किरीट सोमय्यांमुळे शिंदे गटात नाराजीची पहिली ठिणगी #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. किरीट सोमय्यांमुळे शिंदे गटात नाराजीची पहिली ठिणगी

एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या पोहोचले. त्यानंतर त्यांनी ट्वीट करून या भेटीचा फोटो शेअर केला. या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनवरून शिंदे गटातले आमदार नाराज झाले आहेत.

किरीट सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन केलं."

या ट्वीटवरून शिंदे गटातील आमदार नाराज झाले आहेत. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

शिंदे गटाची माध्यमांमधून बाजू मांडणारे आमदार दीपक केसरकर म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असा शब्द वापरणे आम्हाला मान्य नाही. अशा शब्दांचा वापर केला जाऊ नये."

2. शिवसेनेचे खरे वारसदार एकनाथ शिंदेच - देवेंद्र फडणवीस

"बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खरे वारसदार एकनाथ शिंदे हेच आहेत, उद्धव ठाकरे हे केवळ कौटुंबिक वारसदार आहेत," असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठामपणे उभी राहणारी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे."

तसंच, "पारिवारिक वारसा हा उद्धव ठाकरे यांच्याकडे असला तरी वैचारिक वारसा सुद्धा महत्त्वाचा असतो. हा वैचारिक वारसा घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात आहेत," असंही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यावर शिवसेनेकडून अधिकृतरित्या प्रतिक्रिया आली नसली, तरी सोशल मीडियावर शिवसेना समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

3. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसेनेची 'निष्ठा यात्रा'

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. ठाकरे गटा कमकुवत झाल्याची चर्चा असतानाच, आदित्य ठाकरे 'निष्ठा यात्रा' काढत बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

आजपासून म्हणजे 8 जुलैपासून आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांचे दौरे करणार आहेत.

मुंबईतील शिवसेनेच्या शाखांना भेटी देऊन शिवसैनिकांशी संवाद साधून आदित्य ठाकरे या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. या दौऱ्याला 'निष्ठा यात्रा' असं नाव देण्यात आलंय.

मुंबईतील 236 शाखांना आदित्य ठाकरे भेटी देतील. यातून पक्षविस्तार आणि पक्षबांधणी हे हेतू साधण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

4. 'गुलाबरावांना कंटाळून शिवसेना सोडली, पण तेच पदरात पडले'

एकनाथ शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील यांचा कार्यकर्त्यांसोबत झालेल्या संवादाचा एक फोन कॉल व्हायरल झाला आहे. या व्हायरल कॉलमध्ये ते म्हणतात, "गुलाबरावांना कंटाळून सेना सोडली पण तेच पदरात आले."

शिंदे गटातील अंतर्गत वादही या निमित्तानं चव्हाट्यावर आला आहे. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेशी बंड केला आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले.

दरम्यान शिवसेनेत आपल्याला चांगली वागणूक मिळत नाही, आपलं म्हणणं ऐकूण घेतलं जात नाही, आपल्याला निधी दिला जात नाही अशा कारणांमुळे शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड पुकारलं होतं.

5. व्हिवो कंपनीची 465 कोटींची संपत्ती जप्त

व्हिवो या चिनी स्मार्टफोन कंपनीची 465 कोटींची संपत्ती भारताच्या अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) जप्त केली आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

व्हिवो कंपनी आपल्या मिळकतीमधील 62 हजार 476 कोटी रुपये म्हणजे जवळपास 50 टक्के रक्कम चीनला पाठवल्याचे ईडीच्या चौकशीत उघड झाले आहे. चीनला पाठवलेल्या रकमेचा करही भारतात भरण्यात आला नसल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

ईडीने व्हिवोचे 119 बँक अकाऊंट ब्लॉक केले असून, 465 कोटींची संपत्ती जप्त केली. त्यात 73 लाखांची रोख रक्कम आणि 2 किलो सोन्याचाही समावेश आहे. मनी लाँडरिंगचा आरोप व्हिवोवर करण्यात आलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)