कोरोना व्हायरस : ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप लांबणीवर; आयपीएलचा मार्ग मोकळा?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन, ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप लांबणीवर ढकलण्यात आला आहे. आता ही स्पर्धा 2021 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित होणार आहे. किंवा 2022 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे.

ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप लांबणीवर गेल्याने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या तेराव्या हंगामाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात 18 ऑक्टोबर आणि 15 नोव्हेंबर या कालावधीत होणार होता. यंदाच्या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार होते.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयोजित पहिलावहिला ट्वेन्टी-20 जिंकला होता. 2009 मध्ये पाकिस्तानने तर 2010 मध्ये इंग्लंडने ट्वेन्टी-20 विश्वविजेतेपदावर कब्जा केला होता. 2012मध्ये वेस्ट इंडिजने तर 2014मध्ये श्रीलंकेने जेतेपदाला गवसणी घातली होती. 2016 मध्ये वेस्ट इंडिजने दुसऱ्यांदा जेतेपदाची कमाई केली होती.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अंपायर्स, मॅचरेफरी, ब्रॉडकास्ट टीम यांचं आरोग्याचा प्रश्न होता. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावर अनेक निर्बंध आहेत. यंदाच्या वर्ल्डकपमधील संघांची संख्या लक्षात घेता कोरोनाच्या नियमावलीचं पालन करून स्पर्धा आयोजित करणं अवघड होतं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तसे संकेतही दिले होते. आयसीसीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

आयपीएल होणार?

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा यंदा युएई अर्थात संयुक्त अरब अमिराती इथे सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. IPL 2020 यंदा 29 मार्च ते 17 मे या कालावधीत आयोजित करण्यात आलं होतं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळाकरता ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती.

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भारतात ही स्पर्धा खेळवणं अवघड आहे. आयपीएल स्पर्धेत परदेशी खेळाडूही तसंच सपोर्ट स्टाफ असे मोठ्या प्रमाणावर अन्य देशातील माणसं सहभागी होतात.

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांची नावं आयपीएल आयोजनासाठी चर्चेत होती, परंतु टाईम झोनमुळे युएईला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. श्रीलंकेतही आयोजन होऊ शकतं अशी चर्चा होती.

कोरोनामुळे आयपीएलचं आयोजन होऊ शकलं नाही तर बीसीसीआयला 4000 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आयपीएल आयोजनासाठी बीसीसीआयसह फ्रंचाइजी उत्सुक आहेत.

दरम्यान युएईमध्ये शारजा, दुबई आणि अबूधाबी या तीन स्टेडियममध्ये मॅचेस खेळवण्याचा प्रस्ताव आहे. सर्व मॅचेस प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्याचा प्रस्ताव आहे.

2014 मध्ये सार्वत्रित निवडणुकांमुळे स्पर्धेचा पहिला टप्पा युएईतच खेळवण्यात आला होता. 2009 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे अख्खी स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)