचा आजचा 28 वा दिवस आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. आजवर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी अनेकदा सरकारशी चर्चा केली. मात्र, अजूनतरी कुठलाही तोडगा निघालेला नाही. या आंदोलनात आतापर्यंत जवळपास 30 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

सरकारने पुन्हा एकदा नव्याने चर्चेचा प्रस्ताव पाठवला आहे. यावर शेतकरी आज विचारविनिमय करतील. यासाठी शेतकऱ्यांनी एक पाच सदस्यीय समितीही स्थापन केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)