You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस: बांधकाम व्यवसायाला गती देण्याची योजना मूठभर लोकांच्या भल्याची
बांधकाम क्षेत्रात मागणी वाढवण्याच्या नावाखाली मूठभर खासगी लोकांचं भलं करणारा निर्णय तात्काळ रद्द करा, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी बांधकाम क्षेत्राच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. सरकारच्या या निर्णयाने राज्याचं हजारो कोटी रूपयांचं नुकसान होणार आहे, असं फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
कोरोना काळात काम ठप्प असल्याने बांधकाम व्यवसायाचं मोठं नुकसान झालं होतं. राज्यातील बांधकाम व्यवसायाला गती देण्यासाठी सरकारने एक योजना आखली आहे. मात्र, ही योजना काही खासगी लोकांसाठी फायदेशीर आहे, असा आरोप फडणवीस यांनी केलाय.
फडणवीसांच्या या आरोपांवर महाविकास आघाडी सरकारकडून अजून काही उत्तर आलेलं नाही.
पत्रात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
-दीपक पारेख यांच्या समितीने बांधकाम क्षेत्राबद्दल काही शिफारसी केल्या होत्या. त्यातील काही निवडक शिफारसींची अंमलबजावणी केली जात आहे. हे करताना त्याचा परिणाम विचारत घेण्यात आलेला नाही
-स्वत:च्या फायद्यासाठी काही लोक याचा वापर करत आहेत. यामुळे राज्याचं नुकसान होईल.
-मुद्रांक शुल्कात सवलत, रेडिरेकोनर रेट्स, प्रीमियम या आवश्यक गोष्टी आहेत. पण, याचा काही ठराविक लोकांना फायदा होणार
-हा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत आला होता. पण, पुढील बैठकीसाठी ठेवण्यात आला आहे
-फक्त 5 खासगी विकासकांचा विचार केला. तरी या निर्णयामुळे त्यांना 2000 कोटी रूपयांचा फायदा होणार आहे
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. कॅबिनेटचा प्रस्ताव सोशल मीडियावर उपलब्ध कसा?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'कॅबिनेटच्या प्रस्ताव गुप्त असतो. निर्णय होईपर्यंत हा गुप्त ठेवला जातो. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॅबिनेटचा अजेंडा, कॅबिनेट नोट, ड्राफ्ट विकासकांकडे आणि सोशल मीडियावर उपलब्ध आहे.'
'सरकार राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता करत आहे. असं असताना राज्याच्या पैशाची तुम्ही लूट होऊ देणार नाही अशी अपेक्षा,' असं फडणवीस पुढे म्हणतात.
एकीकडे राज्यातील शेतकरी आणि बारा बलुतेदारांना आपण मदत करू शकत नाही. दुसरीकडे मात्र खासगी लोकांना फायदा फायदा मिळाला. तर, हे अतिशय गंभीर आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)