You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुनव्वर राणा जेव्हा म्हणाले होते, ‘...तर मी चाळीस वर्षांपूर्वी विकला गेलो असतो’
प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचं निधन झालं आहे. ते 71 वर्षांचे होते.
त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून लखनऊ येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.
मुन्नावर राणा यांची मुलगी सुमैया राणा यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितलं की, "रविवारी रात्री उशिरा तिच्या वडिलांचं रुग्णालयात निधन झालं आणि सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील."
त्यांचा मुलगा तबरेझ राणा यांनी पीटीआयला सांगितले की, “आजारपणामुळे मुनव्वर राणा यांना14 ते 15 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना प्रथम लखनौमधील मेदांता आणि नंतर एसजीपीजीआयमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांनी रविवारी रात्री 11 वाजता अखेरचा श्वास घेतला.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुनव्वर राणा यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिलं की, “मुनव्वर राणा यांच्या निधनामुळे मला दु:ख झालं आहे. त्यांनी उर्दू साहित्य आणि काव्य जगतात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो."
राणा हे त्यांच्या कवितांसाठी, शायरीसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या आईवर लिहिलेल्या कविता खूप गाजल्या आहेत.
‘शाहदाबा’ या काव्यसंग्रहासाठी राणा यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
मुनव्वर राणा यांना 2014 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
पुरस्कार परत केला
2015 मध्ये उत्तर प्रदेशच्या दादरी येथे अखलाकच्या लिंचिंगच्या घटनेनंतर, राणा यांनी एका वृत्तवाहिनीवरील थेट चर्चेदरम्यान त्यांचा साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. देशातील वाढती असहिष्णुता हे त्यांनी या निर्णयामागचे कारण सांगितलं होतं.
बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांच्याशी बोलताना मुनव्वर राणा म्हणाले होते की, त्यावेळच्या परिस्थितीच्या निषेधार्थ ते हा पुरस्कार परत करत आहे.
ते म्हणाले होते की, "लोकांना वाटतं की एकतर मुनव्वर राणा घाबरला आहे किंवा त्यानं स्वत:ला विकलं आहे. मला जर विकायचं असतं तर मी चाळीस वर्षांपूर्वी विकला गेलो असतो. आता माझी काळजी कोणाला आहे? माझ्यासाठी हा पुरस्कार माझ्यासाठी एक ओझं बनला होता. फक्त ते ओझं दूर झालंय."
पुढे ते म्हणाले होते, "हा सरकारचा निषेध नाही, समाजाचा निषेध आहे. पण सरकार समाजाची काळजी घेत असतं. जर शंभर लोकांनी ठरवलं असेल की, एखाद्याच्या घरात गाय किंवा म्हशीचे मांस आहे किंवा त्यानं लव्ह जिहाद केला आहे, तर याचा अर्थ असा की सरकार किंवा पोलिसांची कोणतीही भूमिका नाही."
'भाजप सत्तेत आली तर मी स्थलांतर करेन'
2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान, स्थलांतर आणि जिना हे शब्द चर्चेत होते.
दैनिक भास्करच्या एका बातमीनुसार, मुनव्वर राणा यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, “सध्याचे सरकार स्थलांतराचा नारा देत आहे, पण भाजप सरकारच्या काळात मुस्लिमांमध्ये इतकी भीती आहे की कोणीही बोलू शकत नाही. तरीही ओवेसींच्या मदतीने भाजपचे सरकार आले तर आम्हाला इथे राहण्याची गरज नाही, मी येथून स्थलांतर करेन.”
या बातमीत पुढे म्हटलंय, 2022 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुनव्वर राणा यांचं नाव मतदार यादीतून गायब झालं होतं. त्यामुळे त्यांना मतदान करता आलं नाही.
"माझं नाव मतदार यादीत नाही, त्यामुळे मी मतदानाला जाऊ शकणार नाही," असं राणा म्हणाले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)