झारखंडमधील JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याची मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा

फोटो- हेमंत सोरेन

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, रांचीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या २४व्या दिवशी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो- हेमंत सोरेन)
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी (17 ऑगस्ट) रात्री उशिरा मोठी घोषणा केली.

मुख्यमंत्री सोरेन यांनी TDPL च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या JPSC-2014, JPSC-2011-2013 आणि JPSC-CGL या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासोबतच या परीक्षांचे जाहीर झालेले निकालही रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

TDPL च्या माध्यमातून ज्या उमेदवारांची निवड झाली आहे, त्या सर्वांची निवड रद्द केली जाईल, असेही मुख्यमंत्री सोरेन यांनी स्पष्ट केले.

या घोषणेनंतर विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो यांनी म्हटले आहे की, सुधारणांच्या प्रक्रियेसाठी त्यांचा संघर्ष सुरूच राहणार आहे.

महतो म्हणाले, "आम्ही आमच्या मागण्या घेऊन आलो होतो आणि आमच्या मागण्या पूर्ण होणार असतील, तर त्यानंतर पुढील कार्यक्रम का करायचे? आम्ही अधिकृत नोटीसची वाट पाहत आहोत. आमची मागणी आहे की, आम्हाला अशी व्यवस्था हवी आहे, ज्यामध्ये भविष्यात पुन्हा पेपरफुटी किंवा गैरप्रकार होणार नाहीत, याची सरकारने हमी द्यावी."

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ही घोषणा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जेपीएससी-जेएसएससी उमेदवारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे मोठे पाऊल मानले जात आहे.

यापूर्वीही झारखंड सरकारने TDPL च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षांची चौकशी करण्याचे सांगितले होते. आता मुख्यमंत्र्यांनी परीक्षा, निकाल आणि निवड प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय स्पष्टपणे जाहीर केला आहे.

सोमवारी (17 ऑगस्ट) उशिरा हेमंत सोरेन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, JPSC आणि JSSC मध्ये सुधारणा करण्यासाठी आयएएस अधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल.

झारखंड

दरम्यान, रांचीमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, कथित गैरप्रकारांची चौकशी करावी आणि वादग्रस्त परीक्षा रद्द कराव्यात, यांसह अनेक मागण्यांसाठी उमेदवार आंदोलन करत आहेत.

17 ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या 24व्या दिवशी सरकारकडून हा मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन नेमकं काय म्हणाले?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "2014 पासून झालेल्या सर्व छोट्या-मोठ्या त्रुटींची सर्वंकष चौकशी करण्यात येणार आहे. झारखंडच केंद्र सरकारने MMDR कायद्यात केलेल्या सुधारणांवर चर्चा करण्यासाठी आम्ही लवकरच बैठक घेणार आहोत. गरज पडल्यास या विशिष्ट मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशनही बोलावले जाऊ शकते."

हेमंत सोरेन पुढे म्हणाले की, "SIT आणि CID या दोन्ही यंत्रणांकडून सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. तपास सुरू असल्याने प्रत्येक बाब उघडपणे सांगणे शक्य नाही. मात्र, JPSC परीक्षेतील अनियमिततेशी संबंधित आरोपांवरून CGL प्रक्रियेतून नियुक्त झालेल्या काही व्यक्तींना आता अटक केली जात असल्याचे समोर आले आहे.

"तसंच, वेगवेगळ्या काळात येथे कार्यरत असलेल्या विविध कंपन्यांचे एक गुंतागुंतीचे आणि परस्परांशी जोडलेले जाळे असल्याचेही दिसून येत आहे. या तपासाच्या कक्षेत 2014 पासून आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांचा समावेश आहे. आम्ही संबंधित विभाग आणि CIDला निर्देश दिले आहेत. तपास सुरू करण्यात आला असल्याने तो सखोलपणे केला गेला पाहिजे," असंही सोरेन म्हणाले.

विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो काय म्हणाले?

झारखंडमध्ये झारखंड पब्लिक सर्विस कमिशनची (जेपीएससी) परीक्षा आणि TDPLच्या वतीने घेण्यात आलेल्या इतर परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जेपीएससी परीक्षा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महातो यांनी सरकारचे आणि आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

झारखंड
फोटो कॅप्शन, झारखंडमधील आंदोलनादरम्यानचे छायाचित्र

एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत महातो म्हणाले, "या आंदोलनाला पाठिंबा आणि सहकार्य करणाऱ्या सर्व विद्यार्थी, पालक, माध्यमांचे प्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि विशेषतः झारखंड सरकार तसेच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत आमच्या मागण्या मान्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास सुरू असून भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अटक केली जात आहे. या परीक्षा गैरव्यवहारामागील खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)