कोरोना व्हायरसः भारतातील 30 टक्के रुग्ण तबलीगी जमातशी संबंधित #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्र आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या पाच महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला संक्षिप्त आढावा.

1) कोरोनाचे भारतातील 30 टक्के रुग्ण तबलीगी जमातशी संबधित - आरोग्य मंत्रालय

कोरोना व्हायरसच्या भारतातील एकूण रुग्णांपैकी 30 टक्के रुग्ण हे तबलीगी जमातशी संबंधित असल्याचे आरोग्य मंत्रलायच्या आकडेवारीवरुन समोर आलंय. सामनानं ही बातमी दिलीय.

आतापर्यंतच्या (4 एप्रिल) आकडेवारीनुसार भारतातील 1023 रुग्ण तबलीगी जमातशी संबंधित आढळले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली. त्यामुळं निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलीगी जमातच्या मरकज देशात कोरोना व्हायरस पसरवण्यास कारणीभूत ठरल्याचं ही आकडेवारी सांगते.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आग्रवाल हे कोरोना व्हायरसच्या भारतातील स्थितीची रोज माध्यमांना माहिती देत आहेत.

4 एप्रिल रोजी तबलीगी जमातशी संबंधित 17 रुग्ण देशाच्या विविध भागात आढळले. गेल्या 24 तासात भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अचानक वाढल्याचंही आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

2) मरकजहून परतलेल्या 5 दाम्पत्यांचं धारावीत वास्तव्य

दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित मरकज या धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या 5 दाम्पत्यांनी काही दिवस मुंबईतील धारावीत वास्तव्य केले. धारावीत कोरोनाच्या संसर्गामुळं ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याच परिसरात हे दाम्पत्य राहत होते. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

तीन दिवसांपूर्वी मुंबईतील धारावीत कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील अनेकांच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या. त्यानंतर आणखी काही कोरोनाबाधित व्यक्ती सापडल्या.

निजामुद्दीनहून परतलेली पाच दाम्पत्यं धारावीतल्या मशिदीत राहात होती. ही दाम्पत्यं मूळची केरळची आहेत.

या सर्व प्रकारानंतर धारावीतल्या शाहूनगर पोलिसांनी आता परिसरात छाननी सुरू केली असून, या व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी गेल्या, त्या सर्व भागातल्या लोकांच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या जात आहेत.

3) काही भागात लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो - राजेश टोपे

भारतातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनं 3000 चा टप्पा पार केलाय. ही चिंताजनक आकडेवारी पाहता, देशातील काही भागात लॉकडाऊनची मुदत वाढवली जाऊ शकते. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही शक्यता वर्तवलीय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसवर नियंत्रणासाठी 24 मार्च रोजी 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. येत्या 14 एप्रिल रोजी हा लॉकडाऊन संपेल.

मात्र, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलताना म्हणाले, "लोकांनी शिस्तीचं पालन केलं नाही, तर कोरोनाबाधितांची संख्या वाढतच जाईल. त्यामुळं मग लॉकडाऊन आणखी वाढवला जाऊ शकतो."

मुंबई आणि राज्याच्या ग्रामीण भागातील काही परिसरात आणखी दोन आठवडे लॉकडाऊन कायम ठेवला जाऊ शकतो, असंही राजेश टोपे म्हणाले.

4) कोरोनाचे भारतातील 83 टक्के रुग्णांचं वय 60 वर्षांपेक्षा कमी

कोरोना व्हायरसचे भारतातील 83 टक्के रुग्ण 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. 21 वर्षे ते 40 वर्षे या वयोगटातील रुग्णांची संख्या 41 टक्के आहे, अशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी सांगते. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

वयोवृद्धांना कोरोना व्हायरसची अधिक भीती असल्याचं बोललं जात असताना आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील 17 टक्के रुग्णच 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत.

कुठल्या वयोगटात किती रुग्ण?

  • 0-20 वर्षे - 8.61 टक्के
  • 21-40 वर्षे - 41.88 टक्के
  • 41-60 वर्षे - 32.82 टक्के
  • 60 वर्षांपेक्षा अधिक - 16.69 टक्के

5) कोरोनाशी लढण्यासाठी सव्वा लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

राज्यातील सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना आठवडाभर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लाईव्हमिंटनं ही बातमी दिलीय.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी महाराष्ट्र सरकार कसा प्रयत्न करतंय, हे सांगितलं.

दिड लाख व्हेंटिलेटर आणि अडीच लाख एन-95 मास्क उपलब्ध असल्याचे टोपेंनी सांगितलं. तसंच, आरोग्य पथकांमार्फत क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेच्या सर्वेक्षणासोबत प्रत्यक्ष संपर्काचं कामही सुरू झालंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)