You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात इस्लाम येण्यामागे काळी मिरीचीही भूमिका होती का?
- Author, मिर्झा ए. बी. बेग
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
भारतात सर्वसाधारण असं मानलं जात की, इस्लामचा भारतात प्रवेश इसवी सन 712 मध्ये उमय्यद राजवटीत मोहम्मद बिन कासिमने सिंधवर केलेल्या आक्रमणातून म्हणजेच तलवारीच्या जोरावर झाला.
परंतु, अनेक अभ्यासक या मताशी सहमत नाहीत.
अनेक इतिहासकारांच्या मते, भारतात इस्लामचा प्रवेश केवळ एका घटनेमुळे झालेला नाही. तो अनेक शतकांपर्यंत चाललेल्या ऐतिहासिक आणि सामाजिक प्रक्रियेचा, घडामोडींचा परिणाम होता.
इतिहासकार आणि समाजशास्त्रज्ञ या प्रक्रियेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यामुळे ते याबाबत अनेक वेगवेगळे प्रमुख सिद्धांत मांडतात.
यातील एक सिद्धांत असा आहे की, भारतात इस्लामच्या प्रसारात व्यापाराची भूमिका महत्त्वाची होती.
प्राचीन काळापासून भारत मसाल्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामध्ये काळ्या मिरीला सर्वाधिक मागणी होती. भारतातील काळी मिरी अरब देशांपासून ते ग्रीक आणि रोमन साम्राज्यापर्यंत विविध भागांत जात होती.
काळी मिरीचा व्यापार समजून घेण्यासाठी आम्ही केरळमधील कोची शहर आणि तेथून कोडुंगल्लूर येथे गेलो.
स्थानिक परंपरेनुसार, इथेच मुझिरिस हे प्राचीन बंदर होते. 15व्या शतकात आलेल्या भीषण पुरात हे बंदर पूर्णपणे नष्ट झाले होते.
अरब व्यापाऱ्यांचा सागरी प्रवास
केरळला जाण्यापूर्वी आम्ही दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक आणि मध्ययुगीन इतिहासाचे प्रमुख इतिहासकार सयद झहीर हुसेन जाफरी यांच्याशी चर्चा केली.
त्यांच्या मते, बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्र खूपच शांत होता. सय्यद झहीर हुसेन जाफरी म्हणतात की, या समुद्रात एखादा लाकडाचा तुकडा जरी टाकला तरी तो वाहत जाऊन अरब किंवा ओमानच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकत होता.
या सागरी मार्गावर अनेक वर्षे अरब व्यापाऱ्यांचे वर्चस्व होते. ते पावसाळी वाऱ्यांच्या मदतीने भारतात येत, काही काळ इथे राहत आणि वारे बदलल्यानंतर पुन्हा अरब देशांमध्ये परत जात.
प्रा. जाफरी यांच्या मते, याच सागरी मार्गाने अरब लोक श्रीलंका, जावा, सुमात्रा, मलेशिया आणि इंडोनेशियापर्यंतही पोहोचले.
प्रख्यात इतिहासकार सय्यद सुलेमान नदवी यांनी त्यांच्या 'अरब और हिंद के ताल्लुकात' या पुस्तकात लिहिलं आहे की, "युरोप आणि भारत यांच्यामधील सागरी मार्ग खूप महत्त्वाचा होता."
"सुरुवातीला या मार्गावर पूर्णपणे अरबांचे वर्चस्व होते. परंतु, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या सुमारे 300 वर्षे आधी ग्रीकांनी इजिप्त जिंकल्यानंतर या सागरी मार्गावरील नियंत्रण त्यांच्या हाती गेले."
ते पुढे लिहितात की, "येशू ख्रिस्तानंतर सुमारे 600 वर्षांनी इस्लामचा उदय झाला आणि अरबांचे सामर्थ्य वाढू लागले. सहाव्या शतकात त्यांनी इजिप्तपासून स्पेनपर्यंत आपले वर्चस्व निर्माण केले."
"त्याचबरोबर भूमध्य समुद्रावरही त्यांचे नियंत्रण आले. त्यामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी सागरीमार्ग अरबांच्या नियंत्रणाखाली गेला आणि अनेक शतके तो त्यांच्याच नियंत्रणाखाली राहिला."
