कोरोना: भारतात रुग्णांची संख्या सव्वा दोन लाखांच्या वर

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

महाराष्ट्रासह देशभरात कोरना व्हायरसचा वेग नियंत्रणात येताना दिसत नाहीये. महाराष्ट्रात काल दिवसभरात एकीकडे निसर्ग चक्रीवादळ धुमाकूळ घालत होतं, तर दुसरीकडे कोरोनाही धुमाकूळ घालत होता.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 2 हजार 933 नव्या रुग्णांची वाढ झाली आणि एकूण संख्या 77 हजार 793 वर पोहोचली. राज्यात एकूण 41 हजार 393 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतंय. काल दिवसभरात 1352 रुग्ण बरे झाले आणि बरे होऊन घरी परतलेल्या एकूण रुग्णांची संख्या 33 हजार 681 वर झालीय.

देशात काय स्थिती आहे?

भारतातील इतर राज्यांची आकडेवारीही चिंताजनक आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात आतापर्यंत 2,26,770 रुग्ण आहेत, तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,10,960 एवढी आहे.

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भारताचा जगात सातवा नंबर आहे. भारताच्या पुढे इटली, स्पेन, युनायटेड किंगडम, रशिया, रशिया, ब्राझिल आणि अमेरिका हे देश आहेत. भारताच्या रुग्णांच्या वाढीचा वेग पाहता लवकरच भारत इटलीला मागे टाकू शकतो असं चित्र आहे.

गेल्या 24 तासात 9 हजार 851 नवे रुग्ण आढळले, तर काल दिवसभरात 273 जणांचा मृत्यू झाला आणि मृतांची संख्या 6 हजार 348 झालीय.

महाराष्ट्राच्या शेजारील गुजारतमध्येही कोरोनानं प्रसाराचा वेग पकडल्याचं चित्र आकडेवारीवरून दिसून येतं.

गुजरातमध्ये गेल्या 24 तासात 33 जणांचा मृत्यू झाला, तर 492 नवीन रुग्ण आढळले. गुजरातमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 18 हजार 601 वर पोहोचलीय.

भारताची राजधानी दिल्लीतही कोरोनानं धुमाकूळ घातल्याचं चित्र आहे. काल दिवसभरात दिल्लीत 1359 नवे रुग्ण आढळले. दिल्लीतल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 25 हजार 4 एवढी झालीय. यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 14 हजार 456 वर पोहोचलीय.

खासगी रुग्णालयांना मोफत उपचार करा असं सांगू शकत नाही- केंद्र सरकार

"कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार करा, असे आदेश खासगी रुग्णालयांना देऊ शकत नाही. तसा अधिकार आमच्याकडे नाही", असं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं गुरुवारी सुप्रीम कोर्टात सादर केलं.

"सरकारी जमिनीवर उभ्या असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये कोव्हिड रुग्णावर मोफत उपचार करावेत, असं क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट कायदा, 2010 मध्ये कुठेही तरतूद नाहीये. असे निर्णय संबंधित राज्य सरकार अंमलात आणू शकतो," असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुप्रीम कोर्टात सांगितलं. वकील सचिन जैन यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्रानं हे प्रतिज्ञापत्र सादर केलं.

'वंदे भारत' अभियानाअंतर्गत 4,013 नागरिक महाराष्ट्रात दाखल

वंदे भारत अभियानांतर्गत 30 फ्लाईटसने 19 देशातील 4,013 नागरिक महाराष्ट्रात दाखल झाले असून सर्वांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. आलेल्या नागरिकांमध्ये 1309 नागरिक मुंबईचे आहेत, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 1691 इतकी आहे तर इतर राज्यातील प्रवासी 1013 इतके आहेत.

वंदे भारत अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत एअर इंडियाने 30 जून 2020 पर्यंत 38 फ्लाईटसचे नियोजन केले असून या मिशनअंतर्गत अतिरिक्त चार्टर फ्लाईटसची व्यवस्था करण्यात आली आहे.ज्यात अमेरिका, रशिया,मध्य आशिया, युरोप आणि आखाती देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या उड्डाणांचा समावेश आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)