You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना महाराष्ट्र : राज्यातील 13 विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईनच होणार - उदय सामंत
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. सद्यस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेणं अशक्य आहे.
त्यामुळे राज्यातील 13 विद्यापीठातील उर्वरित सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. या विद्यापीठांमध्ये कृषी विद्यापीठाचा समावेश नाही.
कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने काही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत विचार सुरू होता. पण कोरोना प्रतिबंधक निर्बंध आता आणखी कठोर करण्यात आले आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणं अवघड होणार आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाईनच घेण्यात येतील, असं सामंत यांनी सांगितलं.
परीक्षा ऑनलाईन घेत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्याची सूचना सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना केली आहे.
कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता विद्यापीठ, महाविद्यालये आणि संस्थाचालकांनी घ्यावी, अशी सूचना आजच्या (22 एप्रिल) बैठकीत करण्यात आली आहे.
13 ही अकृषी विद्यापीठांमध्ये परीक्षा थांबल्या नाहीत. काही ठिकाणी ऑफलाईन तर काही ठिकाणी ऑनलाईन स्वरुपात या परीक्षा सुरू होत्या. पण बुधवारी (21 एप्रिल) राज्यातील निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. अशा स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास प्राधान्य द्यावे, अशी विनंती सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरूंनी केली होती. त्यामुळेच हा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
पण कोणताही विद्यार्थी परीक्षेस वंचित राहणार नाही, कोणत्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची काळजी विद्यापीठ प्रशासनाने घ्यावी, असा निर्णय झाला आहे.
विद्यापीठांच्या सर्वच परीक्षा म्हणजेच सर्वच वर्ष आणि सेमिस्टरच्या परीक्षा ऑनलाईन स्वरुपातच होतील.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींसाठी तसंच उच्चशिक्षणाच्या दृष्टीने शिक्षण विभाग अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट करावा, अशी विनंती कुलगुरुंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे, असं सामंत म्हणाले.
18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे लसीकरण करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली. त्यानुसार 1 मेपासून 18 वर्षांच्या वरील नागरिकांचेही लसीकरण होणार आहे.
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं
या पार्श्वभूमीवर 18 वर्षांवरील किती विद्यार्थी शिकत आहेत, याचा आढावा घेण्यात आला. ही संख्या सुमारे 37 लाख इतकी आहे. या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण करणं शक्य आहे का, त्यांचं लसीकरण लवकरात करणं शक्य आहे का, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, याबाबत विद्यापीठांची मदत कशी घेता येईल, याबाबत कुलगुरुंशी चर्चा करण्यात आली, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
तसंच कायद्याच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मुदतवाढ अंतिम असेल, असं सामंत म्हणाले.
शिवाय कोरोनामुळे प्राध्यापक भरतीस विलंब होत आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास ही भरती करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)