You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधी : म्हणून मी कृषी विधेयकं संमत होत असताना परदेशात होतो
केंद्र सरकारनं संमत केलेल्या कृषी विधेयकांना काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. ही विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.
याच विधेयकांना विरोध करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी पंजाबमध्ये आहेत. या कृषी विधेयकांच्या माध्यामतून मोदी सरकार अन्नसुरक्षेची व्यवस्थाच उद्धवस्त करू पाहात असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. हा आपल्या शेतकऱ्यांवरचा हल्लाच आहे आणि या विधेयकांचा सर्वाधिक फटका हा पंजाबला बसणार असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं.
लोकसभा आणि राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर झाली तेव्हा राहुल गांधी उपस्थित नव्हते. ते सोनिया गांधी यांच्यासोबत अमेरिकेत गेले होते. यासंदर्भात विचारल्यावर राहुल गांधी यांनी म्हटलं, "माझी आई वैद्यकीय तपासणीसाठी गेली होती. माझी बहीण तिच्यासोबत जाऊ शकत नव्हती, कारण तिच्या स्टाफपैकी काही जणांना कोव्हिड झाला होता. मी मुलगा आहे, मी माझ्या आईसोबत राहिलो होतो. "
पंजाबमधील ट्रॅक्टर रॅलीच्यावेळी राहुल गांधी ट्रॅक्टरवर कुशन लावलेल्या खुर्चीवर बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्याबद्दल राहुल गांधींना विचारण्यात आलं. या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधींनी म्हटलं की, आठ हजार कोटींचं विमान का खरेदी केलं, हा प्रश्न कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारत नाही.
यावेळी राहुल गांधी यांनी हाथरस बलात्कार प्रकरण, चीनची आक्रमकता तसंच लॉकडाऊनवरही भाष्य केलं.
राहुल गांधींनी म्हटलं की, चीननं आपल्या भूभागावर घुसखोरी करण्याचं धाडस केलं कारण देशाच्या नेतृत्वाला केवळ स्वतःच्याच प्रतिमेची काळजी आहे, याची त्यांना कल्पना आहे.
"मोदी सरकारनं देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले, कामगारांना रोजगार देणारे लघु आणि मध्यम उद्योग उद्ध्वस्त केले. मी फेब्रुवारीमध्येच कोव्हिड-19 बद्दल बोललो होतो, पण तेव्हा मी चेष्टा करत असल्याचं म्हटलं," असं राहुल गांधींनी म्हटलं.
हाथरसमध्ये सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेला भेटायला जाण्यावरूनही बराच गोंधळ झाला होता. राहुल आणि प्रियंका गांधी या प्रश्नाचं राजकारण करत असल्याची टीका झाली होती. त्याबद्दल बोलताना राहुल गांधींनी म्हटलं, "तुम्ही एकटे नाहीये, एवढंच मला पीडितेच्या कुटुंबाला जाणवून द्यायचं होतं. त्या कुटुंबाला उत्तर प्रदेश सरकारनं लक्ष्य केलं, पण आपल्या पंतप्रधानांनी त्याबद्दल एक अक्षरही उच्चारलं नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)