कोरोना : आईला कोव्हिड-19 झाल्याचं कळल्यानंतर मुलाची आत्महत्या #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आज सकाळी प्रसिद्ध झालेली विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. आईला कोरोना आहे कळल्यानंतर मुलाची आत्महत्या

आईला कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे कळताच नाशिकमध्ये 23 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (17 जुलै) मध्यरात्री नाशिकरोड उपनगर परिसरातील रोकडोबावाडी इथे ही घटना घडली. झी न्यूजने ही बातमी दिली आहे.

आईला कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे कळताच मुलगा नैराश्यात गेला होता. त्यातच तो आईला पाहण्यासाठी रुग्णालयात गेला. आईला पाहून घरी परतल्यानंतर त्याने आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नाशिकमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे.

2. पनवेलमध्ये बलात्कारप्रकरणी गृहमंत्री माफी कधी मागणर-सोमय्या

पनवेल महानगरपालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये महिलेवर झालेल्या अत्याचारप्रकरणी गृहमंत्री कधी माफी मागणार, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीये.

रुग्णालय असो की कोरोना सेंटर, महिला कुठेच सुरक्षित राहिल्या नाहीत. कोरोना सेंटरमध्ये असा प्रकार घडत असेल तर कोरोना झालेल्या महिलेने घरातच मरायचे का? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला.

पनवेलमधील कोरोना सेंटरची भाजप नेत्यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. रुग्णालयातून रुग्ण पळून जाणे, मृतदेहांची अदलाबदल होणं हे आता नेहमीचं झालं आहे, असंही सोमय्या म्हणाले.

3. हनी ट्रॅप प्रकरणाची चौकशी करा, अन्यथा न्यायालयात जाऊ- फडणवीस

नागपुरातील साहील सय्यद या व्यक्तीच्या कथित ऑडिओ क्लिपचे प्रकरण गाजत असून, भाजपच्या दोन नेत्यांना हनिट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी संबंधित असलेल्या व आपला उल्लेख असलेल्या या क्लिपची आपण चौकशी करणार नसाल तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे ती क्लिप सादर करून चौकशीची विनंती करू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.

"मंत्रिपदाचे गांभीर्य असलेले नेते म्हणून आपल्याकडे पाहतो. पण आपण ज्या पद्धतीने पत्राला उत्तर दिले आहे त्यातून एका गंभीर विषयाचे राजकारण सुरू आहे," असं फडवणीस यांनी म्हटलं.

या क्लिपमध्ये केवळ हनिट्रॅपचा विषय नाही तर गृहमंत्र्यांनी फोन केल्याने आरोपी सुटले, न्यायव्यवस्था कशी मॅनेज केली यासंबंधीचे गंभीर आरोप आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा हव्यात की नकोत; विद्यार्थी न्यायालयात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा हव्यात की नकोत यासंदर्भात मेडिकल आणि लॉ कॉलेजमध्ये अंतिम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत 31 जुलैला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र टाईम्सने यासंदर्भात बातमी दिली आहे.

मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल्स रद्द करून ऑनलाईन परीक्षा घेण्यात याव्यात असा पर्याय सुचवला आहे तर विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षाच रद्द करण्याची विनंती केली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठ आयोगाने दिले आहेत. या दोन्ही निर्णयांना महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन आणि विधी शाखेच्या पाच विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे विरोध केला आहे.

5. सुशांत सिंग राजपूत संदर्भातील आरोप सिद्ध झाले नाहीत तर पद्मश्री परत करेन-कंगना रानौत

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येसंदर्भात केलेले आरोप सिद्ध झाले नाहीत तर पद्मश्री पुरस्कार परत करेन, असं वक्तव्य अभिनेत्री कंगना रानौत हिने केलं आहे. न्यूज18ने ही बातमी दिली आहे.

सुशांतने बॉलीवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली, असं कंगनाने म्हटलं होतं. दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना कंगनाने लक्ष्य केलं होतं. मुंबई पोलिसांनी मला बोलावले होते, मात्र मनालीत असल्यामुळे जबाब रेकॉर्ड करण्यासाठी कुणाला तरी पाठवा, अशी विनंती केल्याचं कंगनाने म्हटलं आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगनाने एक व्हीडिओही शेअर केला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)