अनिल देशमुखांच्या मुलाला घेऊन अजित पवार नितीन गडकरींच्या भेटीला #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1) अनिल देशमुखांच्या मुलाला घेऊन अजित पवार नितीन गडकरींच्या भेटीला

महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा सामना ऐन रंगात असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटले. यात विशेष म्हणजे, या भेटीदरम्यान महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुखही उपस्थित होते. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

या भेटीदरम्यान महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलही उपस्थित होते.

या बैठकीबाबत अजित पवार म्हणाले की, राज्यातील रस्त्यांसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा म्हणून नितीन गडकरींकडे मागणी केली.

विकास कामात कुठे राजकारण येऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या घरी जाऊन चर्चा केली, असंही अजित पवार सांगितलं.

अजित पवारांनी रस्ते आणि इतर विकासकामांचं कारण या भेटीमागे असल्याचं सांगितलं असलं, तरी राजकीय वर्तुळात या चर्चेला उधाण आलं आहे. त्यात सलील देशमुख हे या भेटीदरम्यान सोबत असल्यानं या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे.

2) वीज संकट गंभीर, कोळसा पुरवठ्यासाठी रेल्वेच्या 753 फेऱ्या रद्द

भारतातील कोळशाचा साठा कमी असल्यानं वीज संकट गंभीर होत चाललं आहे. त्यामुळे देशभरात वेळेवर कोळसा पुरवठा व्हावा म्हणून भारतीय रेल्वेनं पुढाकार घेतला असून, 42 रेल्वेगाड्यांच्या 753 फेऱ्या रद्द केल्या आणि कोळसा वाहतुकीस प्राधान्य दिलं. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली.

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या (SECR) 713 रेल्वे फेऱ्या 25 मे पर्यंत, तर उत्तर रेल्वेच्या (NR) 40 फेऱ्या 8 मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

छत्तीसगड, ओडिसा, मध्य प्रदेश आणि झारखंड या चार कोळसा उत्पादक राज्यांमधील रेल्वेप्रवाशांना याचा काही प्रमाणात फटका बसणार आहे.

महाराष्ट्र, पंजाब, झारखंड, बिहार, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश ही राज्यं प्रामुख्यानं कोळसा तुटवड्यामुळे वीज संकटाचा सामना करत आहेत.

3) गुजरातमधील बंदरा 450 कोटींचं हेरॉईन जप्त

गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील पिपावाव बंदरावरून 90 किलोचं हेरॉईन जप्त करण्यात आलं. हे हेरॉईन इराणमधून आलं होतं. गुजरात अँटी-टेररिस्ट स्क्वाड (ATS) आणि डायरेक्टोरेट ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजियन्स (DRI) यांनी ही संयुक्त कारवाई केली.

या 90 किलो हेरॉईनची किंमत सुमारे 450 कोटी रुपये इतकी आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.

हेरॉईनच्या तस्करीसाठी अनोखी पद्धत वापरण्यात आली होती. हेरॉईनमध्ये धागे भिजवण्यात आले होते आणि त्यांची तस्करी करण्यात येत होती. यासंदर्भात पुढील तपास करण्यात येत आहे.

4) नव्या भारतामध्ये हत्यांची परंपरा वाढीस - तुषार गांधी

नव्या भारतात दिवसेंदिवस हत्यांची परंपरा वाढीस लागत आहे, अशी खंत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी व्यक्त केलीय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

तुषार गांधी म्हणाले, "समाजामध्ये विचारपूर्वक द्वेष पसरविला जात असून त्यासाठी इतिहासाचा वापरही होत आहे. हा द्वेष केवळ हिजाब आणि भोंग्यापर्यंत थांबणार नाही, तर तो उद्या तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आतापासूनच आपण सतर्क राहिले पाहिजे."

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र फाउंडेशन, मासूम आणि परिवर्तन यांच्यातर्फे तुषार गांधी यांच्या हस्ते हरियाणातील अंशुल छत्रपती यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्या वेळी गांधी बोलत होते.

5) लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आज लष्कप्रमुखपदाची पदभार स्वीकारणार

भारताचे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आज (30 एप्रिल) पदभार स्वीकारणार आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली.

मूळचे नागपूरचे असलेले जनरल मनोज पांडे हे चौथे मराठी अधिकारी भूदलाच्या प्रमुखपदी विराजमान होत आहेत. सलग दुसऱ्यांदा हा मान मराठी सुपुत्राला मिळाला आहे.

पांडे हे डिसेंबर 1982 ला राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि त्यानंतर इंडियन मिलिटरी अकदमीमार्फत (IMA) लष्करात अधिकारी झाले.

सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे आजच (30 एप्रिल) निवृत्त होत असताना, त्याचदिवशी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हा पदभार स्वीकारणार आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)