केशरी कार्डधारकांना रेशन धान्याचं वितरण सुरू
केशरी कार्डधारकांना रेशन धान्याचं वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
केशरी कार्डधारकांना रेशन धान्याचं वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 24 हजार 942 वर पोहोचली आहे. त्यापैकी 5210 रुग्ण बरे झाले आहेत. तर 779 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
अनेक स्थलांतरित मजूरांना आपल्या घरी जायची इच्छा आहे. त्यांच्या मागणीबाबत राज्य सरकार केंद्र सरकारसोबत चर्चा करत आहे. केंद्राने परवानगी दिल्यास त्यांना घरी पोहोचवण्यात येईल, असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
धारावी झोपडपट्टी भागातील रुग्णांच्या नातेवाईकांना संस्थात्मक क्वारंटाईमध्ये ठेवण्यात येईल. ग्रीन झोनमध्ये व्यवहार सुरू ठेवायला हरकत नाही. पण लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र घेईल, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.
हॉटस्पॉट झोनमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, पण महाराष्ट्रात अद्याप कोरोना व्हायरसचा समूहसंसर्ग सुरू झालेला नाही, असंही टोपे यांनी सांगितलं.
मुंबईतील झोपडपट्टी परिसर असलेल्या धारावीत आज 21 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे धारावी परिसरातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 241 वर पोहोचली आहे. यापैकी 14 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेले 15 पोलीस अधिकारी व 81 पोलीस कर्मचारी आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे.
यापैकी 3 पोलीस अधिकारी व चार कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या 12 पोलीस अधिकारी व 77 पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्रसुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 69 हजार 374 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याअंतर्गत 14 हजार 955 जणांना अटक करण्यात आली आहे.
या कालावधीत दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांप्रकरणी 2 कोटी 63 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. या काळात अवैध वाहतूक केल्याप्रकरणी 1084 गुन्हे दाखल करण्यात आले. तर 45 हजार 168 वाहने जप्त करण्यात आली.
कोव्हिड-19 होऊन बरे झालेली व्यक्ती पुन्हा कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्यांना कोरोना व्हायरसची लागण पुन्हा होऊ शकते, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
कोव्हिड-19 मधून बरे झालेल्या आणि शरीरात कोव्हिडविरोधातले अँटी बॉडी असलेल्या लोकांना दुसऱ्यांदा संसर्ग होत नसल्याचा कोणताही पुरावा नाही, असं WHO ने म्हटलं आहे.
यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या 15 जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. त्यामुळे यवतमाळमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 30वर पोहोचली आहे.
हे सर्व व्यक्तिइतर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या थेट संपर्कात आले होते. तसंच त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा यात समावेश आहे, त्यांचे रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला आज प्राप्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवलं आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मदतनिधी जमा करण्यात येत आहे. याला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीत २८० कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटना अधिकृतपणे देत असलेल्या माहितीशी विसंगत माहितीवर युट्यूबकडून बंदी घालण्यात आली आहे.
गेल्या काही काळापासून युट्यूबवर कोरोना व्हायरसशी संबंधित अनेक व्हीडिओ अपलोक केले जात आहेत. पण वैद्यकीयदृष्ट्या निराधार असलेले व्हीडिओ आता डिलीट करण्यात येतील. लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचू नये यासाठी हा निर्णय घेतला आहे, असं युट्यूबचे मालकी हक्क असलेली कंपनी गुगलने स्पष्ट केलं आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आतापर्यंत 10 हजार 815 जणांना प्रशिक्षण दिल्याची माहिती शासनाने दिली आहे.
लॉकडाऊन काळजीपूर्वक उठवण्याची गरज आहे असं मत भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमणियन यांनी व्यक्त केले. आता तीन महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. हॉटस्पॉटकडे नीट लक्ष देणं, कामाच्या ठिकाणी योग्य सोशल डिस्टन्सिंग पाळलं आहे का याची खात्री करुन घेणं, तसेच अर्थव्यवस्थेला ज्या क्षेत्रांमुळे फटका बसला आहे, त्यांच्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. असं ते म्हणाले.
लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील विकासकामांना खीळ बसू नये,यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्रीनरेंद्र सिंह तोमर यांनी यांनी विविध राज्यातील मंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. महाराष्ट्रातर्फे रोजगार हमी योजना मंत्रीसंदीपान भुमरे यांनी संवाद साधला.
लॉकडाऊनमध्ये आपला माल मंडई पर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट सहकार्य करणार आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधावा, असं आवाहन मनुष्यबळ विकास, माहिती व प्रसारण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केलं आहे.