You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंगना रनौत: बॉलीवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती #5मोठ्याबातम्या
वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आलेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या
1. बॉलीवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती-कंगना
बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असं अभिनेत्री कंगना रनौतने म्हटलं आहे. "अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांविषयी माहिती देण्यास तयार आहे. मात्र, यासाठी तिला सुरक्षा देणं जरुरीचं आहे. दुर्देव म्हणजे महाराष्ट्र सरकारने अजूनही तिला सुरक्षा दिलेली नाही", असं राम कदम ट्विटरवर म्हणाले.
राम कदम यांच्या या ट्विटला कंगनाने उत्तर दिलं. "माझ्या काळजीसाठी धन्यवाद, बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी" असं कंगनाने म्हटलं आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
"अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हस्तक्षेप करुन महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांच्या सक्षम प्रतिमेला मलीन केलं आहे. काही मोठ्या लोकांना वाचवण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे, असं आता जगासमोर आलं आहे. महाराष्ट्र सरकार कंगनाशी चर्चा करुन तिचा विश्वास पुन्हा संपादित करु शकेल? हा प्रश्न आहे", अशी टीका राम कदम यांनी केली.
2. स्थानिक उद्योगांना प्रमोट करू शकत नसेल तर मग मेक इन इंडिया, आत्मनिर्भर दावे ढोंगीपणाचे- कोर्ट
केंद्र सरकार स्थानिक उद्योजक किंवा कंपन्यांना प्रोत्साहन देत नसेल तर केंद्र सरकार करत असलेले आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाचे दावे ढोंगीपणाच वाटतो असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
स्थानिक विमानतळावरील ग्राऊंड हँडलिंग ऑपरेशनच्या टेंडरसंदर्भातील याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. याचिकाकर्त्यांनी टेंडरसाठी पात्रतेच्या मुद्यांना न्यायालयात आव्हान दिलं होतं. एकीकडे मेक इन इंडिया आणि दुसरीकडे मात्र छोट्या संस्था स्पर्धेच्या बाहेर जातील अशा प्रकारची टेंडर्स जारी करत आहेत असं न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
छोट्या कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखवत असाल तर तसे म्हणा. तुमचे राजकीय नेतृत्व मेक इन इंडियाबद्दल बोलतं. मात्र तुमचे काम तुमच्या विचारांशी जुळत नाही. तुम्ही पूर्णपणे ढोंगीपणा करत आहात अशी टिप्पणी न्यायालयाने केली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी याप्रकरणी सरकारच्या निर्देशांबाबतची स्थिती स्पष्ट करावी असं न्यायालयाने म्हटलं आहे. जैन हे केंद्र सरकार, एअरपोर्ट ऑथॅरिटी ऑफ इंडियाची बाजू मांडतील.
तुम्हा लोकांना मोठे खिसे असलेले मोठे खेळाडू हवे आहेत. कदाचित परदेशी कंपन्यादेखील येऊ शकतील. मात्र जिथे शेड्युल फ्लाईट कमी असताना किंवा अजिबात नसताना स्थानिक विमानतळांवर छोट्या कंपन्या काम करू शकतात असं न्यायालयाने सांगितलं.
3. पंढरपुरात दोन लाख वारकऱ्यांच्या उपस्थितीत दाखल होणार - प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पंढरपुरात प्रशासन हादरलं आहे. प्रकाश आंबेडकर उद्या पंढरपुरात दोन लाख वारकऱ्यांचा उपस्थितीत दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पंढरपूरमध्ये प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. पंढरपूरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी एसटी वाहतूक बंद असणार आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक करत असताना अनेक गोष्टींना सूट दिली आहे. मात्र, मंदिर प्रवेश याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आता मंदिर प्रवेशाचा मुद्दा हातात घेतलेला आहे. उद्या पंढरपुरात प्रकाश आंबेडकर दोन लाख वारकऱ्यांचा उपस्थितीत दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्य सरकारनं 31 ऑगस्टपूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले केले नाही तर त्या ठिकाणी वारकरी, महाराज यांच्यासह लाखो लोकांच्या मदतीने आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता.
4. राजीव गांधी यांनी इटलीतून भाला फेकला म्हणून खेलरत्न पुरस्कार त्यांच्या नावाने का?
देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने देण्यावरून कुस्तीपटू बबीता फोगाटने आक्षेप घेतला आहे.
राजीव गांधी यांनी एकदा भारतातून इटलीत भाला फेकला होता म्हणून खेल रत्न हा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो का? असा सवाल बबिताने केला आहे.' नवभारत टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
बबीताचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शनिवारी दुपारी बबीताने हे ट्विट केले होते. त्यानंतर ते 11 हजारहून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे तर 60 हजारहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे.
बबीता फोगाट ही भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होती. राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत बबीताने 3 वेळा पदक जिंकले आहे. ज्यात एका सुवर्ण आणि 2 रौप्य पदकाचा समावेश आहे. त्या शिवाय तिने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदक जिंकले आहे.
5. ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी
फिडे जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारतानं रविवारी पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. या स्पर्धेदरम्यान इंटरनेट आणि सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने या ऑनलाइन स्पर्धेत भारत आणि रशियाला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
सुरुवातीला रशियाला विजेता घोषित करण्यात आलं कारण फायनलमध्ये भारताचे दोन खेळाडू निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी सर्व्हरसोबत कनेक्शन होत नसल्याने वेळ गमावला. भारताने या वादग्रस्त निर्णयाला विरोध दर्शवला त्यानंतर याची समिक्षा करण्यात आली आणि भारत-रशिया या दोन्ही देशांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)