गिरीश महाजन म्हणतात, शिवसेनेकडून भाजपचे फोन उचलले जात नाहीत

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी संध्याकाळी भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर शिवसेनेला प्रस्ताव दिल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलंय. त्यावर भाजपचा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.

वर्षावर झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, "कुठल्याही क्षणी गोड बातमी येईल," अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

मातोश्रीवर भाजपचा फोन उचलत नाही- महाजन

"शिवसेना चर्चा करायला तयारच नाही. आमचे कोणाचेच फोन घेतले जात नाही आहेत. अनेक मध्यस्थांकडून प्रयत्न झाले, पण उत्तर नाही," असं गिरीश महाजन यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे.

"मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा किंवा तडजोड होऊ शकत नाही. तसंच ते ५ वर्षं भाजपकडेच राहील. उपमुख्यमंत्रिपद सेनेला देता येईल. दोनचार खाती इकडची तिकडं होतील", असंही महाजन यांनी म्हटलं आहे.

"शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेससोबत जाईल असं वाटत नाही. त्यांनी तसं करू नये. तसंच भाजपं २०१४ सारखं अल्पमतातलं सरकार या वेळेस स्थापन करणार नाही. राष्ट्रपती राजवट येऊ नये असं आमचं मत आहे," असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे.

'शिवसेना ते होऊ देणार नाही'

"काही लोकांच्या हट्टापायी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येईल, शिवसेना ते होऊ देणार नाही. युतीचं राज्य आणण्याची आणि युती टीकवण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांची आहे, आमच्याकडून आम्ही पहिल्या दिवसापासून सकारत्मक आहोत," असं संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.

कोणत्याही क्षणी गोड बातमी - मुनगंटीवार

"सरकार स्थापन करण्यासाठी लागणारा नैसर्गिक वेळ आम्ही दिला आहे, सरकार आमचंच बनेल, आता चर्चा झाली आहे, विश्लेषण झालं आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी गोड बातमी येईल," असं मुटनंटीवार यांनी म्हटलं आहे.

भाजपनं शिवसेनेकडे प्रस्ताव पाठवला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. पण हा प्रस्ताव नेमका काय आहे हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे.

त्याचवेळी शिवसेनेकडून मात्र भाजपकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना लवकरात लवकर प्रस्ताव देईल, त्यावर चर्चा करण्यासाठी भाजपची दारं 24 तास उघडी असल्याचं पाटील यांनी म्हटलंय.

या बैठकीला पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

पाच वर्षं भाजपचा मुख्यमंत्री - महाजन

पाच वर्षांसाठी भाजपचाच मुख्यमंत्री असेल, असं गिरीश महाजन यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

"2 दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये सन्माननिय तोडगा निघेल. संजय राऊत यांच्या बोलण्यावर भाजप नाराज आहे, आमची मोठ्या भावाची भूमिका आहे आम्ही चर्चेसाठी वाट पाहात आहोत. लोखी देऊन विषय संपणारा आहे का, समोरासमोर बसून हे सुटेल," असंही गिरीश महाजन यांनी म्हटलंय.

कोणतीही ऑफर नाही - संजय राऊत

आमच्याकडे भाजपची कोणतीही ऑफर आलेली नाही. आमच्या मुख्यमंत्रिपदासहित सगळ्या मागण्या कायम आहेत. चर्चा काय करायची आहे? ठरल्याप्रमाणे करायचं हाच आमचा दोन शब्दांचा प्रस्ताव आहे, असं संजय राऊत यांनी यावर म्हटलंय.

आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 25 हजार कोटींची मदत देण्याची मागणी राज्यपालांकडे केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

काळजीवाहू सरकार फार काही करू शकत नाही, म्हणून राज्यपालांनी त्यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

शेतकरी आणि मच्छिमारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झाला आहे, अशी स्थिती महाराष्ट्रात कधी उद्भवली नव्हती, त्यामुळे पंचनामे लवकरात लवकर करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख मदतीची मागणी राज्यपालांकडे आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)