प्रा. जाफरी यांच्या मते, भारतात आपल्या प्रवासादरम्यान अनेक अरब व्यापाऱ्यांनी स्थानिक महिलांशी विवाह केले. अरब आणि भारत यांच्यात दीर्घकालीन संपर्कामुळे दक्षिण भारतात एक अशा मुस्लिम समुदायाचा विकास झाला, ज्याला 'मप्पिला मुस्लिम' असं म्हटलं जातं.
ऐतिहासिक पुराव्यांचा अभाव
दक्षिण भारतात मुस्लिम नेमके कधी आले, हे निश्चितपणे सांगणे किंवा त्याचा अंदाज लावणे कठीण आहे. कारण याबाबतचे ऐतिहासिक पुरावे खूपच कमी आहेत.
अरब खलाशांनी त्यांच्या सागरी प्रवासाच्या कोणत्याही लिखित नोंदी ठेवलेल्या नाहीत. त्यांनी बांधलेल्या इमारतींवर शिलालेखही नव्हते. काही ठिकाणी शिलालेख असले तरी, 16व्या शतकात पोर्तुगीज भारतात आल्यानंतर मुसलमानांशी झालेल्या संघर्षात त्यांपैकी अनेक नष्ट झाले आहेत.
शशी थरूर अनेकदा याकडे लक्ष वेधतात की, इस्लामचा उदय होण्याच्या अनेक शतकां आधीपासूनच अरब व्यापारी आणि खलाशी केरळच्या मलबार किनाऱ्यावर येत जात असत.
थरूर यांच्या मते, जेव्हा इस्लामचा उदय झाला, तेव्हा तो केरळमध्ये तलवारीच्या जोरावर नाही. तर, स्थानिकांना पूर्वीपासूनच परिचित आणि विश्वासार्ह असलेल्या अरब व्यापाऱ्यांमुळे तिथे पोहोचला.
याशिवाय, केरळचा हिंदू राजा चेरामन पेरुमल याने इस्लाम स्वीकारल्याची कथा देखील या इतिहासाशी जोडली जाते.
आम्ही सकाळी लवकर केरळमधील फोर्ट कोचीहून कोची हेरिटेज प्रोजेक्टचे संस्थापक योहान बेनी कुरुविला आणि माझे कॅमेरामन बिमल थंकाचन यांच्यासोबत कोडुंगल्लूर येथे पेरियार नदीच्या किनाऱ्यावर पोहोचलो.
तिथे आमची भेट जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील इंडिया-अरब कल्चर सेंटरचे माजी संचालक आणि केरळमधील महात्मा गांधी विद्यापीठाचे प्राध्यापक एम. एच. इलियास यांच्याशी झाली. ते आमची वाटच पाहत होते.
दक्षिण भारतात इस्लाम
प्रा. इलियास यांच्या मते, दक्षिण भारतात इस्लामच्या आगमनाबाबत चार प्रमुख सिद्धांत/तत्व आहेत.
पहिल्या सिद्धांतानुसार, पैगंबर मोहम्मद यांच्या हयातीतच प्राचीन मुझिरिस बंदराच्या मार्गाने इस्लाम भारतात पोहोचला होता.
या दाव्याच्या समर्थनासाठी चेरामन जुमा मशिदीचा उल्लेख केला जातो. ही मशीद इसवी सन 629 मध्ये मलिक बिन दिनार यांनी बांधल्याचे सांगितले जाते. मशिदीवरील एका शिलालेखातही याचा उल्लेख आढळून येतो.
परंतु, अनेक इतिहासकार या तारखेबाबत ठाम मत व्यक्त करत नाहीत. कारण काही परंपरांमध्ये मलिक बिन दिनार यांना पैगंबर मोहम्मद यांचे सहकारी (सहाबी किंवा सहबी) मानले जाते, तर काही ठिकाणी त्यांचा ताबईनमध्ये (सहकाऱ्यांनतरची पिढी) समावेश केला गेला आहे.
सहाबी म्हणजे इस्लाम स्वीकारल्यानंतर पैगंबर हजरत मोहम्मद यांना प्रत्यक्ष भेटलेले किंवा पाहिलेले लोक. तर ताबईन म्हणजे ते लोक ज्यांनी इस्लाम स्वीकारल्यानंतर एखाद्या सहाबीची भेट घेतली होती.
या मशिदीच्या स्थापनेबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एका कथेनुसार, कोडुंगल्लूरचा हिंदू राजा चेरामन पेरुमलला अरब व्यापाऱ्यांनी अरबमध्ये एका पैगंबरांचा उदय झाल्याची माहिती दिली.
