You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात कोरोनाचे 67 नवीन रुग्ण, सहा जणांचा मृत्यू
पाहा कोरोना व्हायरस विषयीचे देश जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...
लाईव्ह कव्हरेज
कोरोना व्हायरस टाळायचा असेल तर 'हे' करा आणि सुरक्षित राहा
कोरोना व्हायरस गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठं संकट - शक्तिकांत दास
कोरोना विषयक ताजे अपडेट्स वाचण्यासाठी
कोरोना विषयक ताजे अपडेट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मोदींची कल्पना म्हणजे तद्दन मूर्खपणा – जितेंद्र आव्हाड
येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिलला कोरोनाच्या संकटाला आव्हान द्यायचंय. या 5 एप्रिलला महाशक्तीचं जागरण करायचंय. त्यासाठी रात्री 9 वाजता 9 मिनिट घरातल्या सर्व वीज बंद करा आणि घराच्या दारात किंवा बाल्कनीत उभं राहून मेणबत्ती किंवा मोबाईलची लाईट लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
त्यांनी म्हटलं, "नरेंद्र मोदी जीवनावश्यक वस्तू, गरीब नागरिक, मास्क आणि सॅनिटायझरच्या उपलब्धतेविषयी बोलतील अशी सगळ्यांना अपेक्षा होती. पण, अंधार करा आणि लाईट फिरवा असं ते म्हणाले. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करावा असं मोदींना का वाटतं? हा तद्दन मूर्खपणा आहे, बालिशपणा आहे."
भाजप नेते राम कदम यांनी नरेंद्र मोदींच्या या कल्पनेचं स्वागत करत जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे, की देश एका अवघड संकटाचा सामना करत असताना समस्त 130 कोटी जनता एकत्रितपणे या संकटाशी संघर्ष करीत आहेत. या अंधकारमय परिस्थितीत तिमिराकडून प्रकाशाकडे जात असताना हातात आशेचा प्रकाशाचा दिवा घेऊन आम्ही 130 कोटी लोक या संकटाचा मुकाबला करायला एक आहोत, हा एकतेचा संदेश मोदींनी दिला आहे."
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या कोट्यावधी लोकांसाठी दिलेला मोफत धान्य कुठे गेले. दुर्दैवाने महाराष्ट्राचे सरकारने अजूनपर्यंत एक किलोही मोफत धान्य कोणत्याही गरिबापर्यंत पोहोचवलं नाही," असंही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे 67 नवीन रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 490
राज्यात आज कोरोनाचे 67 नवीन रुग्ण आढळले असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 490 वर पोहोचली आहे.
या 67 मध्ये मुंबई 43, मुंबई परिसरातील 10 ,पुणे 9, अहमदनगर 3, वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवीन 478 रुग्ण - आरोग्य मंत्रालय
देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 2 हजार 547 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत एकूण 62 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवीन 478 रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरस : जगात दिवसभर काय घडलं?
1.जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाखांच्या पुढे गेली असल्याचं अमेरिकेतील एका विद्यापीठाच्या अभ्यासातून समोर आलं आहे.
2.कोरोनामुळेआतापर्यंत 53 हजार जणांचा मृत्यू झाला असून 2 लाख 10 हजार जणांवरील उपचार यशस्वी झाले आहेत.
3.कोरोनामुळे अमेरिकेत दिवसभरात 1 हजार 169 जणांचा मृत्यू झाला आहे. ही जगातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद आहे.
4.कोरोनामुळे अमेरिकेतील 66 लाख लोक बेरोजगार होण्याची शक्यता आहे.
5.कोरोना व्हायरसची लक्षणं अद्यापही दिसत असल्यामुळे सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याची भूमिका इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी घेतली आहे.
6.सिंगापूरमधील शाळा आणि कामाची ठिकाणं पुढच्या एक महिन्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान ली हसेन लूंग यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र सरकारनं तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे मोठा अनर्थ टळला - अनिल देशमुख
बीबीसी मराठीनं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संवाद साधला. त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे -
1.तबलीगी जमातचा दिल्लीत जसा कार्यक्रम झाला, तसाच कार्यक्रम त्यांना मुंबईतल्या वसईत करायचा होता. यामध्ये जवळपास 50 हजार जण सहभागी होणार होते. सरकारनं 12 जानेवारीला त्यांना परवानगी दिली होती, पण नंतर कोरोनाचे रुग्ण समोर आल्यानंतर 6 मार्चला आम्ही या कार्यक्रमाची परवानगी रद्द केली. महाराष्ट्र सरकारनं तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
2. मुंबईत गर्दीचं प्रमाण जास्त आहे. एखाद्या झोपडपट्टीत कोरोनाचा पसार व्हायची शक्यता दाट असते. तरीसुद्धा सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे. धारावीला सरकारनं सील केलं आहे.
3.राज्यातील 95 टक्के लोक आम्हाला सहकार्य करत आहेत. फक्त 5 टक्के लोक हिंडताना दिसतात. आता मात्र आम्ही पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
4.अनेकांना कोरोना व्हायरसचं गांभीर्य कळलेले नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहेत. त्यांच्यावर हल्ले होत असतील, तर पोलीस त्याचा समाचार घेतील.
5. कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
6. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर 14 एप्रिलला लॉकडाऊन संपेल की नाही, हे त्यावेळची परिस्थिती पाहून ठरवलं जाईल.
