You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वज्रमूठ सभा : मी 6 मे रोजी बारसूमध्ये जाणार – उद्धव ठाकरे
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा सोमवारी मुंबईत झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ते 6 मे रोजी बारसूमध्ये जाणार असल्याची घोषणा केली आहे.
हे उलट्या पायाचं सरकार असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे.
या सभेत अजित पवार यांनी कुणाचंही नाव न घेता टीका केली आहे. "अलिकडे टिल्ली टिल्ली लोकही काहीही बोलायला लागलेत, काय बोलतो काय कळत नाही," असं अजित पवार म्हणाले आहेत.
तसचं त्यांच्याबाबत सतत पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचंसुद्धा त्यांनी म्हटलंय. जाणिवपूर्वक काही बातम्या पसरवल्या जातायेत, असा आरोपसुद्धा अजित पवार यांनी केला आहे.
मी 6 मे रोजी बारसूमध्ये जाणार - उद्धव ठाकरे
- बारसूत माझ्या नावानं पत्र दाखवतायेत, उद्धव ठाकरेंनी ही जागा सूचवली होती. माझ्या पत्रात तिथं पोलिसांना घुसवा, लाठ्या मारा, अश्रूधूर सोडा, असं लिहिलंय का?
- बारसूत जर पत्र मी दिलं होतं, म्हणून स्वत:चं बारसं करणार असाल, तर मग पालघरमध्ये काय केलं?
- महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि मुंबईची बीकेसीची जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली.
- सरकार आल्या आल्या आरे कारशेडला स्थगिती दिली आणि कांजूरची जागा दिली. कारण पर्यावरणाचा विचार केला.
- केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या सेवेसाठी बांधिल असतात. मात्र, ते कोर्टात जाऊन तिथं अडवणूक केली.
- मी कारशेडला नाही म्हटलं नव्हतं, जागेला नाही म्हटलं होतं.
- मुंबईतून उद्योग बाहेर नेतायत, कार्यालयं बाहेर नेतायत.
- मुंबईचं ओरबाडून घ्यायचं आणि मुंबईला बकाळ करायचं.
- महाराष्ट्रापासून मुंबई तोडेल, त्याचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही.
- देशात सर्वांत जास्त महसूल देणारं शहर आपली मुंबई आहे, मुंबईचे धागेदोरे कापण्याचे प्रकार करतायेत.
- आता मुंबई महापालिकेच्या ठेवींवर डोळा आहे, मुंबईची लूट, महाराष्ट्राची लूट हे भांडवलदारी वृत्तीचे सरकार करतायेत.
- बाळासाहेबांचे विचार तुमच्यात असते, तर गद्दारी केलीच नसती.
- महाविकास आघाडीचं सरकार असताना मराठी भाषा सक्तीची केली होती, सरकार पाडल्यानंतर तो निर्णयसुद्धा फिरवला. मराठी शिकवायची की नाही, हे शाळांवर सोडून दिलं, ऐच्छिक केलं.
- यांची विकृती इतकी की, स्वत:ला हिंदूहृदयसम्राट होता येत नाही, म्हणून बाळासाहेब ठाकरेंचं महत्त्व कमी करतायेत.
- हे उलट्या पायाचं आणि उलट्या काळजाचं सरकार आहे.
- माझ्या कोकणातील आंबा उत्पादकांचं झालेलं नुकसान भरून द्या.
- तुम्ही माझा बाप चोरायला लागलात, तुमच्या आई-वडिलांना काय वाटत असेल?
- आमचं हिंदुत्त्व गोमूत्रधारी नाही, आमचं हिंदुत्त्व राष्ट्रीयत्व आहे.
हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार - आदित्य ठाकरे
थोड्या दिवसांचा खेळ आहे, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार - आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, "हे अवकाळी सरकार आहे. शेतकऱ्यांचे ऐकायला एक मंत्री नाही. गुजरात आणि महाराष्ट्र एक दिवस स्थापना झाली. पण गुजरात दोन मुख्यमंत्री मिळाले आहेत."
"शिवसेनेनं ज्यांना मोठं केलं, ते साथ सोडून गेले. पण तुम्ही सोबत राहिलात. तुमचे मनापासून आभार मानतो," असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
अजित पवार वज्रमूठ सभेत काय म्हणाले?
- हे सरकार आल्यापासून सर्व निवडणुकीत महाविकास आघाडीनं चांगलं यश मिळवलं.
- अनेक अडचणी असतानाही आम्ही महाविकास आघाडीचं सरकार चालवलं.
- महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडतोय, माझा शेतकरी अडचणीत आहे, पण तिथं मदतीची भूमिका राज्यकर्ते घेत नाहीत.
- शिंदे-फडणवीस काय करतायेत? पण त्यांना बाकीच्या कामात जास्त रस आहे.
- नुसती जाहिरातबाजी करतायेत. त्यांचे फोटो कुणाला पाहायचे आहे. कारण लोकांच्या मनातलं सरकार नाही. हे गद्दारी करून आलेलं सरकार आहे.
- या सरकारला कोर्टानं नपुसंक म्हटलं. त्याचीही लाज यांना नाहीय.
- कोर्टानं फटकारल्यानंतरही नैतिकदृष्ट्या मुख्यमंत्र्यांना काय वाटत नाही.
- अलिकडे टिल्ली टिल्ली लोकही काहीही बोलायला लागलेत, काय बोलतो काय कळत नाही.
- राजू शेट्टींनी सांगितलं की, बदल्यांचे दर ठरलेत. असं कधी झालं नव्हतं.
- महाराष्ट्रात कधीही घडलं नव्हतं, असा भ्रष्टाचारी कारभार सध्या चाललाय.
- सर्व महापालिकांचा कारभार मंत्रालयातून हलतोय, हे महाराष्ट्राला परवडणारं नाही.
- यशवंतरावांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत जाहिरातबाजीवर किती खर्च झाला आणि आताचा पाहा. हा जनतेचा पैसा आहे. तुमचा स्वत:चा पैसा नाही. जनतेच्या पैशावर तुमचा उदोउदो कोण चालवून घेणार आहे?
- मधल्या काळात 150 बैठका घेणारा नवा हिंदकेसरी महाराष्ट्राला मिळाला.
- महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी पाताळयंत्री कारभार सुरू आहे. ही कुठली लोकशाही? अशी सरकारं पाडायला लागलात, तर लोकशाही जिवंत कशी राहणार?
- सत्ता येते-जाते, सत्तेसाठी हापापले आम्ही नाही. पण जनतेच्या विश्वासाला कुठे तडा जाऊ देता कामा नये.
संजय राऊत वज्रमूठ सभेत काय म्हणाले?
- दादांचं सगळ्यांना आकर्षण आहे, दादा येणार की नाही, असं विचारलं जातंय. दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार
- या देशाचा पंतप्रधान फक्त मन की बात करतोय, काम की बात करत नाहीय
- ही वज्रमूठ सबा काम की बात करेल.
- मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी शिवसेनेवर घाव घातला गेला.
- ही शिवसेना या मुंबईत पाय रोवून उभी राहील आणि तुमचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाही.
- काही बोललो की आत टाका, मी आत जाऊन आलोय, तुमच्या बापाला घाबरत नाही.
- ही वज्रमूठ नसून, हे मजबूत मनगट आहे. हमसे जो टकराएगा, मिट्टी में मिल जाएगा.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)