त्यानंतर राजा अरबला गेला. एका प्रथेनुसार, तिथे त्याची पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याशी भेट झाली आणि त्याने इस्लाम स्वीकारला.
तर दुसऱ्या एका परंपरेनुसार, भारतात परत येत असताना ओमानमधील सलालाह येथे त्याचे निधन झाले. आजही तिथे त्याची कबर असल्याचा दावा केला जातो.
दुसरी परंपरा
प्रा. इलियास यांच्या मते, दुसऱ्या परंपरेनुसार राजाची पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याशी भेट झाली नाही. आणि ओमानमध्ये त्याचे निधन झाले.
पण, या दोन्ही परंपरांमध्ये राजा आणि मलिक बिन दिनार यांची भेट झाल्याचा उल्लेख आहे. तसेच, राजाने आपल्या उत्तराधिकाऱ्याला एक पत्र पाठवून मलिक बिन दिनार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्यास आणि त्यांच्याशी चांगला व्यवहार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
जेव्हा मलिक बिन दिनार मुझिरिस बंदरात, म्हणजे आजच्या कोडुंगल्लूर येथे पोहोचले, तेव्हा राजाच्या उत्तराधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, राजवाड्याजवळ मशीद बांधण्यासाठी जमीनही दिली. ही मशीद आजही तिथे आहे.
प्रा. इलियास म्हणाले, "अरब व्यापारी प्रामुख्याने मसाल्यांच्या, विशेषतः काळी मिरीच्या व्यापारासाठी येथे आले होते. परंतु, त्यांनी केवळ इस्लामच नाही, तर अनेक इतर अनेक गोष्टीही भारतात आणल्या."
"उदाहरणार्थ, हिशोब ठेवण्याच्या आणि मोजमाप करण्याच्या अनेक पद्धती त्यांनी येथे आणल्या. त्यापैकी अनेक पद्धती आजही वापरल्या जातात. तसेच, चांगल्या दर्जाच्या बोटी आणि जहाजे कशी बांधायची, हे तंत्रज्ञानही त्यांनी शिकवले."
चेरामन जामा मशीद
दुपारच्या नमाजच्या वेळी, उष्ण आणि दमट वातावरणात आम्ही या ऐतिहासिक मशिदीत पोहोचलो. तिथे आमची भेट मशिदीचे इमाम सलीम नदवी यांच्याशी झाली. त्यांनी लखनौमधील प्रसिद्ध इस्लामिक शिक्षणसंस्था 'नदवतुल उलेमा'मधून शिक्षण घेतले आहे.
त्यांनी सांगितलं की, मशिदीला लागून असलेल्या व्हरांड्यात मलिक बिन दिनार यांचा मुलगा युसूफ बिन दिनार आणि त्याच्या पत्नीची कबर आहे. तसेच, मलिक बिन दिनार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच काळात या भागात सुमारे 10 मशिदी आणि खानकाह (धार्मिक केंद्रे, सूफी आश्रमे) उभारली होती.
मलिक बिन दिनार यांची कबर येथून सुमारे 300 किलोमीटर उत्तरेला, अरबी समुद्र किनाऱ्यावरील कासरगोड येथे असल्याचे सांगितले जाते.
प्रा. इलियास यांच्या मते, वेगवेगळ्या परंपरा असल्या तरी एक गोष्ट सर्वजण मान्य करतात. ती म्हणजे भारतात इस्लामची ओळख राजा चेरामनच्या माध्यमातूनच झाली.
सातव्या आणि आठव्या शतकात अरब व्यापाऱ्यांचे अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातील सागरी व्यापारावर वर्चस्व होते. ते व्यापारासाठी मालच नव्हे, तर आपली संस्कृती आणि धार्मिक परंपराही भारतात घेऊन आले.
केरळ आणि गुजरातच्या किनारपट्टीवरील स्थानिक राज्यकर्त्यांनी या अरब व्यापाऱ्यांचे स्वागत केले. त्यांना मशिदी बांधण्याची आणि तिथे स्थायिक होण्याची परवानगीही दिली.
युद्धातील विजयामुळे इस्लामचा उदय
एक सिद्धांत 'अरबांच्या विजय आणि राजकीय विस्तारा'शी संबंधित आहे.
यानुसार, इस्लामला भारतीय उपखंडात पहिले मोठे राजकीय यश इसवी सन 712 मध्ये मिळाले, जेव्हा मोहम्मद बिन कासिमच्या नेतृत्वाखालील अरब सैन्याने सिंध आणि मुलतान जिंकले.
