You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनामुळे 2 मृत्यू, रुग्णांचा आकडा 220

कोरोनामुळे देशात आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. महाराष्ट्रात एकूण 181 पॉझिटिव्ह

    राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 181 वर गेला आहे. एकूण 26 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून आणखी 28 नवीन रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती ऑल इंडिया रेडिओने दिली आहे.

  2. कोरोनाग्रस्तांवर फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार

    महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांवर मोफत उपचार केले जातील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करून सांगितलं.

    शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला, असंही ते म्हणाले.

    या योजनेत सध्या 492 खासगी रुग्णालयं सहभागी असून 1 एप्रिलपासून 1000 रुग्णालयांचा यात समावेश असेल, तसंच सहभागी रुग्णालयातील सुमारे 2,000 व्हेंटीलेटर्स उपलब्ध होतील, असंही टोपे यांनी सांगितलं.

  3. राज्यात कोरोनाची लागण झालेले 6 नवीन रुग्ण आढळले आहेत. यातील 5 मुंबई आणि 1 नागपूर येथील आहे. आता राज्यातील एकूण कोरोग्रस्तांची संख्या 159 इतकी झाली आहे.

  4. घरातलं वातावरण आनंदी ठेवा- मुख्यमंत्री

    कोरोनाचं संकट घराबाहेर आहे. त्याला घराबाहेरच ठेवा. बाहेर पडू नका. आता संकटाचं आभाळ कोसळलेलं नाही, बाहेर पडलात तर कोसळेल. म्हणून घरातच थांबा. आतापर्यंत सूचना पाळल्यात तशा पुढेही पाळा. परगावाला जाण्याचा प्रयत्न करु नका. पुढील 15 दिवस परीक्षेचे आहेत. ही आपल्यावर लादली गेलेली परिस्थिती आहे. त्याचा सामना स्वयंशिस्तीने करु. हे संकट लवकरात लवकर दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करु असेही उद्धव ठाकरे यांनी आपल्या आवाहनामध्ये सांगितले.

  5. डॉक्टरांनी दवाखाने बंद करु नये- उद्धव ठाकरे

    खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद करु नयेत. रुग्णांना सेवा द्यावी. जर संशयित रुग्ण असतील तर पुढील सरकारी यंत्रणेकडे त्यांना पाठवावे. डॉक्टरांनी या स्थितीत केलेली मदत विसरता येणार नाही. पोलीस आणि डॉक्टर आपल्या हितासाठी मदत करत आहेत. त्यांना सहकार्य केलं पाहिजे. त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे.

  6. परराज्यातील लोकांचीही जबाबदारी आपलं सरकार घेईल- मुख्यमंत्री

    परराज्यातील लोकांनी प्रवास करण्याचा प्रयत्न करु नये. त्यांचीही जबाबदारी आपलं सरकार घेईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

  7. जनतेने घराबाहेर पडू नये- उद्धव ठाकरे

    लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. नागरिकांनी शिस्त पाळली पाहिजे, दुकानं उघडण्याचा निर्णय धाडसी आहे. गर्दी टाळण्यासाठी तो घेतला आहे. त्यामुळे वस्तू खरेदीसाठी गर्दी करु नका. परराज्यातील लोकांनी बाहेर जाण्याचा, प्रवासाचा प्रयत्न करु नये.

  8. राज्यात कोरोनामुळे पाचवा मृत्यू

    आज राज्यात आणखी 28 कोव्हिड-19 झालेल्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 153 झाली आहे.

    या नवीन रुग्णांमध्ये इस्लामपूर, सांगलीमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील 15 व्यक्तींचा तर नागपूर मधील काल बाधित आलेल्या रुग्णांच्या 4 सहवासितांचा समावेश आहे.

    याशिवाय प्रत्येकी 2 रुग्ण मुंबई आणि ठाणे येथील असून पालघर, कोल्हापूर, गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे तर 1 रुग्ण गुजरात राज्यातील आहे.

    दरम्यान आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 65 वर्षाच्या एका वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा राज्यातील कोरोनामुळे झालेला पाचवा मृत्यू आहे.

    आज मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात एका 85 वर्षीय डॉक्टरांचा संशयित कोरोनासदृ्श्य आजाराने मृत्यू झाला. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. या रुग्णाला मधुमेह होता तसेच त्यांना पेसमेकरही होता. त्यांचे निदान खाजगी प्रयोगशाळेत झालेले असल्याने त्याबाबत खातरजमा करण्यात येत आहे.

  9. विदर्भ मराठवाड्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्य

    राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्यात येणार आहे.

    या योजनेच्या माध्यमातून एप्रिल, मे आणि जून 2020 या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात विदर्भ व मराठवाड्यातील या शेतकऱ्यांना प्रतिमाणशी 5 किलो अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

    देशभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या कालवधीत राज्यातील जनतेला अन्न, धान्य मुबलक व सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावे यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विविध योजना आखल्या जात आहे.

    त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्याचा निणर्य घेण्यात आला असून त्यांना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ प्रतिमानसी पाच किलो धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    या निर्णयानुसार राज्यातील औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व नागपूर विभागातील वर्धा या 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  10. सांगलीमधल्या आणखी 12 जणांना कोरोनाची लागण

    सांगली जिल्ह्यातल्या आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट आज स्पष्ट झालं आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 147 वर गेली आहे.

