मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी पाऊस, कोल्हापुरात पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मुंबई शहरासह उपनगरांमध्येही पावसाची संततधार सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. कोकणातही पावसाचा जोर वाढलाय.

मुंबईत आजही कमी अधिक प्रवासात दिवसभर पाऊस कायम असणार आहे. मुसळधार पावसाने बुधवार (5 ऑगस्ट) मुंबई आणि परिसराला अक्षरशः झोडपून काढलं. रात्रभरही पावसाची रिपरिप सुरूच होती.

पालघर, कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. कोकण आणि गोव्यातही आज मुसळधार पाऊस आणि काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राधानगरी धरण 100 टक्के भरलं

कोल्हापूरमध्ये पंचगगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेल्या वर्षीच्या पुरात फटका बसलेल्या प्रयाग चिखली आणि आंबेवाडी या गावातील लोकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूरचं राधानगरी धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहे. तिसऱ्या आणि सहाव्या दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

राधानगरी धरणातुन सध्या 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

मुंबईतल्या पेडर रोडच्या लगत खारेघाट पारशी वसाहतीला लागून असलेली संरक्षक भिंत खचली. त्यामुळे वृक्ष उन्मळून पडले आहे तसं जलवाहिन्या फुटल्या आहेत. मलबार हिलवरून केम्प्स कॉर्नरला जोडणाऱ्या कमला नेहरू पार्क शेजारून येणाऱ्या रस्त्याला भेगा पडल्या आहे.

उद्धव ठाकरे यांनी केली पंतप्रधानांशी चर्चा

मुंबई आणि परिसरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

मुंबई आणि परिसरात कोसळणाऱ्या पावसाचा त्यांनी आढावा घेतला. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वतोपरी मदत करू, असं आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिलं. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे. मुंबईसाठी देऊ केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानलेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)