काँग्रेस वर्किंग कमिटीत बदल : महाराष्ट्रातून कोणाला जबाबदारी?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये मोठे बदल केले आहेत.

पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची यादी (CWC) शुक्रवारी (11 सप्टेंबर) रात्री उशीरा जाहीर केली.

गुलाम नबी आझाद आणि मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह चार ज्येष्ठ नेत्यांना सरचिटणीस पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीतील नेत्यांच्या यादीत महाराष्ट्रातून फक्त मुकुल वासनिक यांचा समावेश आहे.

तसंच कायम निमंत्रित सदस्यांमध्ये महाराष्ट्रातून राज्यसभा खासदार राजीव सातव आणि रजनी पाटील यांना संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय, सोनिया गांधी यांनी पक्षाचं संघटनात्मक कामकाज आणि इतर मदतीसाठी एक विशेष समितीसुद्धा बनवली आहे.

तसंच AICC सेंट्रल इलेक्शन ऑथरिटीमध्येही मोठे बदल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पक्षात बदल करण्याबाबत पत्र लिहिलं होतं. यामध्ये गुलाम नबी आझाद आघाडीवर होते.

आझाद यांना सरचिटणीस पदावर हटवण्यात आलं असलं तरी त्यांना वर्किंग कमिटीमध्ये मात्र स्थान मिळालं आहे. काँग्रेस अध्यक्षांना लिहिलेल्या वादग्रस्त पत्रावर जितेन प्रसाद यांचीही स्वाक्षरी होती. त्यांना राज्य प्रभारी बनवण्यात आलं आहे. ही त्यांची प्रगतीच मानली जात आहे. त्यांना उत्तर प्रदेशहून पश्चिम बंगालला पाठवण्यात आलं आहे. पुढच्या वर्षी तिथं निवडणुका होणार आहेत.

काँग्रेसमधील या बदलाचा फायदा पक्षप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना झाला. सुरजेवाला आता काँग्रेस अध्यक्षांना सल्ला देणाऱ्या सहा सदस्यीय विशेष समितीचा भाग असतील. तसंच त्यांच्यावर काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारीही देण्यात आली आहे.

रणदीप सुरजेवाला यांना कर्नाटकचे प्रभारी बनवण्यात आलं असून प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाची जबाबदारी मिळाली आहे.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना मध्य प्रदेशचं काम सोपवण्यात आलं. हरीश रावत यांना पंजाब, ओमान चंडी यांना आंध्र प्रदेश, तारीक अन्वर यांना केरळ आणि लक्षद्वीप, जितेंद्र सिंह यांना आसाम तर अजय माकन यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे.

के. सी. वेणूगोपाल यांच्याकडे पक्षसंघटनाची जबाबदारी सोपवण्यात आली, तर मधुसूदन मिस्त्री यांना केंद्रीय निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं आहे.

राहुल गांधींचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनकीन टागोर यांना तेलंगणच्या प्रभारीपदी नियुक्त करण्यात आलं आहे.

विशेष समिती

24 ऑगस्टच्या CWC मध्ये झालेल्या निर्णयानुसार सहा सदस्यीय विशेष समिती बनवण्यात आली. ही समिती संघटन आणि इतर कामकाज संबंधित प्रकरणात सोनिया गांधी यांना सल्ला व सहकार्य देण्याचं काम करेल.

या विशेष समितीत ए. के. अँटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, के. सी. वेणूगोपाल, मुकूल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला यांचा समावेश आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)