  11. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 135वर

    राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 135वर गेला आहे. तर 4228 जणांची तपासणी करण्यात आली. शिवाय आतापर्यंत 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

    कोरोना बरा होतोच. घाबरून जाऊ नये, असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

    मास्क फक्त रुग्ण आणि डॉक्टरांच्या उपयोगासाठी आहे असं सांगत आरोग्यसाठी काम करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर तरतूद करणाार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

  12. खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नयेत - राजेश टोपे

    खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नयेत. महासंकटाच्या काळात असंवेनशीलता दाखवू नका, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.

    नागरिकांनी रक्तदान करण्यांचं आवाहनही टोपे यांनी केलं आहे.

    सध्याच्या रुग्णांच्या जवळच्या व्यक्तींची तपासणी करण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंचा नियम कुणीही मोडू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

    गरिब घटकांसाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. तसंच अत्यंत शिस्तीने त्यांनी रेशनचं धान्य घेऊन जावं, असंही त्यांनी म्हटलंय.

  13. शरद पवारांनी मांडलेले प्रमुख मुद्दे

    1. कोरोनाचं संकट गंभीर आहे. सरकारनं गंभीर पावलं टाकली पाहिजेत.

    2. सरकार करत असलेल्या सूचना पाळायला हव्यात. सरकारला सहकार्य करायला हवं. घरात थांबा, हात धुवा, स्वच्छता पाळा, ही प्रत्येक गोष्ट तंतोतंत पाळली पाहिजे. नाहीतर त्यांची मोठी किंमत मोजावी लागेल.

    3. शेती, उद्योग, कारखानीदारी, बेरोजगारी या सगळ्या क्षेत्रावर मोठा परिणाम कोरोना व्हायरसचा परिणाम होणार आहे.

    4. धान्य मोफत देण्याच्या सरकारच्या धोरणाचं मी स्वागत करतो, पण त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम काय असेल, याचाही विचार सरकारनं करावा.

    5. सामान्य नागरिकांच्या हितासाठी आणखी काही निर्णय केंद्र आणि राज्य सरकारनं घ्यावेत.

    6. राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांचं एक महिन्याचं वेतन सहाय्यता निधीत देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. अजून जे काही करता येईल, त्यात आम्ही सहकार्य करू.

    7. पोलिसांनी सुरुवातीला काही कठोर भूमिका घ्यावी लागली, ती थोडे दिवस सहन केली पाहिजे, त्यामुळे आता लोकांच्या वर्तणुकीत फरक आला आहे. पण आता परिस्थिती बदलत आहे, हे लक्षात घेऊन पोलिसांनी आपलं धोरण बदलायला हवं

  14. शेतीसाठीचं पॅकेज पुरेसं नाही - शरद पवार

    सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज शेतीसाठी पुरेसं आहे असं वाटत नाही. कारण पीककर्जाची परतफेड होईल, असं वाटत नाही. कारण आजही अनेक पीकं शेतातच आहेत. द्राक्ष, संत्रा बागा शेतात आहेत. त्यांची तोड कशी करायची, ते बाजारात कसं आणायचे, हे प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे या कामासाठी त्यानं जे कर्ज काढलं, त्यासाठी ४ ते ५ वर्षं हप्ते दिले पाहिजेत. आणि पहिलं वर्षं व्याजामध्ये पूर्ण सूट दिली पाहिजे.

  15. नाही तर मोठी किंमत मोजावी लागेल - पवार

    सरकार करत असलेल्या सूचना पाळायला हव्यात. सरकारला सहकार्य करायला हवं. घरात थांबा, हात धुवा, स्वच्छता पाळा, ही प्रत्येक गोष्ट तंतोतंत पाळली पाहिजे. नाहीतर त्यांची मोठी किंमत मोजावी लागेल.

  16. कोरोनाचं संकट गंभीर - शरद पवार

    राज्य आणि देशावरील कोरोनाचं संकट गंभीर आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार अशा सगळ्या क्षेत्रांवर त्यांचा परिणाम होत आहे.

  17. आरबीआयकडून CRR मध्ये 1 टक्क्याची कपात

  18. कोविड19च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत पैसा खेळता ठेवणं हे पहिलं उद्दिष्ट- आरबीआय

  19. महाराष्ट्रातला कोरोनाबाधितांचा आकडा 135 वर

    महाराष्ट्रातला कोरोना बाधितांचा आकडा सतत वाढत आहे. आता हा आकडा 135 वर गेला आहे. नागपुरात 3 पुरूष आणि 3 महिलांना याची लागण झाली आहे.

  20. 2020मध्ये 5% विकासदराचं उद्दिष्ट गाठणं कठीण

    2020मध्ये 5% विकासदराचं उद्दिष्ट गाठणं कठीण असल्याचं आरबीआयनं मान्य केलं आहे.

    मूडीजने भारताचा आर्थिक विकासदर अंदाज 5.3 वरून 2.5 टक्क्यांवर आणला आहे.