You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र विधानसभा: उदयनराजे भोसले म्हणतात, राजकारणापासून अलिप्त व्हावंसं वाटतंय #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. राजकारणातून अलिप्त व्हावंसं वाटतंय - उदयनराजे
सध्या राज्यात पक्षांतराचं वारं वाहतंय. तुम्ही कोणता नवीन राजकीय निर्णय घेणार आहात, या प्रश्नाला उदयनराजे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. "राजकारणापासून अलिप्त व्हावंसं वाटतंय," असं उदयनराजे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
"राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात जायचे असं काही नक्की नाही आणि असं काही असेल तर तुम्हाला नक्की सांगतो," असंही ते म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांची भेट घेतली. त्यानंतर उदयनराजे बोलत होते. "भिडे गुरूजी माझ्या घरातले आहेत. ते मला भेटायला येणारच," असं राजे म्हणाले.
2. शिवसेनेला विश्वासात घेतल्यानंतरच राणेंच्या प्रवेशांचा निर्णय: मुख्यमंत्री
भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय शिवसेनेला विश्वासात घेऊनच घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. एबीपी माझाने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं अशी बातमी त्यांनी प्रसिद्ध केली आहे.
गुरुवारी राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याची माहिती दिली होती. सध्या राणे भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून राज्यसभेत खासदार आहेत. त्यामुळे जर भाजपध्ये प्रवेश केल्यानंतर ते अधिकृतपणे पक्षाचे सदस्य होतील.
दरम्यान, 1 तारखेला भाजपप्रवेश होणार नसून यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. त्यांची मुले निलेश आणि नितेश विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती राणे यांनी दिली. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
3. चेंबूर बलात्कारप्रकरणातील पीडितेचा मृत्यू
मुंबईतील चेंबूर परिसरात चार जणांनी सामूहिक बलात्कार केलेल्या 19 वर्षीय तरुणीचा बुधवारी मृत्यू झाला. पण याला 45 तास उलटून गेले तरी सदर प्रकरणातील आरोपींचा अद्याप सुगावा पोलिसांना लागलेला नाही. अशी बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.
चेंबूर भागात सुमारे महिनाभरापूर्वी तिच्यावर बलात्कार झाला होता. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी रात्री नऊदरम्यान तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यात तरुणींवर बलात्कार होत आहेत आणि सरकार यात्रा काढण्यात मग्न आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
4. बिहारमध्ये पानमसाल्यावर बंदी
बिहारमध्ये दारुबंदीच्या निर्णयानंतर आता पान मसाल्यार बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी आजपासूनच लागू असेल. सध्या ही बंदी 12 महिन्यांकरिता लागू असेल, अशी बातमी दैनिक जागरणने दिली आहे.
भारतीय राज्यघटनेनुसार राज्य सरकारने आपल्या लोकांचा योग्य आहार आणि जीवनमान उंचावण्यासाठी तसंच सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बिहार सरकारने सांगितलं आहे.
5. पहिल्या दिवसअखेर भारत 5 बाद 264
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात जमैकामध्ये दुसरा कसोटी सामना शुक्रवारी सुरू झाला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघानं पहिल्या दिवसअखेर 5 बाद 264 धावा केल्या.
विराट कोहली आणि मयांक अग्रवालनं अर्धशतकी खेळी केली. हनुमा विहारी 42 धावा आणि ऋषभ पंत 27 धावांवर खेळत आहे. लोकेश राहुलने 13 धावा केल्या.
ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.
चेतेश्वर पुजारा यावेळी साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहली आणि मयांक अग्रवालनं डाव सावरला. मयांकनं 127 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीनं 55 धावा केल्या. तर त्याच्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेने 24 धावा केल्या. कर्णधार कोहली 76 धावा करून बाद झाला. वेस्ट इंडीजकडून जेसन होल्डरनं तीन विकेट घेतल्या. कॉर्नवॉल आणि रोचनं प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)