You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी हरले तरी भाजप अनेक दशकं टिकेल, हे राहुल गांधींना समजतच नाही - प्रशांत किशोर
भाजप आगामी काही दशकांसाठी भारतीय राजकारणात केंद्रस्थानी असेल आणि हेच राहुल गांधींच्या लक्षात येत नसल्याचं, प्रसिद्ध निवडणूक आणि राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर सध्या प्रशांत किशोर यांचा एक व्हीडिओ शेअर केला जात आहे. त्यात ते याबाबत उल्लेख करत असल्याचं समोर आलं आहे.
"आगामी काळात भाजप भारतीय राजकारणाचं केंद्र असेल. ते जिंकले किंवा पराभूत झाले, त्यानं फरक पडत नाही. जी स्थिती 40 वर्षे काँग्रेसची होती, तीच भाजपचीही आहे. ते कुठंही जाणार नाहीत. राष्ट्रीय पातळीवर 30 टक्के मतं मिळवल्यानंतर सहजासजही अस्तित्व संपत नाही," असं प्रशांत किशोर म्हणाले.
हा व्हीडिओ गोव्यातील एका कार्यक्रमाचा आहे.
"लोक मोदींवर नाराज आहेत आणि ते त्यामुळं ते त्यांना पराभूत करतील या भ्रमात राहू नका. एकवेळ मोदींचा पराभव होईल, मात्र भाजप कुठंही जाणार नाही. आगामी काही दशकांमध्ये हा पक्ष राजकारणात केंद्रस्थानी असेल. राहुल गांधींची कदाचित हीच अडचण आहे. त्यांना वाटतं हा वेळेचा मुद्दा आहे आणि लोक त्यांना सत्तेतून बाहेर करतील. पण तसं होणार नाही," असं ते म्हणाले.
"जोपर्यंत तुम्ही मोदींना, त्यांच्या शक्तीला जाणून घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्यांचा पराभव करण्याची तयारी करू शकणार नाही. मला जाणवणारी अडचण म्हणजे, मोदींची शक्ती काय आहे आणि त्यांना अधिकाधिक प्रसिद्धी कशामुळं मिळत आहे, हेच लोकांच्या लक्षात येत नाही. जोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही, तुम्ही त्यांना पराभूत करू शकणार नाही." असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं.
भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते अजय शहरावत यांनी हा व्हीडिओ ट्विट केला आहे.
"भाजप पुढची काही दशकं भारतीय राजकाणात महत्त्वाच्या स्थानी असेल, हे अखेर प्रशांत किशोर यांनी मान्य केलं आहे. अमित शाह यांनी आधीच हे म्हटलं आहे," असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
काँग्रेसच्या पुरुज्जीवनाबाबतही मांडलं होतं मत
यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांच्याशी बोलताना प्रशांत किशोर यांनी काँग्रेसबाबत मत मांडलं होतं.
"पारंपरिक पद्धतीनं काँग्रेसमध्ये नव्यानं प्राण फुंकता येतील, असं राहुल गांधींना वाटतं. पण काँग्रेसला आता पुढं सरकावं लागेल. बिहार आणि पंजाब वगळता काँग्रेसने 2013 पासून एकही निवडणूक जिंकलेली नाही. या दोन ठिकाणीही आघाडीनं विजय मिळवला. आकडे पाहता 1985 नंतर पक्ष म्हणून काँग्रेसची स्थिती वाईट होत चालली आहे. लोकांना वाटतं की 2014 पासून काँग्रेसची सातत्यानं पडझड सुरू आहे, मात्र तसंही नाही," असं ते म्हणाले होते.
हा व्हीडिओ 2018 चा असून त्याचा काही भाग यावर्षी जुलै महिन्यात पुन्हा यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला होता.
"मोदींना पराभूत करणं हा उद्देश असावा म्हणजे काँग्रेसचं पुनरुज्जीवन होईल, असं त्यांना वाटतं. पण माझ्या मते, तुम्ही त्यांना पराभूत करू शकता किंवा नाही, यानं फार फरक पडत नाही. काँग्रेसला पुनरुज्जीवनासाठी अगदी प्राथमिक पातळीपासून काम करावं लागणार आहे."
काँग्रेसबरोबरच्या नात्यात तणाव
काही आठवड्यांपूर्वी काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याबरोबर प्रशांत किशोर यांची भेट झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळं ते काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, अशा शक्यता व्यक्त केल्या जात होत्या.
मात्र, नुकत्याच झालेल्या लखीमपूर खिरी दुर्घटनेनंतर प्रशांत किशोर यांच्या एका वक्तव्यानं पक्ष आणि प्रशांत किशोर यांच्या नात्यात तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला सोशल मीडियाद्वारे त्यांनी पक्षाच्या पुनरुज्जीवनाबाबत प्रश्न उपस्थित केले होते.
"लखीमपूर-खिरी दुर्घटनेनंतकर जीओपी (ग्रँड ओल्ड पार्टी) च्या नेतृत्वातील विरोधी पक्षाचं पुनरुज्जीवन होईल, असं वाटणाऱ्यांच्या हाती निराशा येणार आहे. खोलवर रुतलेल्या समस्यांवर एवढ्या सहजपणे तोडगा निघत नसतो," असं त्यांनी म्हटलं होतं.
त्यावर प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लखीमपूर-खिरीची घटना राजकारणातील विजय किंवा पराजय या पातळीवर तपासणं म्हणजे पाप आहे, असं म्हटलं होतं. मात्र त्यानंतर दोघांच्या नात्यात तणाव आल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
तृणमूल काँग्रेसला गोव्यात रस
तृणमूल काँग्रेस गोव्यात पाय पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
त्यामुळं गोव्यात तृणमूलचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रशांत किशोर गोव्यात गेले होते, अशी चर्चा आहे.
दरम्यान, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइजिन्हो फलेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षासाठी निवडणुकीचं नियोजन केलं होतं.
त्यानंतर याच वर्षी 2 मे 2021 ला एका मुलाखतीत त्यांनी राजकीय सल्लागार म्हणून काम करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यांच्या या घोषणेनंतर त्यांना स्वतःला राजकारणात उतरण्याची इच्छा असल्याच्या चर्चांना आणखी जोर आला.
मात्र, तृणमूल काँग्रेसने 2026 मधील पुढच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत प्रशांत किशोर यांच्या कंपनीच्या सेवांसाठीचा करार केलेला आहे.
प्रशांत किशोर इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (आयपॅक) नावाची एक कन्सल्टन्सी कंपनी चालवतात.
2014 मध्ये भाजपच्या विजयानंतर प्रशांत किशोर निवडणूक सल्लागार म्हणून चर्चेत आले होते. बिहारशी संबंध असलेल्या प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत नरेंद्र मोदी, भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्याबरोबरच नितीश कुमार, पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग, आंध्र प्रदेशात जगन रेड्डी आणि तमिळनाडुमध्ये डीएमके नेते एमके स्टॅलिन यांना निवडणुकीच्या तयारीसाठी सेवा पुरवली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)