You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत लॉकडाऊन लागण्याची शक्यता, महापौरांनी दिले स्पष्ट संकेत
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
मुंबईत दररोज 20 हजारांपेक्षा जास्त कोव्हिड रुग्ण आढळल्यास लॉकडाऊन लावावा लागेल असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. मुंबईमध्ये मंगळवारी (4 जानेवारी) 10,860 नवीन रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत ओमिक्रॅानच्या आकड्यांचा स्फोट झालाय. गेले काही दिवस दररोज शहरात 8 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबईत पुन्हा कोरोना लॉकडाऊनची चर्चा सुरू झालीय.
लॉकडाऊनबाबत बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "केंद्राच्या नियमांनुसार रुग्णसंख्या 20 हजारांपेक्षा जास्त झाली. तर लॉकडाऊन करावा लागेल."
कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी पॅाझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या वर गेल्यास कडक निर्बंध लागू करा, अशी सूचना केंद्राने केली होती.
मुंबईतील कोरोनाची परिस्थिती काय?
ओमिक्रॅानची तिसरी लाट मुंबईत झपाट्याने पसरतेय. मुंबईत सद्यस्थितीत अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 37 हजारावर पोहोचलीय.
मुंबईत महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत 4 जानेवारीला 10,606 नवीन रुग्ण आढळून आले. यापैकी 834 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. यापैकी 52 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत.
3 जानेवारीला 8082 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 7273 एसिम्टोमॅटिक होते. सोमवारी 573 रूग्ण उपचारासाठी दाखल झाले. रविवारच्या तुलनेत हा आकडा 15 टक्क्यांनी वाढला.
मुंबईत सद्यस्थितीत 127 रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलंय. मुंबईतील कोरोनारुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा डबलिंग रेट 138 दिवसांपर्यंत खाली आलाय.
दिवसेंदिवस वाढणार्या कोरोनासंसर्काने सरकार आणि मुंबई महापालिकेची चिंता वाढलली आहे.
लॉकडाऊनबाबत महापौर काय म्हणाल्या?
केंद्राने कोरोना संसर्गाची उपाययोजना म्हणून टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल त्या जिल्ह्यात निर्बंध कडक करण्याची सूचना केली होती.
ओमिक्रॅानच्या झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय आहे? हा प्रश्न मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारण्यात आला.
यावर बोलताना त्या म्हणाल्या, "लॉकडाऊन कोणालाच नकोय. पण लोकांनी मास्क घातला पाहिजे, गर्दी करू नये आणि लस लवकरात लवकर घ्यावी. लोकांनी काळजी घेतली तर लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवणार नाही."
मुंबईतील टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेट 17 टक्क्यांच्या वर पोहोचलाय. येत्या काळात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत लॉकडाऊन करावा लागेल का? यावर पुढे बोलताना महापौर पुढे म्हणाल्या, "मुंबईतील रुग्णसंख्या 20 हजारपेक्षा जास्त झाली तर केंद्राच्या नियमांची पूर्तता राज्य सरकार आणि मुंबई महापालिका करेल. केंद्रांच्या नियमांनुसार रुग्णसंख्या 20 हजारावर गेली तर लॉकडाऊन करावा लागेल."
मुंबईतील वाढत्या कोरोनासंसर्गाबाबत पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी देखील अशाच प्रकारची शक्यता व्यक्त केली आहे.
एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इक्बालसिंह चहल म्हणतात, "मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत लॉकडाऊनबद्दल चर्चा झाली. पण, लॉकडाऊन किंवा निर्बंध कडक करण्यासाठी पॅाझिटिव्हिटीपेक्षा रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजनची मागणी विचारात घेऊन पुढचा निर्णय घ्यावा असं मी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुचवलंय."
मुंबईत कोरोना आकड्यांचा स्फोट झाला असला तरी दोन दिवसात रुग्णालयांवर ताण पडलेला नाही. ऑक्जिजनची मागणी वाढलेली दिसून आलेली नाही.
ते पुढे म्हणाले, "मुंबईत 20 हजार रुग्ण जरी आले तरी, मुंबईत उपलब्ध असलेले बेड्स पुरेसे असतील."
मुंबईत सद्यस्थितीत 30 हजारापेक्षा जास्त बेड्स कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.
"मुंबईत केसेस त्यापेक्षा जास्त झाल्या तर त्याबाबत निर्णय घेतला जाईल," ते म्हणाले.
लॉकडाऊनबाबत राज्य सरकारची भूमिका काय?
दुसरीकडे, राज्यात लॉकडाऊनबाबत विचार केला जात नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
"केस पॅाझिटिव्हिटी रेट, ऑक्सिजनची मागणी आणि रुग्णालयात दाखल रुग्णसंख्या यावर निर्बंधाबाबत निर्णय घेतला जाईल," आरोग्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
महाराष्ट्रात सद्यस्थितीत 125 ते 130 मेटृीक टन ऑक्सिजनची गरज भासतेय. तर राज्यात ऑक्सिजनची उत्पादन क्षमता 1350 मेट्रिक टन आहे.
ऑक्सिजनच्या गरजेचा हा आकडा 700 मेटृीक टनपर्यंत पोहोचला तर लॉकडाऊनची परिस्थिती येईल, ते पुढे सांगतात.
देशभरात कोरोनासंसर्गाची लाट पसरू लागल्यानंतर राज्यांनी खबरदारीची उपाययोजना सुरू केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "कोरोना संसर्गात रुग्णसंख्या वाढल्यामुळे कडक निर्बंध लावावे लागतात. ते लावले जातील."
पश्चिम बंगलमध्ये लॉकडाऊन करण्यात आलाय. हे सांगतानाच ते पुढे म्हणतात, "काही राज्यांनी रात्रीचा लॉकडाऊन करण्याचे निर्णय घेतले आहेत."
निर्बंधाबाबत केंद्राच्या सूचना?
डिसेंबरमध्ये भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. कोरोनावर नियंत्रणासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र पाठवलं होतं.
ज्यात ज्या जिल्हयात टेस्ट पॅाझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्या ठिकाणी कंटेनमेंटच्या उपाययोजना सुरू करा अशी सूचना करण्यात आली होती.
यात रात्रीचा कर्फ्यू, लोकांचं एकमेकांत मिसळणे कमी व्हावं यासाठी उपाययोजना, लग्न, कार्यक्रम यांच्यावर निर्बंध घालण्यास साधण्यात आलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)