You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्लीमध्ये भूकंपाचे झटके
दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे झटके जाणवले आहेत. दिल्ली आणि परिसरात हे धक्के काही वेळासाठी जाणवले.
10.31 मिनिटांनी आलेल्या या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू ताजिकिस्तानमध्ये असल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता 6.3 असल्याचं सांगितलं जात आहे.
दिल्ली आणि परिसरात गेल्या वर्षभरात अनेक वेळा भूकंपाचे झटके येऊन गेले आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये 6.1 तिव्रतेचा भूकंप आला होता. त्याचा केंद्रबंदू अमृतसरजवळ असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दिल्ली भूकंपासाठी किती सज्ज आहे?
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे माजी सहाय्यक महासंचालक डॉ. प्रभास पांडे यांनी याविषयावर अनेक वर्ष अभ्यास केला आहे.
ते सांगतात, "1720 साली आलेल्या भूकंपामुळे किती नुकसान झालं याचा अंदाज 1883 साली प्रकाशित झालेल्या 'द ओल्डहॅम्स कॅटलॉग ऑफ इंडियन अर्थक्वेक्स'मध्ये वर्तवण्यात आला आहे. रिश्टर स्केलवर त्या भूकंपाची तीव्रता 6.5 ते 7 च्या दरम्यान होती. त्या भूकंपाने जुनी दिल्ली आणि नवी दिल्ली या दोन्ही परिसरात मोठं नुकसान झालं होतं. भूकंपाच्या पाच महिन्यांनंतरही या भागात आफ्टरशॉक्स जाणवत होते."
भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करायला दिल्ली किती सज्ज आहे, हा प्रश्नही आहे.
सार्क डिजास्टर मॅनेजमेंट सेंटरचे संचालक प्रा. संतोष कुमार यांच्या मते कुठल्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची भारताची क्षमता पूर्वीपेक्षा आज वाढली आहे.
ते सांगतात, "एक लक्षात घ्या शक्यता केवळ अंदाजांवर आधारित असतात. लातूरमध्ये आलेला भूकंप बघता दिल्लीतल्या अनेक इमारती असुरक्षित आहेत, हे खरंच आहे. मात्र, अनेक ठिकाणं सुरक्षितही आहेत. सर्वात महत्त्वाचं काय आहे तर प्रत्येकाने अशा आपत्तींप्रती सजग असायला हवं आणि सरकारांचा प्रयत्न असायला हवा की नियमांचं उल्लंघन होता कामा नये."
सेंटर फॉर सायंस अँड एन्व्हायरमेंटच्या अनुमिता रॉय यांचंही म्हणणं आहे की दिल्लीतल्या अनेक इमारतींचं रेट्रोफिटिंग म्हणजे भूकंपविरोधी डागडुजी गरजेची आहे.
त्या म्हणतात, "भारतातल्या अनेक ठिकाणांवरून इमारती खचण्याच्या बातम्या येत असतात आणि तेही भूकंप नसूनही. दिल्ली-एनसीआर परिसर पूर्वीपासूनच यमुना नदीच्या काठावर पसरत गेला असल्या कारणाने मोठा भूकंप सहन करण्याची क्षमता कमी असणं स्वाभाविक आहे. जुन्या इमारतींची डागडुजी करणं आणि 7 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झेलू शकतील, अशा पद्धतीने नव्या इमारतींची उभारणी करणं, हे गरजेचं आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)