महाराष्ट्रात येण्यासाठी परवानगी घेऊन यावं लागेल- राज ठाकरे
स्थलांतरित कामगारांच्या मुद्यावरून राजकारण तापू लागलं आहे. महाराष्ट्रासाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्राने वाऱ्यावर सोडलं असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. उत्तर प्रदेशचे कामगार हवे असतील तर आमची परवानगी घ्यावी लागेल असंही ते म्हणाले. असं असेल तर महाराष्ट्रात शिरतानाही परवानगी घेऊन यावं लागेल असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हेही आदित्यनाथांनी लक्षात ठेवावं", असं राज ठाकरे म्हणाले.
"महाराष्ट्र सरकारनेही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्राने पाळावा", असं राज यांनी म्हटलं आहे.



