You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ. अमोल कोल्हे क्वारंटाइन, कोरोना पॉझिटिव्ह नेत्यांच्या संपर्कात आल्याने निर्णय : #5मोठ्याबातम्या
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं तसंच वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:
1. डॉ. अमोल कोल्हे क्वारंटाइन, कोरोना पॉझिटिव्ह नेत्यांच्या संपर्कात आल्याने निर्णय
राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतःला क्वारंटाइन केलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
"मी एक डॉक्टर असल्यानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखत आपल्या कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये, या भावनेतून होम क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती डॉ. कोल्हे यांनी ट्वीट करून दिली आहे.
देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतच आहे. सर्वसामान्य नागरिकांसह अनेक नेत्यांनाही करोनाचा संसर्ग झाला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.
2. राज्यातील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ दोन तासांनी वाढवली
राज्यातील दुकाने आणि मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गुरूवारपासून (9 जुलै) ही संमती देण्यात आली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
राज्यातील कंटेन्मेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकानं ही सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील, असे आदेश मुख्य सचिवांनी बुधवारी (8 जुलै) काढले.
सुरक्षेसंबंधी आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असतील. मिशन बिगिन अगेन टप्पा 5 अंतर्गत हे आदेश काढण्यात आले आहेत.
3. …तर भारतात कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला 2 लाखांपर्यंत असेल
कोरोनावर लवकरात लवकर लस सापडली नाही तर भारतात फेब्रुवारी 2021 अखेरपर्यंत दिवसाला 2 लाख 87 हजार करोनाबाधित रुग्णांची नोंद होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून (एमआयटी) करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी दिली आहे.
84 देशांमधील टेस्टिंग आणि केस डेटाच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये जगभरातील एकूण 60 टक्के लोकसंख्येचा समावेश करण्यात आला होता.
एमआयटीचे संशोधक हाजहीर रहमानदाद, टी वाय लिम आणि जॉन स्टेरमन यांनी हा अभ्यास केला आहे. यासाठी त्यांनी साथीच्या रोगातील तज्ज्ञांकडून वापरण्यात येणाऱ्या SEIR (Susceptible, Exposed, Infectious, Recovered) या मॉडेलचा वापर केला.
या अभ्यासानुसार उपचार उपलब्ध न झाल्यास 2021 मधील मार्च-मे महिन्यात जगभरातील करोनाबाधितांची संख्या 20 ते 60 कोटी दरम्यान असेल.
4. गांधी कुटुंबियांशी संबंधित तीन संस्थांच्या चौकशीचा गृहमंत्रालयाचा आदेश
केंद्र सरकारने राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हे चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीये.
या चौकशीच्या समन्वयासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मंत्री समितीची स्थापना केली आहे. सक्तवसुली संचालयानालयाचे (ED) विशेष संचालक या मंत्री समितीचे प्रमुख असणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्वीट करत ही माहिती दिली. राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टने पीएमएलए कायदा, आयकर कायदा आणि एफसीआरएचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी या राजीव गांधी फाउंडेशन या संस्थेच्या प्रमुख आहेत. तर या फाउंडेशनमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, राहुल गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि प्रियांका गांधीचाही समावेश आहे.
5. यंदाची आशिया चषक स्पर्धा रद्द : BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलींची माहिती
कोरोना विषाणुचा जगभरातील प्रादूर्भाव लक्षात घेत यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचं आयोजन रद्द करण्यात आलंय. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी Sports Tak च्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलत असताना याबद्दल माहिती दिली. NDTV नं ही बातमी दिलीये.
"एशिया कप कॅन्सल हो चुका है, जो सप्टेंबर मे था…" असं सौरव गांगुलीने आपल्या इन्स्टा लाईव्ह सेशनमध्ये म्हटलं.
आशियाई क्रिकेट कपच्या यजमानपदाचे हक्क असलेल्या पाक क्रिकेट बोर्डाचे प्रमुख एहसान मणी यांनी म्हटलं की, कोरोनाचं गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
एशियन क्रिकेट काउन्सिल या स्पर्धेचं आयोजन पुढच्या वर्षी करण्याचा विचार करत आहे. यावर्षी ही स्पर्धा आयोजित करणं धोकादायक आहे. यावर्षीचं यजमानपद आम्ही आमच्याऐवजी श्रीलंकेला दिलं होतं. कारण तिथे कोरोनाचा प्रादूर्भाव तुलनेनं कमी आहे, असंही मणी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं.
हा निर्णय खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून घेण्यात आला आहे, त्यामागे कोणतंही राजकारण नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)