NEET आणि JEE च्या परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांची ऑनलाईन मोहीम

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोनाचं संकट पाहता परीक्षा पुढे ढकलाव्या या मागणीसाठी NEET आणि JEE च्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर मोहीम राबवली. याच मोहिमेअंतर्गत ट्विटरवर #INDIAunitedtoPostponeNEET_JEE हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे.

हा हॅशटॅग वापरून विद्यार्थ्यांनी NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याची सरकारला विनंती केली आहे. कोरोना संकटाच्या काळात ही परीक्षा घेऊ नये, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

ट्विटरयुजर अश्विनी सिंग यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "रमेश पोखरियाल सर, तुम्ही तुमच्या निर्णयाचा विचार करावा आणि कोरोनाच्या काळातील NEET, JEE ची परीक्षा पुढे ढकलावी, अशी आम्हा विद्यार्थ्यांची नम्र विनंती आहे."

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांना ही विनंती करण्यात येत आहे.

नीरज झा यांनी ट्वीट करत म्हटलंय, "कृपा करून परीक्षा पुढे ढकला. विद्यार्थ्यांचा विचार करा. अजून संसद उघडली नाही, सर्वोच्च न्यायालयानं प्रत्यक्षात सुनावणी सुरू केलेली नाहीये. असं असताना तुम्ही या संकटाच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला कसं काय पाठवू शकता?"

यापूर्वी काय घडलं?

JEE मेन्सची परीक्षा 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान, तर JEE अॅडव्हान्स परीक्षा 27 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. तर NEET ची परीक्षा 13 सप्टेंबरला नियोजित आहे. पण कोरोनाचं संकट पाहता विद्यार्थ्यांनी या परीक्षांना विरोध केला आहे.

असं असलं तरी परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही, त्या नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं शनिवारी (21 ऑगस्ट) दिलं. त्यानंतर रविवारी (22 ऑगस्ट) ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर #INDIAunitedtoPostponeNEET_JEE हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला.

कोरोनाच्या संकटामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी फेटाळून लावली आहे.

राजकीय प्रतिक्रिया

JEE आणि NEETची परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात यावी, अशी विनंती भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे.

स्वामी यांनी ट्वीट करत म्हटलं, "विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्यांना पूर्ण तयारीनं सामोरं जाणं गरजेचं असतं. तसंच या परीक्षा घेण्यासाठी देशात पायाभूत सुविधाही पूर्णपणे सज्ज आहे, असं नाही."

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी NDTV ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, "सरकार परीक्षा घ्यायच्या निर्णयावर ठाम आहे, हे दुर्दैवी आहे. एकट्या JEE परीक्षेचा विचार केला तर जवळपास 27 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. अनेकांचं परीक्षा केंद्र घरापासून दूर असेल. त्यामुळे मला वाटतं घरी बसून परीक्षा देता येईल, अशी प्रणाली विकसित करायला हवी."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)