You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाशिक : रिक्षाला फरपटत नेत बसही कोसळली विहिरीत, विचित्र अपघातामध्ये 25 जणांचा मृत्यू
नाशिकजवळ एका एसटी बस आणि ऑटो रिक्षाची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनं रस्त्यालगतच्या विहरीत कोसळली. या विचित्र अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले आहेत.
मंगळवारी दुपारी अपघात घडल्यानंतर रात्री उशीरा 2 वाजता बचावकार्य पूर्ण करण्यात आलं, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज माढरे यांनी दिली आहे.
नाशिकच्या कळवण डेपोची धुळे-कळवण एसटी बस क्रमांक MH 06 S-8428 ही धुळे कळवण मार्गावर धावत होती. तेव्हा दुसरीकडून एक MH 15 DC 4233 क्रमांकाचा अॅपे कंपनीची प्रवासी ऑटो रिक्षा येत होती.
मेशी फाट्याजवळ बसचा टायर फुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बसनं समोरून येणाऱ्या रिक्षाला धडक दिली. धडक बसल्यानंतर रिक्षा जवळच्याच विहिरीत कोसळली. पाठोपाठ बसही विहिरीत कोसळली.
अपघात झाल्यानंतर समोरच असलेल्या हॉटेलमधले लोक तातडीने मदतीसाठी धावले. पण बस रिक्षावर कोसळली असल्यामुळे रिक्षातील प्रवासी दबले गेले होते. विहिरीत पाणी होतं, शिवाय त्यात रिक्षा आणि त्यावर बस अशी परिस्थिती असल्यानं अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं कठीण होत होतं.
मदतीसाठी स्थानिकांनी आधी बसची मागची काच फोडली आणि आत अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
मुलगी पाहून येताना काळाचा घाला...
मालेगावजवळील येसगाव येथील रशीद मन्सुरी (25 वर्षे) या तरूणाचा विवाह निश्चित करण्यासाठी त्याच्या कुटुंबासह इतर सदस्य देवळा इथं अॅपे रिक्षानं गेले होते. रशीद मुलगी पाहून आल्यामुळे तो घरीच होता.
देवळ्याहून मुलगी पाहून मन्सुरी कुटुंब परत येत होतं. त्याचवेळी हा अपघात झाला. या अपघातात बसचालक आणि रिक्षाचालकासह मन्सुरी कुटुंबातील अझीम मन्सुरी, अन्सार मन्सुरी, शाहिस्ता मन्सुरी, जावेद मन्सुरी, कुर्बान मन्सुरी, फारुख मन्सुरी यांचा मृत्यू झाला.
एसटीमधीलही 18 प्रवासी मृत्यूमुखी पडले.
33 जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारनं 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च हा राज्य परिवहन महामंडळाकडून केला जाणार असल्याची माहितीही परिवहन राज्यमंत्री अनिल परब यांनी दिली.
कसं पार पडलं बचावकार्य?
बस आणि रिक्षा विचित्र पद्धतीनं अडकल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक होतं. मदतीसाठी अग्निशमन दलाच्या गाड्या तसंच तीन क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या. आठ रुग्णवाहिकांनाही पाचारण करण्यात आलं.
घटनेची माहिती मिळाल्यापासून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह तसंच अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर या घटनास्थळी पोहोचून बचाव कार्यावर लक्ष ठेवून होत्या.
संध्याकाळी उशीरा क्रेनच्या साहाय्यानं अपघातग्रस्त बस आणि ऑटो रिक्षा विहिरीतून बाहेर काढण्यात आली. त्यानंतरही रात्री उशीरापर्यंत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.
जखमींवर देवळ्याचे ग्रामीण रुग्णालय आणि कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करून म्हटलं, "मी सातत्याने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्कात आहे. वैद्यकीय पथकेही घटनास्थळी आहेत, जखमींवर तात्काळ उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत."
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मृतांच्या नातेवाईकांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहे. जखमींना तातडीने योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही " मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना आणि जखमी व्यक्तींना योग्य ती मदत मिळवून दिली जाईल," असं सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)