You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईमध्ये गॅसगळतीच्या तक्रारी, केमिकल कंपन्यांना सतर्कतेचा इशारा#5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. मुंबईमध्ये गॅसगळतीच्या तक्रारी
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये काही ठिकाणी गुरुवारी रात्री उशिरा गॅसची दुर्गंधी मोठा प्रमाणात येऊ लागल्यामुळे प्रचंड घबराट उडाली. मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून अग्निशमन विभागाकडे याबाबत तक्रारी दाखल होऊ लागल्या.
या प्रकरणाची दखल घेऊन मुंबई महापालिकेने केमिकल कंपन्यांना सतर्कतेचा इशारा दिला. देवनार, मानखुर्द, चेंबूर, विक्रोळी, दिंडोशी, विलेपार्वे, कांदिवली, दहिसर परिसरात अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या रवाना झाल्या आहेत. हे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने पसिद्ध केले आहे.
2. हिरवळ दिसली म्हणजे ते जंगल नाही- राज्य सरकार
आरे कॉलनी हे जंगल नाही. तसंच ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचाही भाग नाही. केवळ हिरवळ दिसली म्हणजे ते जंगल आहे.
तिथं दुर्मीळ झाडं आणि इतर वन्यजीव आहेत असा दावा करणं साफ चुकीचं असल्याचं म्हणत महाराष्ट्र सरकारनं मेट्रो कारशेडला होणाऱ्या विरोधाला काहीही आधार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
राज्य सरकारतर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी हायकोर्टात ही बाजू मांडली. कारशेडसाठी निवडण्यात आलेल्या भागाच्या तिन्ही बाजूंनी रहदारीचे रस्ते आहेत. तसेच या भागात झाडांची संख्या कमी असून हा भाग मुख्य जंगलाच्या भागातही मोडत नाही. त्यामुळे ही जमीन कारशेडसाठी निवडल्याचा दावा राज्य सरकारनं केला आहे.
कांजूरमार्गमधील पर्यायी जागा न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्या जागेचा विचार करता येणार नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं.
3. डाव्या विद्यार्थी संघटनेकडून बाबुल सुप्रियो यांना धक्काबुक्की
पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठात पर्यावरण राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांना डाव्या आघाडीच्या विद्यार्थी संघटनेच्या एका गटाकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण तयार झाले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. हे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले आहे.
अभाविपने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्यासाठी बाबूल सुप्रियो विद्यापीठात गेले होते.
सुप्रियो विद्यापीठात दाखल होताच स्टुंडट फेडरेशन ऑफ इंडिया आणि आर्ट फॅकल्टी स्टुडंटस् युनियनच्या सदस्यांनी त्यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू केली आणि नंतर सुप्रियो यांना घेरून धक्काबुक्की सुरू केली. त्यानंतर राज्यपाल जगदीप धनकड यांनाही विद्यार्थ्यांनी विरोध केला.
4. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये सामूहिक नेतृत्व
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई असे विभागवार जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
यामध्ये मुकल वासनिक, राजीव सातव, अविनाश पांडे यांचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आर. सी. खुंटिया यांच्याकडे दिली आहे.
पश्चिम आणि कोकण विभागाची जबाबदारी रजनी पाटील आणि मराठवाड्याची जबाबदारी राजीव सातव यांच्याकडे देण्यात आणि आहे. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. मुकूल वासनिक यांच्याकडे विदर्भाची आणि मुंबई प्रदेशाची जबाबदारी अविनाश पांडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे.
5. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर रायगडमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांच्या काळामध्ये विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यातील धरण-क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी मराठवाड्यातही पावसानं हजेरी लावली असून या विभागामध्ये गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारा-पाऊस सुरू आहे. नागपूरमध्ये पावसानं सरासरी ओलांडली आहे. न्यूज18 लोकमतनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)