केरळ पूर: अतिवृष्टीमुळे 26 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

केरळमध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळं बळी गेलेल्यांचा आकडा वाढून 26 झाला आहे. त्यापैकी कोट्टायममध्ये 13 जण मृत्यूमुखी पडले आहेत. या जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तसंच अनेकजण बेपत्ता असल्याचीही माहिती मिळत आहे.

केरळचे महसूलमंत्री राजन के यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "बचाव कार्य करणाऱ्या टीमला कुटिकल, कोट्टायम आणि इतर ठिकाणाहून 13 मृतदेह आढळले आहेत. 9 जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. पावसामुळे कोट्टायम आणि इडुक्की या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे."

इडुक्की जिल्ह्यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इडुक्की जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शीबा जॉर्ज यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "काल आम्ही दोन मृतदेह ताब्यात घेतले होते. आता मृतांची एकूण संख्या आठ झाली आहे. आणखी पाच जण बेपत्ता आहेत. ते सुरक्षित असल्याची शक्यता खूप कमी आहे कारण जमीन अत्यंत दलदलीत झाली आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (17 ऑक्टोबर) रात्री यासंदर्भात ट्वीट केले आहेत. आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, "केरळमध्ये सुरू असलेल्या पावसासंदर्भात आणि भूस्खलनबाबत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली. अधिकारी वर्ग पीडितांच्या मदतीसाठी काम करत आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो."

आपल्या पुढील ट्वीटमध्ये ते लिहितात, "मुसळधार पाऊस आणि भूस्खलन यामुळे अनेकांचा मृत्यू झाला ही दु:खद घटना आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो."

आता पावसानं काहीसी विश्रांती घेतल्यामुळं लष्कराचे जवान आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला मदतकार्यात काहीसा दिलासा मिळाला आहे.

अलेप्पीतील परिस्थिती चिंताजनक

"अजूनही कुटिकल, कोट्टायम आणि इडुक्की याठिकाणी 12 जण बेपत्ता आहेत, तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आलेप्पीमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. कारण याठिकाणी सगळीकडं पावसाचं पाणी साचलेलं आहे. मात्र राज्यात पावसाचं प्रमाण काहीसं कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे," अशी माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बीबीसी हिंदीला दिली.

लष्कराचा मद्रास इंजिनीअरिंग ग्रुप (MEG) हा कुटिकल भागात मदतकार्यासाठी पाठवण्यात आला आहे. याठिकाणी घरं कोसळली आहेत, तसंच काही ठिकाणी भूस्खलन झाल्यानं अनेक ठिकाणी नागरिक अडकल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना काढण्यासाठी ते मदत करत आहेत.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं दोन ते तीन वेळा ढगफुटी झाल्याचंही पाहायला मिळालं.

नैऋत्य मान्सूनचा शेवट आणि ईशान्य मान्सूनचं आगमन या दरम्यान हा पाऊस होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हवामान विभागानं, पुढच्या काही तासांत राज्यात सर्वसाधारण पाऊस होण्याचा अंदाज वर्तवल्यानं, अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट बदलून यलो अलर्ट करण्यात आला आहे.

"सध्या कोट्टायम, इडुक्की आणि पथनमथिट्टा हे सर्वाधिक फटका बसलेले जिल्हे ठरले आहेत. आल्लेपी हा भाग सखल असल्यानं कोट्टायम आणि इडुक्कीचं पाणी वाहून याठिकाणी येत असल्यानं तो पूर्णपणे पाण्यानं वेढला गेलेला आहे. आल्लेपीमधून पाणी थेट समुद्रात जातं,'' असं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मात्र पावसानं काहीसी विश्रांती घेतल्यानं मदत कार्याला फायदा होत आहे. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला सुलूरच्या एअर फोर्स स्टेशनपासून तिरुवनंतपुरममध्ये मदत पोहोचवण्यासाठी जाणं त्यामुळं शक्य झालं आहे. काही भागांमध्ये खाद्य पदार्थांची पाकिटं पुरवण्यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरचा वापरही केला जात आहे.

पावसाचं प्रमाण कमी झालंच नाही तर प्रत्येकानं अत्यंत जबाबदारीनं आणि काळजी घेत वर्तन करावं असं आव्हान, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी लोकांना केलं आहे.

अरबी समुद्रात लक्षद्वीप जवळ असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव हळू हळू, कमी होत आहे. मात्र तरीही हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सायंकाळपर्यंत पाऊस सुरुच राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान कोल्लम, पथनमथिट्टा, पलक्कड, मलाप्पुरम आणि त्रिशुर यापैकी एक ते दोन ठिकाणी चक्रीवादळ आणि काही प्रमाणात पाऊस होऊ शकतो. याठिकाणी ताशी 40 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभागानं व्यक्त केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)