7. सर्व समाजाच्या जनतेला आवाहन करतो, की धार्मिक कार्यक्रमासाठी कुणीही बाहेर पडू नये. घरी बसून देशसेवा करण्याची संधी सगळ्यांना मिळाली आहे.
8. मजूरांनी आहे तिथंच थांबावं, त्यांना आपल्या गावाकडे जाण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था सरकार करणार आहे. सरकार आज जवळपास 5 लाखमजुरांची व्यवस्था केली आहे.
मास्क आणि व्हेंटिलेटर्सवरील GST माफ करा -अजित पवारांची मागणी
कोरोना प्रतिबंधक मास्क, टेस्टींग आणि पीपीई किट्स्, व्हेंटिलेटर्सवरील ‘जीएसटी’ माफ करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना पत्राद्वारे केली आहे.
'लॉकडाऊन झालं आणि पोटभर जेवण मिळणं अशक्य झालं'
लॉकडाऊननंतर स्थलांतरित मजूर जसे रस्त्यावर आले,तसे रोजंदारीवर काम करणारे असंघटित क्षेत्रातील मजूरांचेही हाल झाले.
गुजरातच्या अहमदाबादमधील मजूर, फेरीवाले, आणि घरकाम करणाऱ्यांच्या वस्तीत दोन वेळचं अन्न मिळणं मुश्किल झालंय.
बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर छर्रा यांचा हा रिपोर्ट.
तबलीगी जमातच्या कार्यक्रमाशी संबंधित कोरोनाचे 647 रुग्ण - आरोग्य मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी कोरोना व्हायरस संदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे-
1. गेल्या 24 तासांत देशभरात 336 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2301 असून आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू झाला आहे.
2. देशातल्या 14 राज्यांत गेल्या 2 दिवसांत कोरोनाचे तबलीगी जमातच्या कार्यक्रमाशी संबंधित 647 रुग्ण आढळले आहेत.
3. देशातल्या सगळ्या संशोधन संस्था कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी संशोधन करत आहेत.
4. कोरोना व्हायरसचा सामना करत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणू नका, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.
5. काही ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहेत. याविषयी कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
6. आजपासून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल.
7. तबलीगी जमातशी संबंधित 960 विदेशी नागरिकांना ब्लॅकलिस्ट केलं आहे. 360 विदेशी जे विदेशात परतले आहेत, त्यांनाही ब्लॅकलिस्ट केलं आहे.
8. देशात 180 लॅबमध्ये कोरोनावर उपचार सुरू आहेत. यातल्या 130 लॅब सरकारी दवाखान्यांत आहेत, तर 50 खासगी दवाखान्यांत आहेत.
भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 56 जणांचा मृत्यू
भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसनं 56 जणांचा बळी घेतला आहे, तर देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजार 301 झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं ही बातमी दिली आहे.
भारताकडे पुरेसे व्हेंटिलेटर्स आहेत का? - सोपी गोष्ट
'माझे बाबा लॉकडाऊनचे नियम पाळत नाहीत'- मुलानेच केली पोलिसात तक्रार
माझे वडील लॉकडाऊनचे नियम पाळत नाहीत ते दररोज बाहेर जातात अशी तक्रार दिल्लीमधल्या वसंतकुंज येथे राहाणाऱ्या एका 30 वर्षीय मुलाने केली आहे.
क्वारंटाइनमध्ये महिला कर्मचारी, पोलिसांची नेमणूक नाही- उत्तर प्रदेश सरकार
तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेले लोक जेथे क्वारंटाईन करण्यात आले आहेत, ते जेथे उपचार घेत आहेत तेथे महिला आरोग्य कर्मचारी व महिला पोलिसांची नेमणूक करण्यात येणार नाही असा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे.
स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी याचिका, सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस
कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसलेल्या स्थलांतरित मजुरांना किमान वेतन देण्याचे आदेश सरकारला द्यावेत अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर कोर्टाने सरकारला नोटीस बजावली आहे.
'जिवंत राहायचंय बस, पुढचं पुढे पाहता येईल,' लॉकडाऊनमध्ये भरडलेल्या सेक्स वर्कर्सची कहाणी
कोरोनामुळे जगाच्या राजकारणाची दिशा बदलून जाईल असं तुम्हाला वाटतं का?
कोरोना व्हायरसच्या जागतिक प्रकोपादरम्यान चीन आणि अमेरिकेमध्ये एक युद्ध छेडलं गेलं आहे आणि दोन्ही देशांचं बरंच काही पणाला लागलं आहे.
चीनला जागतिक नेता व्हायचंय तर अमेरिकेच्या हातातून 'जगाचे पोलीस' ही भूमिका निसटताना दिसून येतेय. खरंतर अख्ख्या जगासाठीच हा चांगला काळ नाहीये. त्यात चीन आणि अमेरिकेचे आपसातले संबंधही चांगले नाहीयेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप वारंवार कोरोना व्हायरसला 'चीनी व्हायरस' म्हणत आहेत तर आक्रमक शैली असणारे त्यांचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ याला 'वुहान व्हायरस' म्हणत आहेत. अमेरिकेच्या अशा नाव ठेवण्याने साहजिकच चीन उखडला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- कोरोना व्हायरसची साथ आणि पडद्यामागून खेळलं जाणारं युद्ध