नंतर, गझनवी आणि घोरी शासकांच्या हल्ल्यांनी दिल्ली सल्तनतीचा पाया घातला.
मात्र, काही जुन्या इतिहासकारांनी त्याचे वर्णन 'तलवारीच्या जोरावर इस्लामचे आगमन' असे केले आहे.
परंतु आधुनिक संशोधकांच्या मते, या विजयांचा मुख्य उद्देश लोकांना जबरदस्तीने दुसऱ्या धर्मात धर्मांतरित करणे हा नसून सत्ता प्रस्थापित करणे हा होता. त्यांच्या मते, धर्मांतराची प्रक्रिया बहुतांशी हळूहळू आणि सामाजिक कारणांमुळे घडली.
सुफींचा प्रभाव
प्राध्यापक जाफरी म्हणतात की , 'द ग्रेव्स ऑफ तरीम' या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर येमेन आणि हद्रमौतचे लोक जिथे जिथे पोहोचले, तिथे तिथे मशिदी, कबरी आणि खानकाह उभारण्यात आल्याचे समोर आले.
ही केंद्रे राजकीय इस्लामच्या उदयापूर्वीही शांततापूर्ण धार्मिक आणि सामाजिक केंद्रे म्हणून अस्तित्वात होती. येथून इस्लामचा प्रसार केला जात होता.
या पुस्तकानुसार, भारताचे किनारपट्टीचे प्रदेश सुफी संतांसाठी महत्त्वाची केंद्रे होती. येथून त्यांनी केवळ व्यापारच केला नाही, तर मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये इस्लामचा संदेशही पोहोचवला.
11 व्या शतकापासून पुढे चिश्ती, सुहरावर्दी आणि इतर सुफी पंथांचे संत भारताच्या विविध भागांमध्ये स्थायिक झाले. सर्व धर्मांच्या लोकांकडून भेट दिली जाणारी आध्यात्मिक केंद्रे म्हणून सुफी खानकाह आणि दर्गे उदयास आले.
अजमेरमधील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा हे याचे उत्तम उदाहरण आहे. तिथे हिंदू आणि मुस्लीम दोघेही आदराने भेट देतात. अशाप्रकारे, भारतात इस्लामच्या प्रसारात सुफी चळवळीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
प्रा. जाफरी यांच्या मते, इस्लामच्या समानता, बंधुत्व आणि न्यायाच्या तत्त्वांनी त्यांना अधिक चांगली सामाजिक मान्यता आणि आदर मिळवण्याची संधी दिली.
मात्र, आधुनिक संशोधक या सिद्धांताच्या काही मर्यादाही निदर्शनास आणून देतात.
ते म्हणतात की, जिथे इस्लामचा झपाट्याने प्रसार झाला, तिथे जातीव्यवस्था देशाच्या इतर भागांइतकी कठोर नव्हती.
शेती आणि राज्याचा विस्तार
इतिहासकार रिचर्ड ईटन यांच्यासारख्या विद्वानांनी मांडलेला 'कृषी संरक्षण आणि राज्य विस्तार' हा एक तुलनेने नवीन सिद्धांत आहे.
या सिद्धांतानुसार, बंगाल आणि पंजाबसारख्या प्रदेशांमध्ये इस्लामचा प्रसार प्रामुख्याने कृषी विकास आणि राज्याच्या धोरणांशी जोडलेला होता.
इस्लामी शासकांनी पडीक किंवा मोकळ्या जमिनी धार्मिक संस्था, सुफी खानकाह आणि मशिदींना दिल्या. या संस्थांनी नवीन कृषी वसाहती स्थापन केल्या. राज्याच्या आर्थिक प्रगतीचा आणि प्रशासकीय व्यवस्थेचा भाग बनल्यामुळे या भागांतील शेतकऱ्यांनी हळूहळू इस्लाम धर्म स्वीकारला.
या सर्व सिद्धांतांवरून हे स्पष्ट होते की, भारतीय उपखंडात इस्लामचा प्रसार हा एकाच घटकामुळे नव्हे, तर अनेक ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे झाला.
व्यापार, आध्यात्मिक परंपरा, राजकारण, सामाजिक न्याय आणि आर्थिक संधी या सर्वांच्या एकत्रित प्रभावामुळे एका दीर्घ ऐतिहासिक प्रक्रियेला चालना मिळाली. त्याने त्या प्रदेशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीवर खोलवर प्रभाव टाकला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)