राहुल गांधी : 'मोहम्मद शमी आम्ही सर्व तुझ्यासोबत' #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. आम्ही सर्व तुझ्यासोबत, मोहम्मद शमीच्या ट्रोलर्सना राहुल गांधींचं उत्तर

भारत-पाकिस्तान सामन्यातल्या पराभवानंतर सोशल मीडियावर मोहम्मद शमीला ट्रोल करण्यात येतंय. राहुल गांधींनी ट्वीट करत शमीला पाठिंबा दिलाय.

राहुल गांधी ट्वीटमध्ये म्हणतात, "मोहम्मद शमी आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. या लोकांना कोणी प्रेम दिलंच नसल्याने या लोकांची मनं द्वेषाने भरलेली आहेत. त्यांना माफ कर."

क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंनीही शमीवर टीका करणाऱ्यांना सुनावलं आहे.

ट्वीट करत हर्षा भोगलेंनी म्हटलंय, "मोहम्मद शमीबद्दल घाणेरड्या गोष्टी करणाऱ्यांना माझी एक विनंती आहे. तुम्ही क्रिकेट पाहणं सोडून द्या. तुमची कमी भासणार नाही."

लोकमतने याविषयीची बातमी दिली आहे.

2. मार्चपर्यंत देशातल्या 13 विमानतळांचं खासगीकरण करण्याचा केंद्राचा इरादा

मार्च 2022 पर्यंत देशातल्या 13 विमानतळांचं खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा बेत असून यासाठीची यादी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने हवाई वाहतूक मंत्रालयाला पाठवली आहे.

राज्याच्या मालकीच्या विमानतळ प्राधिकरणांद्वारे चालवण्यात येणाऱ्या विमानतळांचं खासगीकरण करण्यात येणार आहे.

या प्रक्रियेसाठी एअरपोर्ट अथॉरिटीने सात लहान विमानतळ सहा मोठ्या विमानतळांसोबत जोडायचं ठरवलं आहे. यानुसार वाराणसीसोबत कुशीनगर आणि गया विमानतळ, कांग्रा विमानतळ अमृतसरसोबत, भुवनेश्वर विमानतळ तिरुपतीसोबत, रायपूर विमानतळ औरंगाबादसोबत, इंदूर विमानतळ जबलपूरसोबत आणि त्रिची विमानतळ हुबळीसोबत एकत्र करण्यात आलाय.

इकॉनॉमिक टाईम्सने ही बातमी दिली आहे.

3. दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना देशाला बदनाम करत आहेत - चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडी देशाला बदनाम करण्याचं काम करत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय.

तपास यंत्रणा काम करत असताना कोर्ट त्या व्यक्तीला जामीन देत नाही, पण मंत्री केंद्राच्या तपास यंत्रणेवर टीका करत सुटले आहेत. तपास यंत्रणा आणि ईडीविषयी शंका असेल तर विरोधकांनी कोर्टात जावं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना देशाला बदनाम करण्याचं काम करत असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यात आघाडीवर असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

एबीपी माझाने ही बातमी दिलीय.

4. मुंबईतल्या लोकल फेऱ्या गुरुवारपासून 100 टक्के क्षमतेने सुरू होणार

गुरुवारपासून मुंबईतल्या लोकल रेल्वेच्या फेऱ्या 100 टक्के क्षमतेने पुन्हा सुरू होणार आहेत. राज्यातले कोव्हिड निर्बंध शिथील करण्यात आले आहेत आणि लोकलने प्रवास करणाऱ्यांची क्षमताही वाढलेली आहे.

हे लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय.

या फेऱ्यांमध्ये मध्य रेल्वेवरच्या CSMT ते कल्याण जलद मार्गावरील 15 डबा लोकलचाही समावेश असेल. या लोकलच्या 22 फेऱ्या आता होतील.

लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

5. एसटीचा प्रवास महागला, 17 टक्के भाडेवाढ

तीन वर्षांनंतर एस. टी. महामंडळाने 17.17 टक्के भाडेवाढ केली आहे. एस. टी. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना ही भाडेवाढ लागू झाली आहे.

या भाडेवाढीमुळे तिकीट किमान 5 रुपयांनी वाढणार असल्याचं MSRTC ने म्हटलंय. पण दुसरीकडे रातराणीच्या गाड्यांच्या तिकीटांचे दर 5 ते 10 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.

साधी एसटी, शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नाही. 6 किलोमीटर नंतरच्या टप्प्यांसाठी भाडेवाढ लागू होईल.

झी न्यूजने ही बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)