You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नितीन गडकरी : 'मी म्हणालो, मंत्रिपद गेलं तरी चालेल...' #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्या
1. 'मी म्हणालो, मंत्रिपद गेलं तरी चालेल...'
कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि स्पष्ट बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रसिद्ध आहेत. अनेक व्हीडिओंमधून ते आपण पूर्वी कशाप्रकारे स्पष्ट उत्तरं दिली हे भाषणात सांगत असल्याचं दिसलं आहे.
आताही अशाच एक भाषणाचा व्हीडिओ समोर आला आहे. लोकसत्ताने या भाषणाची बातमी प्रसिद्ध केली आहे.
यामध्ये नितीन गडकरी यांनी एक जुना अनुभव सांगितला आहे.
गडकरी म्हणाले, "आपला निर्णय गरिबाच्या हिताचा असेल आणि त्याला न्याय मिळणार असेल तर कायदा तोडा असं महात्मा गांधींनी सांगितलं होतं. पण वैयक्तिक स्वार्थ किंवा इतर कोणतं उद्दिष्ट असेल तर ते चुकीचं आहे."
"मी महाराष्ट्रात मंत्री असताना अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये अडीच हजार मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला होता. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर हाहाकार माजला होता. त्यावेळी आमचे मुख्यमंत्री मनोहर जोशी मला ही नेमकी काय स्थिती आहे, मेळघाटातील 450 गावात एकही रस्ता नाही याबद्दल विचारणा करायचे," असं ते सांगतात.
ते पुढं म्हणाले, "मी मंत्री असल्याने बैठका घेत असायचो. अधिकारीही बैठकीला असायचे. एकदा मनोहर जोशी यांनी त्यांना 'इतकी लोकं मेली तुम्हाला काहीच वाटत नाही का? मुलं शाळेत नाही जाऊ शकत, वीज नाही आणि तुम्ही वन पर्यावरण कायद्यांअंतर्गत काहीच करु देत नाही' अशी विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्याने 'माफ करा, पण मी असहाय्य आहे, काहीच करु शकत नाही' असं उत्तर दिलं".
"यानंतर मला राहावलं नाही. हे माझ्यावर सोडा, काय परिणाम होतील याची मला चिंता नाही, पण मी हे काम करणार असं मी अधिकाऱ्याला सांगितलं. तुम्हाला शक्य झालं तर माझ्या पाठीशी उभे राहा, नाही राहिलात तरी हरकत नाही. मंत्रिपद गेलं तरी चालेल असं म्हटलं होतं," अशी आठवण गडकरींनी सांगितली.
ज्ञानेश्वर मुळे यांच्या 'नौकरस्याही के रंग' या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथे झाले. त्या कार्यक्रमात गडकरी यांनी ही आठवण सांगितली आहे.
2. गणेशोत्सवासाठी भविष्यात विमानाचीही सोय करू - नितेश राणे
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी विशेष ट्रेन, बसची सोय करण्यात येत आहे.
पुढच्या काळात बस आणि ट्रेनच नाही तर विमानही सोडू, असं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.
नितेश राणे म्हणाले, "यंदा कोकणात जाणाऱ्यांसाठी बसेस आणि रेल्वेची सोय करण्यात आली आहे. कोकणवासीयांची जेवढी सेवा, भाजपा आणि आमच्याकडून होते आहे, तेवढी दुसरे कोणते पक्ष करत असतील, असं वाटत नाही. सध्या कोकणात बस आणि रेल्वे जात आहेत, भविष्यात विमानांचीही सोय आम्ही करणार." ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
3. तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले हे जनतेनं पाहिलं- प्रवीण दरेकर
शिवसेनेतील ठाकरे गट आणि भाजपा यांच्यामधील दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा एकदा भाजपावर टीका केली.
भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत जहाल भाषेत टीका केल्यानंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. कालच्या कार्यक्रमा उद्धव ठाकरे यांनी भाजपाला तुमचा पक्ष आहे की चोरबाजार असा प्रश्न विचारला होता.
"इतक्या खालच्या दर्जाची टीका मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीवर करणे चुकीचं आहे. शिंदे आताच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना काम करू द्या. दोन महिने झाले नाहीत तर एवढा पोटशूळ उठण्याचं कारण नाही. गेल्या अडीच वर्षांत तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले हे जनतेने पाहिलं आहे." अशा शब्दांमध्ये दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
4. 40 आमदार फोडण्यासाठी भाजपाचे 800 कोटी रुपये तयार- अरविंद केजरीवाल
भारतीय जनता पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षातील संघर्ष अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे.
भारतीय जनता पार्टी आपला पक्ष फोडण्याच्या तयारीत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यासाठी भाजपाने पैसेही तयार ठेवल्याचं ते सांगतात. ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.
आपच्या आमदारांना फोडण्यासाठी प्रत्येकी 20 कोटी रुपयांचे आमिष दाखविले जात आहे. 40 आमदारांना फोडण्यासाठी भाजपने 800 कोटी रुपये तयार ठेवले असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.
5. शिंदे-ठाकरे वादावर 29 ऑगस्टला सुनावणी
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचावर आणि सत्तासंघर्षावर 29 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
काल 25 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होईल असे वाटले होते मात्र हा खटला पटलावर आलाच नाही.
आज सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा निवृत्त होत आहेत. त्यानंतर नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल. सामनानेही बातमी प्रसिद्ध केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)