You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजप आमदार म्हणतात, 'चंद्रकांत खैरेंचं काम औरंगजेबासारखं, खासदार जलील सरस' #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. चंद्रकांत खैरेंचं काम औरंगजेबासारखं, खासदार जलील सरस - भाजप आमदार
चंद्रकांत खैरेंचं काम औरंगजेबासारखं असून त्यांच्या काळात औरंगाबादचा काहीच विकास झाला नसल्याची टीका भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे.
विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचं काम चांगलं असून ते MIMचे असले तरी त्यांचं काम खैरेंपेक्षा चांगलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ई-सकाळने याविषयीची बातमी दिली आहे.
औरंगाबादमध्ये 30 वर्षं खैरेंची सत्ता असताना शहर खिळखिळं झालं असून ते भागवत कराडांशी कधीच बरोबरी करू शकत नसल्याचं प्रशांत बंब यांनी म्हटलं आहे.
आपण कराडांना नगरसेवक, महापौर मी केलं असं काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी म्हटलं होतं.
केंद्रीय मंत्री भागवत कराडांनीही ट्वीट करत या टीकेला उत्तर दिलं होतं. "तुम चाहे कितनाभी किचड उछालो, मै कमल की तरह खिलता रहूंगा" असं त्यांनी म्हटलं होतं.
2. राज ठाकरेंना जातिव्यवस्थेचा इतिहास माहित नाही - राष्ट्रवादी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेस हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष असून त्यांच्या धोरणांनुसार आम्ही राजकारण करतो," असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं.
तसंच, "राज ठाकरेंना जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा, म्हणून ते अशा प्रकारचं वक्तवं करत आहेत," असंही नवाब मलिक म्हणाले. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे,
3. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी श्रीनिवास रेड्डींवरचा गुन्हा न्यायलयाने केला रद्द
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल रेंजच्या RFO दीपाली चव्हाण यांनी मार्च 2021मध्ये त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
वरिष्ठांच्या जाचामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर मुख्य प्रधान वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचं या सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं.
श्रीनिवास रेड्डी यांच्याविरुद्ध धारणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर हा गुन्हा रद्द करण्याची मागणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केली होती.
श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा न्यायालयाने रद्द करत सुनावणी सुरू असलेलं प्रकरण बंद केलं आहे. यामुळे दीपाली चव्हाण यांच्यासाठी लढा देणारे त्यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना धक्का बसल्याचं लोकमतच्या बातमीत म्हटलं आहे.
4. लसीकरण वेळापत्रक निव्वळ थाप - सायरस पूनावाला
डिसेंबरपर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचं राजकारण्यांनी जाहीर केलेलं वेळापत्रक ही निव्वळ थाप असल्याचं सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी म्हटलंय.
पुण्यामध्ये त्यांचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होईल ही राजकारण्यांची थाप असून लशीचा पुरवठा पाहता हे शक्य होणार नसल्याचं पूनावाला म्हणाले.
जगातले 150 देश लशीची वाट पाहत असल्याने भारताने लशीच्या निर्यातीला परवानगी द्यावी, असं मत पूनावालांनी यावेळी व्यक्त केलं. लोकसत्ताने याविषयीची बातमी दिली आहे.
5. जुलै महिन्यात भारतातून विक्रमी निर्यात
भारतातून करण्यात येणाऱ्या निर्यातीच्या आकडेवारीने जुलै महिन्यात उच्चांक गाठला आहे. जुलै 2021मध्ये भारतातून तब्बल 35.4 अब्ज डॉलर्स मूल्याची निर्यात करण्यात आल्याची बातमी द मिंटने दिली आहे.
पाश्चिमात्य देशांच्या अर्थव्यवस्था कोव्हिडच्या फटक्यातून झपाट्याने सुधारत असल्याने भारतातून निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूंसाठीची मागणी वाढलेली आहे.
पण सोबतच भारताकडून केली जाणारी वस्तूंची आयातही वाढली असून जुलै 2021मध्ये 46.4 अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)