You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईसह राज्यात पावसाची संततधार कायम, कोयना धरणाचे दरवाजे उघडले
मुंबईसह ठाणे, पालघर तसंच राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची संततधार कायम आहे.
सातारा - कोयना धरणाचे दरवाजे उघडले आहेत. 40 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे.मुंबईत सीएसटी ते कर्जत, सीएसटी ते कसारा, सीएसटी ते पनवेल आताच मध्य रेल्वेने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद केली.
ठाणे जिल्ह्यात उल्हास नदीला पूर आला आहे. तर, इथल्या बारवी धरणातून विसर्ग सुरू होईल. त्यामुळे कल्याण, अंबरनाथ (ग्रामीण), बदलापूर भागात पूरसदृश परिस्थिती होईल. या जिल्ह्यातील शहापूरमधील भातसा धरणातून विसर्ग सुरू होईल. ठाणे जिल्ह्यात उल्हास, बारवी, भातसा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
मुंबई आणि नवी मुंबईत सखल भागात पाणी साचलं असून मुंबईत काही ठिकाणी वाहनं बुडाली आहेत.
पावसामुळे हुबळी-एलटीटी एक्स्प्रेस दौंड इथं, मनमाड-पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरी इथं तर हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस दौंड इथे नियंत्रित करण्यात आली आहे. या ट्रेन्स तिथूनच परतीच्या प्रवासाला निघतील.
मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-भुसावळ एक्स्प्रेस, भुसावळ-मुंबई एक्स्प्रेस, भुसावळ-पुणे, पुणे-भुसावळ, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकात खोळंबली आहे.
पश्चिम रेल्वेलाही पावसाचा फटका बसला आहे. वसई विरारदरम्यान पाणी ट्रॅकवर साठलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामधील धरण क्षेत्रासह सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. पूर परिस्थितीमुळे 289 कुटुंबांतील 1016 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी 45 फुटांवर पोहोचली आहे. वारणा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे. पुराचे पाणी रस्त्यांवर आल्यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत.
सांगलीत कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सातत्याने सुरू होत आहे.
पवना धरण 100 टक्के भरलं असून 13 हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं आहे. पवनानगर कोथूर्णे गावात पाणी शिरलं असून , अडकलेल्या लोकांना NDRF टीमने सुरक्षित बाहेर काढलं.
खडकवासला धरणातून मुठा नदीत 35 हजार 500 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे पानशेत, खडकवासला धरण 100 टक्के भरली असून वरसगाव 98% तर टेमघर 87.19% भरले आहे.
पुणे-माणगाव हायवेवर माले या गावाजवळ पुलावर पाणी आल्यामुळे प्रवासाकरिता व पर्यटकांकरिता हायवे पौड येथेच बंद करण्यात आली. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी नोंद घ्यावी.शक्यतो या मार्गावरून प्रवास टाळावा.
चासकमान धरण परिसरात व भिमाशंकर भागात अतिवृष्टी चालू असून गेल्या 24 तासात 300 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. कृपया, नदीकाठच्या लोकांना त्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. आपल्या जीविताची व मालमत्तेची काळजी घेण्यात यावी असं चासकमान धरण शाखेतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)